
कर्नाटकातील मंगळुरू येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते सुहास शेट्टी यांची समाजकंटकांकडून हत्या करण्यात आली. सुहास शेट्टी हे त्यांच्या चारचाकीतून जात असतांना त्यांना अन्य चारचाकीतून आलेल्या आरोपींनी थांबवून घातक शस्त्रांनी त्यांच्यावर वार करून त्यांची हत्या केली. याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये पुष्कळ प्रमाणात संतापाचे वातावरण आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वीच अशरफ या मुसलमानाने पाकच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यामुळे जमावाकडून झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. हिंदुत्वनिष्ठ प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येतील आरोपी फाजिल याच्या हत्येत सुहास हे आरोपी होते. त्यामुळे सुहास शेट्टी यांची हत्या ही सूडभावनेतून केल्याची शक्यताच अधिक व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे मंगळुरू येथे तणाव निर्माण झाला आहे.
कर्नाटक येथे हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या थांबण्याचे नावच घेत नाहीत. प्रत्येक काही महिन्यांनी या हत्या होत आहेत. हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणारे आरोपी धर्मांधच आहेत आणि त्यांच्यापैकी कुणाला लवकर शिक्षा होत नाही अन् त्या काँग्रेसच्या सत्ताकाळातच अधिक होतात, हेसुद्धा वास्तव आहे. आताही कर्नाटकमध्ये धर्मांधांचे लांगूलचालन करणारे काँग्रेसचे सरकार आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात धर्मांधांना काहीही करण्याची मुभा आहे. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होणे तर दूरच; पण काँग्रेसकडून या हत्यांचा निषेधही व्यक्त करण्यात येत नाही. काँग्रेसच्या राजवटीत तेथे प्रसिद्ध होणार्या बातम्यांमध्ये आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या दृष्टीने हिंदुत्वनिष्ठांचे वर्णन ‘रावडी’, म्हणजेच ‘गुंड’ असे करण्यात येत आहे. यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या हिंदुत्वनिष्ठांविषयी सहानुभूतीही निर्माण होऊ नये, याची काळजी घेतली जाते. गुन्हा करूनही धर्मांधांविषयी जी सहानुभूती काँग्रेस निर्माण करते, तशी हिंदूंच्या मृत्यूंनंतरही हिंदूंच्या लेखी नसते, म्हणजे हिंदुत्वनिष्ठांसाठी कर्नाटकमध्ये कार्य करणे आणि वास्तव्य यांसाठी धोकादायक स्थान बनले आहे. काँग्रेसचे सरकार आणि कायदा-सुव्यवस्था यांचे कधीच जमत नाही. काँग्रेस सत्तेत आली की, कायदा-सुव्यवस्था बिघडलीच म्हणून समजावे. काँग्रेसच्या काळात धर्मांधांना पोलिसांचा धाक नसतो, तर हिंदूंनाच धर्मांधांचा धाक असतो. धर्मांधांना जे प्रिय आणि हवे तेच केले जाते. क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती हे त्याचे चांगले उदाहरण आहे. हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदू यांचा तीव्र विरोध असतांना क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा काँग्रेसने खटाटोप केला अन् त्या वेळी गोंधळ अन् दंगलसदृश परिस्थिती होऊन एका हिंदूला प्राण गमवावे लागले. याचाच अर्थ हिंदूंचा कितीही विरोध असला, तरी जे मुसलमानांना हवे तेच कोणत्याही परिस्थितीत करण्याचा काँग्रेसचा अट्टहास असतो. भले हिंदूंना त्रास झाला, तरी चालेल, तो त्रास सहन करणे, हे हिंदूंचे कर्तव्य आहे, या आविर्भावात हिंदूंचा विरोध मोडून काढण्यात येतो. हिंदूंवर लाठी उगारली जाते.
हिंदुद्वेषी काँग्रेस !

