पू. मुरारीबापू यांच्‍या हस्‍ते भारताचार्य पू. सुरेश गजानन शेवडे यांचा ‘व्‍यास पुरस्‍कारा’ने सन्‍मान !

भावनगर (गुजरात) येथे ‘तुलसी जयंती महोत्‍सव २०२४’चे आयोजन !

पू. मुरारीबापू  (डावीकडे) आणि ‘व्‍यास पुरस्‍कारा’समवेत भारताचार्य पू. सुरेश गजानन शेवडे

भावनगर (गुजरात) – येथील कैलास गुरुकुल, महुवा आश्रमात ‘तुलसी जयंती महोत्‍सव २०२४’चे आयोजन करण्‍यात आले होते. या निमित्ताने कथावाचक, संत-महंत आणि विद्वान, अभ्‍यासू मान्‍यवरांचे उद़्‍बोधन करून त्‍यांना पुरस्‍कार देण्‍यासाठी सत्‍कार समारंभाचे आयोजन करण्‍यात आले होते. यात ‘तुलसी’, ‘रत्नावली’, ‘व्‍यास’ आणि ‘वाल्‍मीकि’, असे पुरस्‍कार या वेळी विविध मान्‍यवरांना देण्‍यात आले. या कालावधीत ‘तुलसी साहित्‍य संगोष्‍टी समारंभ’ही पार पडला. त्‍या अंतर्गत चेंबूर (मुंबई) येथील भारताचार्य पू. सुरेश गजानन शेवडे यांना ‘व्‍यास पुरस्‍कारा’ने सन्‍मानित करण्‍यात आले. या वेळी पू. मुरारीबापू यांनी त्‍यांना सन्‍मानचित्र, रोख रक्‍कम, वस्‍त्र देऊन आणि हार घालून त्‍यांचा सन्‍मान केला.

या वेळी पू. शेवडेगुरुजी यांनी उपस्‍थित भक्‍तांना मार्गदर्शन केले. प्रसंगी उपस्‍थितांनी त्‍यांना भरभरून प्रतिसाद दिला. या वेळी उपस्‍थित अनेक भक्‍तांनी पू. शेवडेगुरुजी यांच्‍या समवेत छायाचित्रे काढली. या कार्यक्रमाला सहस्रो भक्‍तगण उपस्‍थित होते.

हिंदु हा ‘धर्म’ आहे, ‘रिलिजन’ (पंथ) नाही ! – भारताचार्य पू. शेवडेगुरुजी 

हिंदु हा ‘धर्म’ आहे, ‘रिलिजन’ नाही. ब्रिटिशांना धर्म ठाऊकच नव्‍हता. धर्म हा देवाने निर्माण केला आहे, तर ‘रिलिजन’ म्‍हणजे पंथ हा माणसाने निर्माण केला आहे. इस्‍लाम धर्म महंमद पैगंबरांनी, तर ख्रिस्‍ती धर्म जिझस ख्राईस्‍टने निर्माण केला; पण हिंदु धर्माचे संस्‍थापक कोण ? ज्‍याने विश्‍वाची निर्मिती केली, त्‍यानेच धर्म निर्माण केला. हिंदु धर्म हा ईश्‍वरनिर्मित आहे. वस्‍तू अन् पशू यांना धर्म आहे. ते त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या धर्मानुसार वागतात. मानवाने त्‍याच्‍या धर्मानुसार वागायला हवे. ‘वेद भगवंताने निर्माण केले’, असे म्‍हणणे चुकीचे आहे; कारण वेद म्‍हणजे साक्षात् भगवंतच आहे. वेदांमध्‍ये एकही वचन चुकीचे नाही.


उत्तम सेवा-साधना समजून घेण्‍यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमाला भेट द्या !

या वेळी भारताचार्य पू. सुरेश गजानन शेवडे म्‍हणाले, ‘‘मी आता येथून पुढे सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी (गोवा) येथील आश्रमामध्‍ये रहाणार आहे. आपण सर्वांनी या आश्रमाला अवश्‍य भेट द्यावी. उत्तम सेवा-साधना म्‍हणजे काय असते, ते सर्वांनाच सनातनच्‍या आश्रमात अनुभवता येईल. सनातन संस्‍थेने मला संतपद देऊन माझा सन्‍मान केला.’’

क्षणचित्र : भारताचार्य पू. सु.ग. शेवडेगुरुजी यांनी सनातन संस्‍थेने केलेल्‍या त्‍यांच्‍या संतसन्‍मान सोहळ्‍याची छायाचित्रे पू. मुरारीबापूंना दाखवली, तसेच त्‍याविषयीचा सविस्‍तर वृत्तांत सांगितला. (या वेळी पू. बापूंचे ‘मौनव्रत’ चालू होते. तुलसी जयंतीच्‍या दिवशी कार्यक्रमात समारोपीय मार्गदर्शन करतांना पू. मुरारीबापू यांनी मौनव्रत सोडले.)