Indian Army Press Conference : भीती निर्माण केल्याखेरीज प्रेम निर्माण होऊ शकत नाही !

भारतीय सैन्यदलांची रामचरितमानसमधील काव्याचा संदर्भ देत पाकिस्तानला चेतावणी

नवी देहली – ‘बिनय न मानत जलधि जड, गए तीनि दिन बीति। बोले राम सकोप तब, भय बिनु होइ न प्रीति’ (३ दिवस उलटून गेले, तरी महासागराने श्रीरामाची विनंती स्वीकारली नाही, तेव्हा भगवान श्रीराम रागात म्हणाले की, भीती निर्माण केल्याविना प्रेम निर्माण होऊ शकत नाही.) अशा शब्दात भारतीय संरक्षणदलांनी पाकिस्तानला चेतावणी दिली आहे. आता विनंती नाही तर युद्ध होईल. ‘समजदार के लिए इशारा काफी है,’ असे सांगत ‘कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान आले, तर त्याचा सामना करण्यास आम्ही सिद्ध आहोत. आम्हाला बोलायची आवश्यकताही नाही. तुम्ही स्वत: पाहिले आहे’, असेही संरक्षणदलांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला लेफ्टनंट जनरल राजीव घई, व्हाईस ॲडमिरल ए.एन्. प्रमोद आणि एअर मार्शल अवधेश कुमार भारती उपस्थित होते. काल या तिघांकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यानंतर पाकच्या सैन्याकडून रात्री उशिरा पत्रकार परिषद घेण्यात आली होती. आज १२ मे या दिवशी दुपारी भारत आणि पाक यांच्या सैन्याअधिकार्‍यांमध्ये युद्धविरामाविषयी चर्चा होणार होती; मात्र ती पुढे ढकलल्यानंतर भारतीय संरक्षणदलांनी पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात माहिती दिली.

१. भारताचे डीजीएमओ (‘डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन’ – सैनिकी कारवाईचे महासंचालक) तथा लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पाकला चेतावणी देतांना म्हटले की, पुढची लढाई झाली, तर ती वेगळी असेल. मागच्या लढाईसारखी नसेल; कारण तंत्रज्ञान पुष्कळ प्रगत होत आहे.

२. ते पुढे म्हणाले की,  देव करो पण लढाई होऊ नये; मात्र कोणत्याही प्रसंगासाठी आम्ही सिद्ध आहोत. आम्ही तोंड द्यायला सशक्त आहोत. आमची लढाई आतंकवाद आणि आतंकवादी यांच्या विरोधात होती. त्यामुळे आम्ही ७ मे या दिवशी केवळ आतंकवाद्यांवर आक्रमण केले. पाकिस्तानने आतंकवाद्यांना साथ दिली.

३. गेल्या बर्‍याच वर्षांपासून सैन्य, तसेच सामान्य नागरिकांवरही आक्रमणे करण्यात आली. गेल्या काही दिवसांत आतंकवाद्यांची कारवायांची पद्धत पालटली आहे. या वर्षाच्या एप्रिल महिन्यात पहलगाम येथील पर्यटकांवर आक्रमण करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये शिवखोरी मंदिरात जाणार्‍या भाविकांवरील आक्रमणे धोकादायक होते. पहलगामचे आक्रमण म्हणजे पाकिस्तानचा पापाचा घडा भरल्याचे द्योतक होते, असेही ते म्हणाले.

पाकच्या हानीला पाकचे सैन्यच उत्तरदायी !

एअर मार्शल अवधेश कुमार भारती म्हणाले की, भारताच्या कारवाई पाकचे जी हानी झाली आहे, त्याला पाकचे सैन्यच उत्तरदायी आहे. आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेला  भेदणे पाकला अशक्य होते.  भारतीय सैन्य दलांकडे अनेक थरांची हवाई संरक्षणयंत्रणा आहे. यात सैन्यदल, नौदल आणि वायूदल यांची यंत्रणा आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.