कर्नाटक येथे ५ वर्षांनी काँग्रेस आणि पुन्हा ५ वर्षांनी भाजपचे सरकार सत्तेवर येते. अनुमाने २ दशकांपूर्वी कर्नाटक येथे सुखानंद शेट्टी या भाजपच्या प्रसिद्ध नेत्याची हत्या अत्यंत निर्घृण पद्धतीने झाली होती. यामध्ये त्यांचे हात-पाय तोडले होते, त्यांच्या शरिरावर पुष्कळ घाव करण्यात आले होते. तेव्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते. त्यामुळे आक्रमणकर्त्या धर्मांधांना पकडण्यात आल्यावर ते त्वरित जामिनावर सुटलेही ! त्या वेळी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (‘पी.एफ्.आय.’ – या संघटनेवर केंद्र सरकारने आता बंदी घातली आहे.) या धर्मांधांच्या संघटनेचे नाव पुढे आले होते. त्यानंतर अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या ज्यामध्ये बजरंग दल, विश्व हिंदु परिषद आणि अन्य काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते अन् नेते यांच्या हत्या करण्यात आल्या. संबंधित धर्मांधांना अटक केली जाते, नंतर पुन्हा त्यांना त्वरित जामीन मिळतो. आता प्रवीण नेट्टारू यांचेच उदाहरण घेतल्यास त्यांची हत्या ‘पी.एफ्.आय.’ने भाजप सरकारच्या काळात केली. भाजपच्या बोम्मई यांच्या सरकारने नेट्टारू यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नीला तात्पुरत्या स्वरूपाची सरकारी नोकरी आणि नवीन घर बांधण्यासाठी कुटुंबियांना पैसे दिले. तेवढा तरी भाजपने आधार दिला. काँग्रेसचे काय ? काँग्रेसने ‘पी.एफ्.आय. वर बंदी घालू’, असे सांगितले होते, त्याचे पुढे काय झाले ? काँग्रेस सत्तेवर आल्यावर तिने त्याविषयी काही वाच्यता केली नाही आणि बंदी घालण्यासाठी कृती किंवा काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे काँग्रेसने केवळ दाखवण्यासाठी किंवा आम्हीही धर्मांधांना विरोध करत आहोत, यासाठी दिखाव्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसला हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु यांचे नेहमीच वावडे आहे. श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांना शिवमोग्गा येथे येण्यास बंदी घातली, अन्य एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या नेत्याला अटक केली. श्री. प्रमोद मुतालिक यांना ते केवळ हिंदुत्वाचे कार्य करतात; म्हणून त्रास देण्याचा काँग्रेसने पुष्कळ वेळा प्रयत्न केला आहे. हिंदुत्वनिष्ठांना प्रतिबंधात्मक आदेशान्वये कह्यात घेणे, म्हणजे ‘हिंदुत्वनिष्ठ एखाद्या भागात गेल्यामुळे तेथे दंगल होईल, गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल, कायदा-सुव्यवस्था बिघडेल’, असे काँग्रेसला वाटते. धर्मांधांविषयी अशा प्रकारची काहीच भूमिका का नाही ? कुणा धर्मांध संघटनेच्या नेत्याला, एखाद्या मौलवीला प्रतिबंधात्मक अटक कधी केली आहे का ? ‘हिजाब बंदी’ला काँग्रेसने विरोध केला. ‘हिजाब जणू मुलींचा गणवेशाचा भाग’, असे सांगत काँग्रेसने हिजाबचे समर्थन केले. जिथे विदेशात म्हणजेच मुसलमान देशांमध्ये हिजाबला विरोध होत आहे, काही मुसलमान देशांनी ‘हिजाब बंदी’ केली आहे, असे असतांना काँग्रेस मात्र जुन्या मानसिकतेत आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या नगरसेवकांची मुलगी नेहा हिरेमठ यांची एकतर्फी प्रेमातून हत्या करणारा धर्मांध असतांना त्याला वाचवण्यासाठी नगरसेवक वडिलांना गप्प बसण्यास आणि आरोप करण्यास थांबवण्याविषयी सांगण्यात आले. स्वत: नगरसेवक वडिलांनी ही हतबलता माध्यमांसमोर सांगितली. तेव्हा काँग्रेस लांगूलचालनाची किती परिसीमा गाठू शकतो, हे लक्षात येते. अशा काँग्रेसकडून न्यायाच्या अथवा कायद्याच्या किंवा भीतीमुक्त राज्याची कधीही अपेक्षा करू शकतो का ? गुन्हेगार, धर्मांध यांना राजाश्रय देणारी काँग्रेस सत्तेवर आल्यावर हत्या, घोटाळे, विनयभंग, हिंदूंवर आक्रमणे यांमध्ये वाढच होणार, यामध्ये संशय नाही. त्यामुळे कर्नाटकातील हिंदूंना अशा काँग्रेसला सत्तेवर बसवल्याचा पश्चात्ताप तरी होणार आहे का ? पुढे काँग्रेस कधीच सत्तेत येऊ नये, यासाठी हिंदूंकडून प्रयत्न होणार आहेत का ? हा प्रश्न आहे !
काँग्रेसची राजवट, म्हणजे ‘हिंदूंवर आक्रमण आणि धर्मांधांना संरक्षण’, असे म्हटल्यास नवल ते काय ! |