PM Modi From Adampur Airbase : अधर्माचा नाश आणि धर्माची स्थापना यांसाठी शस्त्र उचलणे ही आपली परंपरा !

पंतप्रधान मोदी यांनी आदमपूर (पंजाब) येथील वायूदलाच्या तळाला भेट देऊन केले विधान  

पंतप्रधान नरेंद्र मोदी

आदमपूर (पंजाब) – अधर्माचा नाश आणि धर्माची स्थापना यांसाठी शस्त्र उचलणे ही आपली परंपरा आहे. जेव्हा आपल्या मुली, बहिणी यांचे कुंकू पुसले गेले, तेव्हा आतंकवाद्यांचा फणा आपण त्यांच्या घरात घुसून ठेचला. ते भेदरटपणे लपले होते; पण त्यांनी ज्यांना आव्हान दिले ती हिंदची सेना आहे, हे ते विसरले होते. आपण आतंकवाद्यांचे पंख छाटले आहेत. आतंकवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते येथील वायूदलाच्या तळाला भेट दिल्यावर सैनिकांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

या वायूदलावर ड्रोनद्वारे आक्रमण करून ‘एस्-४००’ हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केल्याचा दावा पाकने केला होता. भारताने हा दावा फेटाळला होता. पाकला हेच दाखवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी या तळाला भेट देऊन या तळाची पाक कोणतीही हानी करू शकला नाही, हे दाखवून दिले. पंतप्रधान मोदी यांनी या वेळी सैनिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

पंतप्रधान मोदी यांनी या वेळी सैनिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की,

१. भारत ही भगवान बुद्धाची भूमी आहे, तसेच ती गुरु गोविंदसिंह यांचीही भूमी आहे. भारताकडे डोळे वटारून बघितले, तर त्याचा विनाश होणार.

२. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला धूळ चारली. भारतीय सैनिक हे नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा बनले आहेत. सैनिकांनो, तुमच्या पराक्रमामुळे आज ‘ऑपरेशन सिंदूर’चा आवाज प्रत्येक कानाकोपर्‍यात घुमत आहे. या कारवाईच्या वेळी प्रत्येक भारतीय तुमच्या समवेत होता. प्रत्येक भारतियांची प्रार्थना तुमच्यासमवेत होती. आज प्रत्येक नागरिक सैनिक आणि त्यांचे कुटुंब यांच्याप्रती कृतज्ञ आहे, त्यांचा ऋणी आहे.

३. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही सामान्य सैन्य मोहीम नाही. ही भारताची नीती, शुद्ध हेतू आणि निर्णायक क्षमता यांचा त्रिवेणी संगम आहे.