प्रभु रामचंद्रांनी अयोध्येवर १० सहस्र वर्षे रामराज्य केले. प्रभूंना त्यांचे अवतारकार्य संपवण्याची आठवणच राहिली नाही. सर्व देव चिंतातुर झाले. भगवान विष्णूंना वैकुंठात परत आणणे आवश्यक होते. सर्व देव यमराजाकडे गेले. त्याच्यावर ही कामगिरी सोपवली; परंतु यमाने हे कार्य करण्यास स्पष्ट नकार दिला. ‘जोपर्यंत हनुमान अयोध्येत आहे, तोपर्यंत मी त्या नगरीत पाऊलही टाकू शकत नाही’, असे त्याने सांगितले. शेवटी सर्व देवांनी हे दायित्व काळावर सोपवले. त्याने ते मान्य केले.
काळाने एकांतात भेट घेऊन श्रीरामांना अवतारकार्य संपवण्याची विनंती करणे !
काळालाही हनुमंताची भीती होतीच; म्हणून त्याने साधूचा वेष घेतला. समवेत दुर्वासमुनींना घेतले. दोघेही अयोध्येत आले. काळ राजवाड्यात आला. त्याने रामरायांना भेटण्याची इच्छा प्रगट केली. प्रभु रामरायांनी त्याला ओळखले. काळाने एकांतात बोलण्याची विनंती केली. रामरायांनी महालाच्या एका खोलीत त्याला नेले. लक्ष्मणाला दारात पहारा देण्यासाठी उभे केले. कुणालाही आत न सोडण्याची आज्ञा केली. ‘आज्ञा मोडणार्याला मृत्यूदंड दिला जाईल’, असे बजावले. लक्ष्मण पहारा देत उभे राहिला. काळाने एकांतात भगवंतांना त्यांचे अवतारकार्य संपवण्याची विनंती केली. ‘प्रत्येक जन्माला आलेल्या जिवाला मृत्यू अटळ आहे’, या सत्याची आठवण करून दिली.
दुर्वासमुनींनी श्रीरामांची भेट घेण्याचा आग्रह धरल्याने लक्ष्मणापुढे धर्मसंकट उभे रहाणे
प्रभूंनी काळाला त्यांची विवषता बोलून दाखवली. ‘लक्ष्मण आणि हनुमंत यांच्या भक्तीने मी बांधलो गेलो आहे, ते मला अवतार संपवू देणार नाहीत’, असे श्रीरामांनी काळाला सांगितले. ‘लक्ष्मणाला बाजूला करण्याची योजना मी केली आहे’, असे काळाने सांगितले. ते दायित्व दुर्वासमुनींना दिल्याचे काळाने श्रीरामांना सांगितले. ‘तुम्ही हनुमंताला बाजूला करा’, अशी विनंती केली. प्रभूंनी त्यास होकार दिला. तोपर्यंत दुर्वासमुनी तिथे आले. त्यांनी दारावर पहारा देणार्या लक्ष्मणास ‘श्रीरामांना भेटायचे आहे’, असे सांगितले. लक्ष्मणाने नकार दिला. प्रभूंची आज्ञा सांगितली; पण दुर्वासमुनी ऐकेनात. ते अत्यंत क्रोधित झाले. ‘भेट नाकारणार्या श्रीरामास आता मी शापच देतो’, असे म्हणू लागले. लक्ष्मणापुढे धर्मसंकट उभे राहिले.
श्रीरामांनी लक्ष्मणाला अयोध्येबाहेर जाण्यास सांगणे !
‘दुर्वासमुनींना आत जाऊ द्यावे, तर बंधूआज्ञेचे उल्लंघन होईल आणि त्यांना मृत्यूदंडाला सामोरे जावे लागेल. न जाऊ द्यावे, तर पितृतुल्य बंधूंना मुनी शाप देतील’, असा यक्ष प्रश्न लक्ष्मणासमोर उभा राहिला. शेवटी लक्ष्मणाने स्वतःच मृत्यूला सामोरे जाण्याचे ठरवले. ‘रामरायांना विचारून येतो’, असे म्हणून लक्ष्मणाने स्वतःच आज्ञा मोडून खोलीत प्रवेश केला. इकडे दुर्वासमुनी गुप्त झाले. लक्ष्मणाला पहाताच श्रीरामचंद्रांनी त्याला त्यांच्या आज्ञेची आठवण करून दिली; परंतु ‘दुर्वासमुनी आल्यामुळे आज्ञा मोडावी लागली’, असे लक्ष्मणाने सांगितले. प्रभूंनी त्याला मृत्यूदंड घेण्यास सांगितले. ‘तू अयोध्येच्या बाहेर निघून जा. हाच तुला मृत्यूदंड !’ असे श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगितले. समोर प्रत्यक्ष काळाला बसलेले पाहून लक्ष्मण काय समजायचे, ते समजला. राजमहालाच्या बाहेर पडून लक्ष्मण शरयू नदीच्या तीरावर गेला. शरयू नदीत त्याचा देह त्यागून आपल्या मूळ स्वरूपात, म्हणजे पुन्हा शेष होऊन प्रभूंच्या येण्याची वाट पहात बसला. इकडे प्रभु श्रीरामचंद्रांचा काळाने निरोप घेतला.
हनुमंताला अंगठी काढण्याच्या बहाण्याने थेट पाताळात पाठवणे !
