वर्धा येथे मूकमोर्चा काढून बांगलादेशातील हिंसाचाराचा निषेध !

मोर्चात सहभागी धर्मप्रेमी

वर्धा, १७ ऑगस्ट (वार्ता.) – बांगलादेशामध्ये रहाणार्‍या अल्पसंख्य हिंदूंवर तेथील मुसलमानांकडून अनन्वित अत्याचार चालू आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून तेथील हिंदूंना संरक्षण द्यावे, तसेच वर्धा जिल्ह्यात विविध ठिकाणी रहाणार्‍या बांगलादेशी घुसखोरांच्या कागदपत्रांची शहानिशा करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या नेतृत्वात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मूकमोर्चा काढला. या मोर्चामध्ये हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या साधकांसह मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने प्रतिवर्षी १४ ऑगस्ट हा दिवस ‘अखंड भारतदिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून यादिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ झाला. शहरातील मुख्य भागातून मार्गक्रमण केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चाचा समारोप करण्यात आला.या वेळी विश्व हिंदु परिषदेचे श्री. अटल पांडे, श्रीराम मंदिराचे विश्वस्त श्री. संजीव लाभे, शिवसेनेचे श्री. तुषार देवढे, तसेच महाकाली शिक्षण संस्थेचे सचिव श्री. सचिन अग्निहोत्री यांनी विचार मांडले.

बांगलादेशातील हिंसाचाराच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

वरील मागणीसाठी मोर्चाच्या आदल्या दिवशी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने स्थानिक जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. ते उपजिल्हाधिकार्‍यांनी स्वीकारले. या वेळी मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.