प्रपंचातील सुख-दुःखे हसत-खेळत झेलण्यासाठीचे बळ नामानेच मिळते !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

हिरण्यकश्यपूला जेव्हा भगवंताने मांडीवर घेऊन पोट फाडायला प्रारंभ केला, तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला, प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने काही हात जोडले नाहीत. केवढा हा अभिमानाचा जोर. अभिमान श्रीमंतालाच असतो, असे नव्हे, तर गरिबालाही तो सोडत नाही. एकदा एक भिकारी एकाच्या दाराशी येऊन भिक्षा मागू लागला, तेव्हा तो गृहस्थ त्या भिकार्‍याला म्हणाला, ‘अरे, तुला काही काळवेळ समजते कि नाही ?’ त्यावर तो भिकारी म्हणाला, ‘जा जा, मला काही तुमचे एकट्याचेच घर नाही, गावात अशी १०० घरे आहेत.’ लहान मुले पावसाळयात कागदाच्या लहान लहान होड्या करून पाण्यात सोडतात. त्यातील होडी तरली, तरी हसतात आणि बुडाली तरी हसतात. त्याप्रमाणे प्रपंचातील सुख-दुःखे हसत-खेळत झेलावीत आणि हे एका नामानेच साधते.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)