हिंदूविरोधी नॅरेटिव्‍ह रचून छत्रपती शिवाजी महाराजांची महानता अल्‍प करण्‍याचे षड्‍यंत्र ! – उदय माहुरकर, माजी माहिती आयुक्‍त, भारत सरकार

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या चौथ्‍या दिवशी झालेली पत्रकार परिषद

डावीकडून श्री. नीरज अत्री, बोलतांना श्री. उदय माहुरकर, श्री. प्रवीण चतुर्वेदी आणि श्री. रमेश शिंदे

विद्याधिराज सभागृह – दक्षिण गुजरात ते तमिळनाडूच्‍या जिंजीपर्यंत १ सहस्र ६०० किलोमीटर लांबीचे राज्‍य निर्माण करून मोगल राजवटीच्‍या अंताची पायाभरणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एक मोठे सम्राट आणि राष्‍ट्रनिर्माते होते; मात्र हिंदुविरोधकांनी त्‍यांचे महान कार्य दाबून त्‍यांना ‘एक साधा मराठा योद्धा’ म्‍हणून इतिहासात दाखवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची महानता अल्‍प करण्‍याचे काम चालू आहे. आपल्‍या इतिहासाचे विद्रुपीकरण करून स्‍वातंत्र्यानंतर बहुसंख्‍य हिंदूंवर मोगलांचा उदात्तीकरण करणारा खोटा इतिहास लादण्‍यात आला, असे अनेक हिंदुविरोधी नॅरेटिव्‍ह (कथानक) आजही निर्माण करून हिंदूंमध्‍ये संभ्रम, भेद आणि न्‍यूनगंड निर्माण करून हिंदूंना निष्‍पभ्र केले जात आहे. याविरोधात हिंदूंनी आता जागे होऊन हिंदुविरोधी नॅरेटिव्‍ह ओळखले पाहिजे. त्‍याचा अभ्‍यास करून या हिंदुविरोधी नॅरेटिव्‍हचा समाजासमोर भांडाफोड केला पाहिजे, असे प्रतिपादन ‘सेव्‍ह कल्‍चर सेव्‍ह भारत फाऊंडेशन’चे संस्‍थापक, लेखक, इतिहासकार आणि भारताचे माजी माहिती आयुक्‍त श्री. उदय माहुरकर यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –


ते फोंडा, गोवा येथील ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’त श्री विद्याधिराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेतील ‘हिंदुविरोधी नॅरेटिव्‍हला प्रत्‍युत्तर’ यावर बोलत होते. या वेळी व्‍यासपिठावर उत्तरप्रदेश येथील ‘प्राच्‍यम्’चे संस्‍थापक तथा विचारवंत श्री. प्रवीण चतुर्वेदी, हरियाणा येथील विवेकानंद कार्य समितीचे अध्‍यक्ष तथा विचारवंत श्री. नीरज अत्री आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे हे उपस्‍थित होते.

(क्लिक करा ↑)

हिंदूविरोधी नॅरेटिव्‍हविषयी सांगतांना श्री. माहुरकर पुढे म्‍हणाले की,

१. हिंदूंना नॅरेटिव्‍हची (खोट्या कथानकाची) लढाई जिंकायला शिकावे लागेल. हिंदूंच्‍या सहिष्‍णु स्‍वभावामुळे, तसेच विजीगिषु वृत्तीच्‍या अभावामुळे ते नॅरेटिव्‍हच्‍या लढाईत नेहमीच हरत आले आहेत. हे स्‍वातंत्र्यापासूनचे चित्र आहे.

२. वर्ष २००२ च्‍या गुजरात दंगलीच्‍या आधी गोध्रा येथे साबरमती रेल्‍वेमध्‍ये ५९ हिंदू मारले गेले; मात्र त्‍याकाळी मुख्‍यमंत्री असलेले नरेंद्र मोदी, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ आणि भाजप यांनी मुसलमानविरोधी लाट आणण्‍यासाठी हे कृत्‍य घडवून आणल्‍याचे साम्‍यवादी आणि इस्‍लामी रणनीतीकार यांनी सांगितले. प्रत्‍यक्षात मुसलमान जमावाने रेल्‍वेचे डबे जाळल्‍याचे गुजरात उच्‍च न्‍यायालयाच्‍या निकालात समोर आले.

हिंदुविरोधी कथानकांचा प्रतिकार त्‍यांतील खोटेपणा उघड करून करता येईल ! –  प्रविण चतुर्वेदी, संस्‍थापक, प्राच्‍यम्

जो हिंदु धर्म प्रेम, करुणा आणि वैश्‍विक बंधुत्‍वाचे प्रतीक आहे, त्‍याची जगभरात अपकीर्ती केली जात आहे. हिंदु युवकांमध्‍ये विशेषत: संभ्रम आणि एकमेकांबद्दल तिरस्‍काराची भावना वाढीस लावण्‍यासाठी जातीयवाद, ब्राह्मणवादी पितृसत्ता असे शब्‍द वापरलेे जात आहेत. या खोट्या कथानकांचा प्रतिकार केवळ त्‍यांच्‍यातील खोटेपणा उघड करूनच करता येईल. उदाहरणार्थ आपल्‍याकडे जात ही संकल्‍पना नव्‍हती, केवळ वर्ण होते; मात्र ब्रिटिशांनी आपल्‍याला विभाजित करण्‍यासाठी जात पद्धत बनवली. यापुढे जाऊन हिंदूंनी मागील सहस्रो वर्षांमध्‍ये सर्व क्षेत्रांत गाजवलेले कर्तृत्‍व समाजापुढे मांडावे लागेल.

योग्‍य माहिती समाजापर्यंत पोचवणे, हे माध्‍यमांचे दायित्‍व ! – नीरज अत्री, अध्‍यक्ष, विवेकानंद कार्य समिती

विकृत कथनकाद्वारे पूर्णपणे अपयशी आणि विनाशकारी घटनाही सामाजिक न्‍याय किंवा समावेशक म्‍हणून सादर केल्‍या जातात. आपला देश, आपला समाज आणि भावी पिढ्या सुरक्षित ठेवता याव्‍यात, यासाठी सखोल अभ्‍यास आणि संशोधन करूनच योग्‍य माहिती समाजापर्यंत पोचवणे हे माध्‍यमांचे दायित्‍व आहे.