सरकारी भूमीवरील मजारीचे रूपांतर मशिदीत होण्‍यापूर्वी थांबवले पाहिजे ! – अधिवक्‍ता खुश खंडेलवाल, संस्‍थापक, ‘हिंदु टास्‍क फोर्स’

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा सहावा दिवस – सत्र : अधिवक्‍त्‍यांचे नायायालयीन कार्य आणि संघर्ष

अधिवक्‍ता खुश खंडेलवाल

विद्याधिराज सभागृह – सर्व जिहादमधील सर्वांत धोकादायक ‘भूमी जिहाद’ (लँड जिहाद) आहे, तसेच या जिहादशी सर्व जिहाद संबंधित आहेत. याअंतर्गत ते अधिकांश सरकारी भूमी कह्यात घेण्‍याचा प्रयत्न करतात. तेथे प्रारंभी एक मजार (मुसलमानाचे थडगे) बांधतात. त्‍यानंतर तेथे दर्गा (थडग्‍याच्‍या ठिकाणी केलेले बांधकाम) बांधतात आणि हळुहळू त्‍याचे रूपांतर एका भव्‍य मशिदीत होते. कालांतराने तेथे पर्यटनाच्‍या नावाने अनेक धर्मांध येतात. त्‍यांना तेथे वसवले जाते. असे करत करत तेथील ५ किलोमीटचे क्षेत्र मुसलमानबहुल बनते. त्‍यानंतर तेथील अतिक्रमण थांबवणे कठीण होते. त्‍यामुळे ते प्रारंभीच थांबवणे आवश्‍यक आहे, असे वक्‍तव्‍य ‘हिंदु टास्‍क फोर्स’चे संस्‍थापक अधिवक्‍ता खुश खंडेलवाल यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या सहाव्‍या दिवशी केले. ते सरकारी भूमीवर बांधण्‍यात आलेल्‍या दर्ग्‍यांच्‍या विरोधात दिलेला न्‍यायालयीन लढा’ या विषयावर बोलत होते.

अधिवक्‍ता खंडेलवाल म्‍हणाले, ‘‘मुंबईला लागून असलेल्‍या भाईंदर भागातील उत्तन डोंगरी येथे बालेशाह पीर दर्गा सरकारी भूमीवर अतिक्रमण करून बांधण्‍यात आला. या दर्ग्‍याच्‍या विरोधात तक्रार केली. त्‍यानंतर तहसीलदाराने केलेल्‍या सर्वेक्षणाच्‍या आधारे विश्‍वस्‍ताच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला. हा विषय महाराष्‍ट्राच्‍या विधानसभेतही गाजला. या दर्ग्‍याविषयी सर्कल अधिकार्‍याने खोटा अहवाल बनवून हा दर्गा वर्ष १९९५ मध्‍ये बांधला असल्‍याचे दाखवले. मी हा भ्रष्‍टाचार प्रसारमाध्‍यमांच्‍या माध्‍यमातून उघड केला. यासंदर्भात उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली. न्‍यायालयाने सांगितल्‍यानुसार राज्‍य सरकार, जिल्‍हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्‍यानंतर तेथील दुकानदारांनी दर्ग्‍याला लागून असलेली अतिक्रमित दुकाने स्‍वत:हून काढली. यापुढे जाऊन आपल्‍याला ही भूमी अतिक्रमणमुक्‍त करायची आहे. मला खात्री आहे की, यासंदर्भात लवकरच न्‍यायालयाकडून निर्णय होईल. ’’

क्षणचित्र :

या प्रकरणाविषयी बोलतांना अधिवक्‍ता खुश खंडेलवाल यांनी अनुभव सांगितला. या प्रकरणातील सरकारी अधिकार्‍यांनी सांगितले की, या प्रकरणात आम्‍हाला पैसे घेऊन भ्रष्‍टाचार करण्‍याचा दबाव होता; पण आम्‍ही अधिवक्‍ता खंडेलवाल यांच्‍याकडे पाहून पैसे नाकारले.

भगवान श्रीकृष्‍णाचे कार्य समजून धर्मकार्य करावे ! – अधिवक्‍ता खुश खंडेलवाल, संस्‍थापक, ‘हिंदु टास्‍क फोर्स’

काही जण मला ‘हे कार्य करतांना भीती वाटत नाही का?’, असे विचारतात. तेव्‍हा मला वाटते, ‘हे भगवान श्रीकृष्‍णाचे कार्य आहे. ते त्‍याच्‍याच इच्‍छेने पूर्ण होणार आहे. त्‍यामुळे हे कार्य थांबवण्‍याची शक्‍ती कुणामध्‍येही नाही.’ सनातन धर्मात जन्‍म घेणे, हे आपले सौभाग्‍य आहे. या सनातन धर्माचे ऋण धर्मरक्षण केल्‍यानेच आपण फेडू शकतो. आपण सर्वांनी भगवान श्रीकृष्‍णाला केंद्रस्‍थानी ठेवून कार्य केले, तर आपला विजय निश्‍चित आहे.