देशी गोवंशियांच्या  संख्येत होत आहे घट !

पशूधन आणि कुक्कुटपालन अहवालानुसार गेल्या ६ वर्षांत देशात देशी गायींच्या संख्येत ५.५ टक्के घट झाली आहे. दुसरीकडे विदेशी आणि संकरित गायींची संख्या वाढली आहे. त्यामुळे कायदे कितीही बनवले, तरी देशी गायींची संख्या न्यून होत आहे.

गोरक्षक शासनकर्ते आवश्यक !

इंग्रज विचारवंत मेकॉलेच्या लक्षात आले होते की, एक गाय संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण करते. त्यामुळे त्याने देशात पहिले पशूवधगृह उघडले आणि गायीची हत्या करण्यासह इंग्रजी शिक्षण घेणार्‍या हिंदूंनाही गोमांस खाण्याची सवय लावली. आज देशात सहस्रो पशूवधगृहे आहेत आणि त्यात लाखो गोवंशियांची हत्या केली जाते. गोहत्या रोखण्यासाठी कायदे करण्यात आले, तरी पोलिसांच्या भ्रष्ट आणि निष्क्रीय वृत्तीमुळे गोहत्या चालूच आहे. ‘कायदे केले की, आपले दायित्व संपले’, असेच शासनकर्ते वागत आहेत’, असे म्हटल्यास चूक ठरू नये. त्याचप्रमाणे हिंदूंनीही याकडे डोळसपणे पाहून वस्तूस्थिती लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. काही हिंदु संघटना गोरक्षणाचे प्रयत्न करत आहेत; मात्र त्यांना पोलीस आणि प्रशासन साहाय्य करत नसल्याचेही दिसून येते, तसेच काही तथाकथित गोरक्षक गोतस्करांकडून खंडणी वसूल करून गोहत्या होऊ देत असल्याचेही म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर ‘अशामुळे खरेच गोरक्षण होऊ शकणार आहे का ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. जगामध्ये ‘बेवारस गोवंश रस्त्यावर फिरणारा देश’ म्हणून भारताकडे पाहिले जाते. या संदर्भात काही राज्यांनी योजना आखल्या असल्या, तरी त्या सरकारी असल्याने त्याचा परिणाम अल्पच दिसतो. याला लोकांची मानसिकताही तितकीच कारणीभूत आहे. जोपर्यंत गोवंश उत्पादन देत आहे, तोपर्यंत त्याचे पालनपोषण केले जाते आणि ते भाकड झाले की, त्याच्या पालनपोषणाचा खर्च परवडत नाही किंवा करायचा नाही; म्हणून त्याला वार्‍यावर सोडून दिले जाते, अशी लोकांची कृतघ्न मानसिकता झालेली आहे, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. ज्या गोशाळांमध्ये गोवंश ठेवला जातो, त्यांची स्थितीही वाईट आहे. सरकार अशांना अनुदान देते; मात्र त्याचा लाभ प्रत्यक्ष गोवंशियांना मिळत नाही. त्यामुळे गोशाळांमध्ये गोवंशियांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. गोवंशियांचे रक्षण व्हावे, हीच खरी तळमळ असणे आवश्यक आहे. ती निर्माण करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. ही स्थिती पहाता भगवान श्रीकृष्णाप्रमाणे गोरक्षण करणारे शासनकर्ते देशाला आवश्यक आहेत, असेच म्हणावे लागेल !