प्रभु खोलीच्या बाहेर आले. त्यांनी त्यांच्या हातातील अंगठी काढली. महालाच्या दोन दगडी फरशांमध्ये एक छोटीशी फट होती, त्या फटीत ती अंगठी टाकली. हनुमंताला बोलावून आणण्याची आज्ञा केली. हनुमंत आला. प्रभूंनी त्यास अंगठी फटीत अडकल्याचे सांगितले. हनुमान अंगठी काढू लागला; पण फट लहान असल्याने अंगठी काही केल्या निघेना. मग हनुमंताने सूक्ष्मरूप घेतले आणि तो त्या फटीत गेला. पण ती फट म्हणजे एक सुरंग (भुयार) होता. त्या फटीतून हनुमंत थेट पाताळात गेले !
श्रीरामांनी शरयूत जाणे आणि हनुमंताला पाताळात सत्य समजल्यावर वायूवेगाने शरयूतीरावर येणे !
इकडे ‘लक्ष्मणाचा वियोग सहन होत नाही, म्हणून मी आता शरयूमध्ये जातो’, असे श्रीरामांनी सर्व प्रजेला सांगितले. प्रजाजन रडू लागले. शोक करू लागले. रस्ता अडवू लागले. प्रभु मात्र कुणाचे ऐकेनात. शेष त्यांची वाट पहात होता. प्रभु शरयूतीरावर आले. सर्व प्रजाही समवेत आली. ज्या मार्गाने लक्ष्मण गेला, त्याच मार्गाने प्रभूंनीही प्रवेश केला आणि ते पाण्यात नाहीसे झाले. इकडे हनुमंत पाताळात पोचला. वासुकीने त्याचे स्वागत केले आणि येण्याचे कारण विचारले. ‘प्रभूंची अंगठी शोधण्यासाठी येथे आलो’, असे हनुमंताने सांगितले. वासुकीने त्याला अंगठ्यांचा ढीग दाखवला आणि ‘यातून प्रभूंची अंगठी शोधून घेऊन जा’, असे सांगितले; परंतु त्यात सगळ्या अंगठ्या सारख्याच होत्या. त्यामुळे हनुमंतापुढे संभ्रम निर्माण झाला. तेव्हा खरी गोष्ट वासुकीने त्याला सांगितली. ‘आपले प्रभु आपल्याला सोडून जात आहेत’, हे ऐकून हनुमंत मनोवेगाने शरयूतीरावर आला. सर्व प्रजाजन शोक करीत होते.
हनुमंताच्या विनंतीवरून महाविष्णूने साक्षात् दर्शन देणे !
हनुमंतालाही अनावर असा शोक झाला. त्याने प्रभूंना दर्शन देण्याची विनंती केली. तेव्हा शरयूतून शेषावर पहुडलेले भगवान महाविष्णु साक्षात् प्रगट झाले ! सर्व प्रजेला आनंद झाला ! सर्वांनी भगवंताचे दर्शन घेतले ! ‘माझे कार्य संपल्यामुळे मी वैकुंठी जात आहे, कुणीही शोक करू नका’, असे प्रभूंनी सांगितले. ‘माझे दोन्हीही पुत्र आणि बंधूंचे पुत्र यांच्याकडे राज्यव्यवस्था लावून दिली आहे. त्यांच्या आज्ञेत सुखाने रहा’, असा आशीर्वाद दिला. हनुमंत प्रभूंसमवेत येण्याचा हट्ट धरू लागला. प्रभूंनी त्याला त्याच्या चिरंजीवित्वाची आठवण करून दिली. अयोध्येच्या रक्षणाचे दायित्व त्याच्यावर सोपवले. सर्वांचा निरोप घेऊन प्रभूंनी वैकुंठाला गमन केले !
भगवान विष्णूंनी श्रीरामाच्या अवतराच्या रूपाने भूवासियांसमोर एक ‘आदर्श’ ठेवला !
स्थूलातून दशरथपुत्र ‘अयोध्येचा राजा राम’ हे भूतलावरील राजा होते, हे खरे आहे; परंतु ही झाली स्थूल दृष्टी ! घोर तपश्चर्येमुळे आणि भगवान शंकरांच्या वरामुळे रावणाला प्रचंड दीर्घायु लाभले होते. त्याच्या दुष्कृत्यांमुळे ऋषिमुनींकडून देवांना मिळणारे अर्घ्य बंद झाले आणि त्याने यज्ञांत आणलेल्या विघ्नांमुळे यज्ञातून मिळणार्या आहुती बंद झाल्या ! देवलोकात सर्वत्र हाहा:कार उडाला ! ब्रह्मदेवाच्या योजनेप्रमाणे भगवान विष्णूंनी ‘सद्रक्षणाय खलनिर्दालनाय ।’ (सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश यासाठी) माता कौसल्येच्या पोटी रामाच्या रूपाने अवतार धारण केला.
श्रीरामरूपातील विष्णूंनी या अवतारात ‘आदर्श’ पुत्र, पती, बंधू आणि राजा, तसेच दुष्टांच्या दुष्टप्रवृत्तींचा संहारक म्हणून त्यांची सर्व कर्तव्ये परिपूर्णपणे यथास्थितपणे पार पाडली ! भूवासियांसमोर एक आदर्श ठेवला !
अवतारकार्य संपले !
भगवान विष्णूंचे रामावतारातील भूतलावरील कार्य संपले. उत्पत्ती, स्थिती आणि लय अथवा संहार ही ब्रह्मा, विष्णु, महेश यांची कार्ये ! भगवान विष्णूंवर संपूर्ण विश्वाचा, ब्रह्मांडाचा सांभाळ करण्याचे दायित्व ! त्यामुळेच भगवान विष्णूंना आता स्वगृही जाण्याचे वेध लागले; परंतु हे सांगितले असते, तर ते अयोध्येतील जनसामान्यांच्या अल्प बुद्धीला पेलवले नसते; म्हणून त्यांनी लक्ष्मणाच्या वियोगाचे निमित्त सांगितले !
– श्रीकांत जोशी, चिंचवड, पुणे