Bihar BJP MLA’s Appeal To Muslims : होळीच्या दिवशी मुसलमानांनी घरीच रहावे किंवा बाहेर पडल्यावर जर कुणी रंग लावला, तर वाईट वाटून घेऊ नये !

बिहारमधील भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर बचौल यांचे आवाहन

बिहारमधील भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर बचौल

पाटलीपुत्र (बिहार) – होळीच्या दिवशी मुसलमानांनी घरीच नमाजपठण करावे,  असा सल्ला उत्तरप्रदेशातील संभल जिल्ह्यातील मुख्य पोलीस अधिकारी अनुज चौधरी यांनी दिला आहे. बिहारमधील भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर बचौल यांनी या सल्ल्याचे समर्थन केले आहे. पत्रकारांशी बोलतांना हरिभूषण ठाकूर बचौल म्हणाले की, संभलचे पोलीस अधिकारी अनुज चौधरी यांनी जे काही म्हटले आहे, ते निश्चितच १०० टक्के योग्य आहे. मी बिहारमध्ये असेही आवाहन करतो की, वर्षभरात एकूण ५२ शुक्रवार असतात. या वेळी होळी शुक्रवारीच आहे. मुसलमानांनी या दिवशी घरीच रहावे किंवा जर ते बाहेर पडले, तर मोठ्या मनाने बाहेर पडावे. त्यांना जरी कुणी रंग लावला, तरी वाईट वाटून घेऊ नये. मुळात तेच रंग, पिचकार्‍या आदी गोष्टी होळीच्या पार्श्वभूमीवर विकतात; मात्र हाच रंग लागला, तर हिंसाचार करतात, हेही लक्षात घेतले पाहिजे.

जनता दल (संयुक्त) पक्षाचे नेते आणि मंत्री अशोक चौधरी यांचा आक्षेप

बिहार सरकारचे मंत्री आणि जनता दल संयुक्तचे नेते अशोक चौधरी यांनी आमदार हरिभूषण ठाकूर यांच्या विधानावर आक्षेप घेतला. ते म्हणाले की, हा देश सर्वांचा आहे, येथे प्रत्येक धर्माचे लोक एकमेकांचे सण आणि उत्सव आनंदाने साजरे करतात. यात कुणाला कोणताही आक्षेप नसतो. भाजपच्या आमदारांनी अशी विधाने टाळावीत. हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, त्याचा आमच्या सरकारशी काहीही संबंध नाही.