Operation Sindoor : ऑपेरेशन सिंदूर चालूच : भारताकडून पाकची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त !

  • पाकचे भारताच्या १५ सैन्य तळांवरील क्षेपणास्त्र आक्रमण भारताने हवेतच केले नष्ट

  • भारताच्या एस्-४०० हवाई संरक्षण प्रणालीचे मोठे यश

  • भारताने पाकमधील ९ शहरात ड्रोनद्वारे केले आक्रमण

  • जम्मू, पंजाब आणि राजस्थान येथे पाकचे अनेक ड्रोन भारताने पाडले !

  • भारतात घुसलेली पाकची ३ लढाऊ विमानेही पाडली !

नवी देहली – पाकिस्तानने ७ मेच्या रात्रीनंतर ८ मेच्या रात्रीही भारतावर ड्रोनद्वारे आक्रमण केले; मात्र भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली ‘एस् -४००’कडून या ड्रोन विमानांना हवेतच उडवून देण्यात आले. जम्मू विमानतळ, अखनूर, उधमपूर, आर्.एस्. पुरा, सांबा; पंजाबमधील पठाणकोट आणि राजस्थानच्या जैसलमेर येथे पाककडून ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले होते. जम्मू विमानतळावर ८ ड्रोन पाठवण्यात आले होते ते सर्व हवेतच नष्ट करण्यात आले. तसेच पठाणकोट विमानतळावर आक्रमणासाठी आलेले पाकचे ड्रोन पाडण्यात आले. एकूण ३० हून अधिक ड्रोनद्वारे हे आक्रमण करण्यात आले होते. याच वेळी पाकची २ जे एफ्-१७ विमाने, तर १ एफ् १६ विमान अशी ३ लढाऊ विमाने भारताकडून पाडण्यात आल्याचे वृत्त आहे. यापूर्वी बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकचे ‘एफ्-१६’ लढाऊ विमान भारतचे वैमानिक अभिनंदन यांनी पाडले होते.

१. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, ८ मेच्या सकाळी पाकिस्तानने केलेल्या आक्रमणानंतर भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणाली यांना लक्ष्य करण्यासाठी ‘हार्पी ड्रोन’चा वापर केला. भारताची कारवाई पाकिस्तानच्याच क्षेत्रात आणि त्याच वेगाने करण्यात आली.

२. इस्लामाबाद, लाहोर, सियालकोट, रावळपिंडी, गुजरानवाला, कराची येथील हवाई संरक्षण प्रणाली नष्ट झाली. यात रावळपिंडी येथील स्टेडियमची हानी झाल्याचे वृत्त आहे.

३. पंजाबमधील अमृतसरमध्ये ७ मेच्या रात्री स्फोटांचे आवाज ऐकू आले. ८ मेच्या सकाळी येथील दुधाला, जेठुवाल आणि पंढेर या ३ गावांच्या शेतात या रॉकेटचे अवशेष पडलेले आढळले. हे रॉकेट पाकिस्तानकडून डागण्यात आले होते आणि भारतीय संरक्षण यंत्रणेने पाडली होती.

 

श्रीनगर, जम्मू, अवंतीपोरा, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंडीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या १५ ठिकाणी असणार्‍या भारतीय सैन्याच्या तळांवर पाक आक्रमण करणार होता.

रशिया आणि अमेरिका यांचे तंत्रज्ञान चोरून चीनने बनवली ‘एच्क्यु-९’ संरक्षण प्रणाली

भारताने पाकिस्तानची नष्ट केलेली एचक्यु-९ ही हवाई संरक्षण प्रणाली चीनने रशिया आणि अमेरिका यांचे तंत्रज्ञान चोरून बनवलेली आहे. चीनने रशियाची एस्-३०० प्रणाली आणि अमेरिकेची ‘पॅट्रियट’ प्रणालीचे तंत्रज्ञान चोरून ही प्रणाली विकसित केली आहे. चीनने दावा केला की, एच्क्यु-९ची मारक क्षमता १२० ते २५० किलोमीटर आहे.

‘एस-४००’ प्रणाली ६०० कि.मी. अंतरावरील लक्ष्याला करू शकते नष्ट !

भारताने रशियाकडून खरेदी केलेली ‘एस्-४००’ ही हवाई संरक्षण प्रणाली हवेतून होणारी आक्रमणे हवेतच रोखते आणि नष्ट करते. या यंत्रणेद्वारे क्षेपणास्त्रे, ड्रोन, रॉकेट लाँचर आणि लढाऊ विमाने यांद्वारे होणारी आक्रमणे रोखली जातात. ही प्रणाली ६०० कि.मी. अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा मागोवा घेऊ शकते आणि त्याची लक्ष्य भेदण्याची श्रेणी ४०० कि.मी. आहे. ही जगातील सर्वांत आधुनिक हवाई संरक्षण प्रणाली आहे. भारताने ही सीमेवर तैनात केली आहे.

हार्पी ड्रोन म्हणजे काय?

‘हार्पी ड्रोन’ हे इस्रायल-निर्मित मानवरहित हवाई वाहन आहे, जे ‘इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज’ने विकसित केले आहे. हे प्रामुख्याने शत्रूची रडार प्रणाली आणि हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यासाठी बनवण्यात आलेले आहे. हे ड्रोन पाळत ठेवण्यास आणि अचूक आक्रमण करण्यास सक्षम आहे, ज्यामुळे ते सैनिकी कारवायांमध्ये एक प्रभावी शस्त्र बनते. हार्पी ड्रोनला ‘फायर अँड फरगेट मिसाईल’ असेही म्हणतात; कारण आक्रमण केल्यानंतर हे ड्रोन नष्ट होते. भारताने वर्ष २००० मध्ये इस्रायलकडून हे ड्रोन खरेदी केले आहेत.

पंजाबमध्ये सैन्याने घुसखोराला ठार मारले

७ मे रोजी रात्री अंधाराचा लाभ घेत पाकमधून भारताच्या पंजाबमधील फिरोजपूर येथील सीमेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या एका व्यक्तीला सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी गोळ्या झाडून ठार मारले.

नेपाळ सीमेवर ४ चिनी नागरिकांना अटक

बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील रक्सौल सीमेवर ४ चिनी नागरिकांना अटक करण्यात आली. ते अवैधपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्याकडे व्हिसा नव्हता. सशस्त्र सीमा दलाने त्यांना अटक केली.