Kolkata Jadavpur University Protest : बंगालचे शिक्षणमंत्री ब्रात्य बसू आक्रमणात घायाळ

  • कोलकात्याच्या जादवपूर विद्यापिठात साम्यवादी विद्यार्थी संघटनांशी संबंधित गुंडांकडून हिंसाचार

  • विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांवरून झाला हिंसाचार

बंगालचे शिक्षणमंत्री ब्रात्य बसू याच्या गाडीवर आक्रमण (डावीकडे) घायाळ शिक्षणमंत्री ब्रात्य बसू (उजवीकडे)

कोलकाता (बंगाल) – येथील जादवपूर विद्यापिठात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि डाव्या विद्यार्थी संघटनांशी संबंधित गुंडांनी १ मार्च या दिवशी हिंसाचार केला. यात बंगालचे शिक्षणमंत्री ब्रात्य बसू आणि अनेक प्राध्यापक घायाळ झाले. विद्यापिठात विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका घेण्याच्या संदर्भात निदर्शने चालू असतांना हिंसाचार झाला.

निदर्शकांनी शिक्षणमंत्र्यांच्या गाडीवर आक्रमण करत गाडीचे टायर आणि खिडक्या फोडल्या. मंत्री म्हणाले की, त्यांच्यावर एक वीट फेकण्यात आली. त्यामुळे त्यांचा हात आणि चेहरा यांना दुखापत झाली. यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले.

१. शिक्षणमंत्री तृणमूल समर्थित प्राध्यापकांच्या संघटनेच्या वेबकूपरच्या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी विद्यापिठात आले होते. बैठक संपल्यानंतर ते बाहेर आले, तेव्हा डाव्या गुंडांनी त्याचा मार्ग अडवला. ‘चोर-चोर’ आणि ‘परत जा’ अशा घोषणा देण्यात आल्या. परिस्थिती इतकी बिकट झाली की, मंत्र्यांच्या गाडीसोबतच त्यांच्या सुरक्षेसाठी धावणार्‍या २ चारचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली. या काळात काही प्राध्यापकही लक्ष्य बनले. वेबकूपर सदस्य आणि प्राध्यापक ओमप्रकाश मिश्रा यांचा आक्रमणकर्त्यांनी पाठलाग केला. या हिंसाचारात एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर २ प्राध्यापकही घायाळ झाले. एका महिला प्राध्यापकाची साडी फाडल्याचाही आरोप आहे.

२. या घटनेवर ब्रात्य बसू म्हणाले की, आम्ही ठरवले असते, तर आम्ही पोलिसांना बोलावू शकलो असतो; पण मी एकाही पोलिसाला आवारात येऊ दिले नाही. जर हे उत्तरप्रदेशात घडले असते, तर कुठल्या विद्यार्थ्याने असे केले असते का ? आक्रमण करणारे केवळ  तृणमूलच्या लोकांना लक्ष्य करतात.

३. जादवपूर विद्यापिठातील तृणमूलशी संलग्न कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचे वृत्त आहे. मंत्र्यांच्या गाडीने एका विद्यार्थ्याला धडक दिल्याने तो घायाळ झाल्याचा आरोप आहे.

४. डाव्या विद्यार्थी संघटनांनी या हिंसाचारासाठी शिक्षणमंत्र्यांना उत्तरदायी ठरवले. त्यांनी म्हटले की, मंत्र्यांनी निदर्शक विद्यार्थ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला.

५. भाजपचे नेते अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीका करतांना म्हणाले की, आर्.जी. कर रुग्णालयातील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि नंतर हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे आणि शिक्षणमंत्र्यांवरील आक्रमण हा त्याचाच परिणाम आहे.

६. तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष म्हणाले की, आमच्या सहनशीलतेला दुर्बलता समजू नका. आक्रमण करणार्‍यांना लोकशाही पद्धतीने उत्तर दिले जाईल.

संपादकीय भूमिका

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यापासून तेथील कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीन तेरा वाजले आहेत; मात्र त्याविरोधात देशातील निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत !