India Pakistan Ceasefire : पाकला धडा शिकवण्याची पुन्हा संधी मिळणार नाही !

भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर निवृत्त सैन्यदलप्रमुख आणि विश्लेषक यांचे मत

नवी देहली – भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्वविराम झाल्यानंतर संरक्षणतज्ञ, तसेच भारतीय सैन्याचे निवृत्त अधिकारी यांनी त्यांची मते मांडली आहेत. या मतांमध्ये युद्धविराम अनपेक्षित होता आणि आता भारताला पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी मिळाली होती, असा सूर दिसून आला.

भविष्यात दुसरी कोणतीही संधी नाही ! – जनरल मनोज नरवणे, निवृत्त सैन्यदलप्रमुख

भूमी, समुद्र आणि आकाश यांद्वारे करण्यात येणारी कारवाई थांबवणे ही एक अतिशय स्वागतार्ह घटना आहे. तथापि दीर्घकालीन शाश्वत उपाय शोधण्यासाठी आपल्याला इतर आघाड्यांवर दबाव कायम ठेवावा लागेल.

आपण घटनांवर आधारित प्रतिक्रिया देऊ शकत नाही आणि आतंकवादी आक्रमणांमध्ये जीव गमावू शकत नाही. हे तिसरे आक्रमण आहे. भविष्यात दुसर्‍या कोणत्याही संधीची शक्यता नाही.

भारताच्या कारवाईचा कोणता लाभ झाला, हे भविष्यावर सोडतो ! –  वेद मलिक, निवृत्त सैन्यदलप्रमुख

२२ एप्रिल या दिवशी पहलगाम येथे झालेल्या भयानक आतंकवादी आक्रमणानंतर  पाकिस्तानच्या कृतींमुळे जर भारताला कोणता राजकीय-सामरिक लाभ झाला असेल, तर तो विचारण्यासाठी आम्ही भविष्यावर सोडतो.

विजयाच्या जबड्यातून पराभव हिसकावून घेणे ही भारतीय राजकारणाची परंपरा ! – संरक्षण विश्लेषक ब्रह्मा चेल्लानी यांची उपरोधिक टीका

विजयाच्या जबड्यातून पराभव हिसकावून घेणे ही भारतीय राजकीय परंपरा बर्‍याच काळापासून आहे. त्याची उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत  –

वर्ष १९४८ : भारतीय सैन्य विजयाच्या दिशेने जात असतांना भारताने जम्मू-काश्मीरचे सूत्र संयुक्त राष्ट्रांकडे नेऊन नंतर युद्धबंदीला सहमती दिली.

वर्ष १९५४ : कोणत्याही देवाणघेवाणीविना भारताने तिबेटमधील आपले अतिरिक्त प्रादेशिक अधिकार सोडून दिले आणि ‘चीनचे तिबेट क्षेत्र’ अशी तिबेटला ओळख मिळाली.

वर्ष १९६० : भारताने सिंधु नदीच्या खोर्‍यातील चार-पंचमांश पाणी आपल्या कट्टर शत्रू पाकिस्तानसाठी राखीव ठेवण्याचा करार केला.

वर्ष १९६६ : भारताने अत्यंत धोरणात्मक हाजी पीर भाग पाकिस्तानला परत केला, ज्याने १९६५ चे युद्ध चालू केले होते, जे नंतर पाकिस्तानसाठी भारतात आतंकवाद्यांना घुसवण्यासाठी एक केंद्र बनले.

वर्ष १९७२ :  भारताने शिमला करारातून पाकिस्तानकडून काहीही न मिळवता वाटाघाटीच्या टेबलावर युद्धातून मिळालेले लाभ पाकला परत केले.

वर्ष २०२१ : वर्ष २०२० मध्ये लडाखमधील महत्त्वाच्या सीमावर्ती भागांत चीनने केलेल्या गुप्त अतिक्रमणानंतर, भारताने मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कैलास टेकड्या रिकामे केल्या. या टेकड्या इतक्या महत्त्वाच्या होत्या की, वाटाघाटींमध्ये चीनवर दबाव आणण्यासाठी भारताकडे एकमेव सशक्त सूत्र होते. नंतर लडाखच्या काही भागांत चीनने रचना केलेल्या ‘बफर झोन’ला (तटस्थ क्षेत्र जे शत्रूराष्ट्रांना वेगळे करण्याचे काम करते, त्याला) मान्यता दिली.

वर्ष २०२५ : पाकिस्तानने ४ दशकांपासून चालू केलेले ‘सहस्रो जखमांचे युद्ध’ संपवण्यासाठी भारताने ’ऑपरेशन सिंदूर’ प्रारंभ केले; परंतु कोणतेही स्पष्ट उद्दिष्ट साध्य न होता ३ दिवसांनी ते रहित करण्यात आले.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानकडून गेली साडेतीन दशके भारताच्या विरोधात जिहादी आतंकवाद चालू असतांना भारताने कधीही तो मुळासकट नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. आता ती संधी असतांना युद्धविराम करणे, हे जनतेला अनपेक्षित होते. यातून पाकपुरस्कृत आतंकवाद संपलेला नाही आणि तो हिंदूंचे रक्त सांडत रहाणार, हे कटू सत्य कायम रहाते !