‘साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली व्हावी’, यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

१. ‘साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून व्हायला हवा’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांची तळमळ असल्याने त्यांनी समाजातील संतांना त्यावरील उपाय विचारणे

‘वर्ष २००३ मध्ये मिरज आश्रमात असतांना परात्पर गुरु डॉक्टरांना भेटण्यासाठी विविध ठिकाणचे समाजातील संत येत असत. त्यांचे साधनामार्ग वेगवेगळे असायचे. त्या संतांना भेटल्यावर परात्पर गुरु डॉक्टर त्यांना साधकांना होणारे आध्यात्मिक त्रास सांगून त्यांवरील उपाय विचारत असत. ‘साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून व्हायला हवा’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांची तळमळ असे. ‘संतांनी केलेल्या आध्यात्मिक उपायांचा कसा आणि किती परिणाम होत आहे ?’, याचा अभ्यास परात्पर गुरु डॉक्टर स्वतः करत अन् साधकांनाही त्याविषयी विचारत असत.

२. चुकांमुळे साधकांच्या साधनेची हानी होऊ नये; म्हणून साधकांना सामूहिक प्रायश्चित्त घ्यायला सांगणे आणि प्रायश्चित्त पूर्ण झाल्याचा पाठपुरावाही घेणे

वर्ष २००८ मध्ये मी ध्वनी-चित्रीकरणाशी संबंधित सेवा करत होते. त्या वेळी साधकांकडून सेवा करतांना एक गंभीर चूक झाली. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या सेवेतील सर्व साधकांना सामूहिक प्रायश्चित्त घेण्यास सांगितले आणि म्हणाले, ‘‘साधकांकडून होणार्‍या चुकांसाठी त्यांनी प्रायश्चित्त घेतले, तर त्यांना त्याचे पाप लागणार नाही.’’ त्यानंतर त्या चुकीसाठी सेवेतील सर्व साधकांनी आठवडाभर दुपारचा अल्पाहार घेतला नाही. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी केवळ सांगितले आणि सोडून दिले’, असे झाले नाही. त्यांनी ‘प्रायश्चित्त कुठल्या दिवसापासून कुठल्या दिवसापर्यंत घेतले ?’, याची नोंदही ठेवायला सांगितली. यामागे ‘साधकांच्या साधनेची हानी होऊ नये’, असा त्यांचा उद्देश होता. असे त्यांनी अन्य सेवांच्या ठिकाणीही करायला सांगितले.’

– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.११.२०२३)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.