Rahul Gandhi Insult to Hindus : हिंदूंचा अवमान केल्याविषयी हिंदु समाज योग्य वेळी राहुल गांधी यांचा सूड उगवेल ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डावीकडून एकनाथ शिंदे आणि राहुल गांधी

मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत हिंदु समाजाचा अवमान केल्याविषयी हिंदु समाज त्यांना कधीही क्षमा करणार नाही. गांधी यांनी केलेल्या आरोपाचा हिंदु समाज योग्य वेळी सूड उगवेल. त्यांना त्यांच्या वक्तव्याचे उत्तर निश्‍चित मिळेल, अशी चेतावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ जुलै या दिवशी विधानभवनाच्या प्रांगणात पत्रकारांशी बोलतांना दिली.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २ दिवसांपूर्वी हिंदु समाज हिंसक असल्याचे वक्तव्य केले होते. यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राहुल गांधी यांनी विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी हे वक्तव्य केले आहे. असे वक्तव्य करणे अत्यंत चिंताजनक आहे. हिंदु समाज सहिष्णु आणि संयमी आहेे. विरोधी पक्षांच्या टीकेकडे आम्ही विशेष लक्ष देत नाही. आधी हिंदूंवर आक्रमण करायचे, हिंदूंना ‘हिंसक’ म्हणायचे आणि नंतर वारीमध्ये सहभागी व्हायचे, हा राहुल गांधी यांचा दुटप्पीपणा आहे; मात्र आता देशातील हिंदू जागे झाले असून हा अवमान ते सहन करणार नाहीत.