गोपालनाचे अर्थकारण ! 

गोपालन या क्षेत्रातील बारकावे, सत्यस्थिती माहिती नसल्याने अनेकदा ‘इतकं महाग दूध/तूप ?’ असे प्रश्न विचारले जातात. कित्येकदा लोक या क्षेत्रासंदर्भात अकारण गैरसमज पसरवत असतात. त्यांच्यासाठी नव्हे; खरोखरच ‘अथातो जिज्ञासा’ असणार्‍या सामान्य जनतेसाठी हा लेखप्रपंच.

१. गायीचे तूप महाग असण्यामागील कारण

१ अ. देशी गायीच्या दुधात मेदाचा अंश हा जेमतेम ४-४.५ टक्के इतक्याच प्रमाणात आढळून येतो. ९ टक्के ‘फॅट’ असणारे म्हशीचे दूध वा ‘फुल क्रीम’ दूध यांच्यामार्फत तूप सिद्ध करतांना जे काम जेमतेम १० लिटर दुधाच्याही आत शक्य होते, तेच देशी गायीच्या दुधापासून तूप निर्माण करत असतांना जवळपास २५ ते ३० लिटर दुधापासून एक लिटर तूप उत्पन्न होऊ शकते.

१ आ. एका गायीचा आहार, औषधे, मनुष्यबळ असा सारा खर्च दिवसाला सरासरी ३००-४०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. गोशाळेत असलेल्या कित्येक गायी या भाकडही असतात. त्यांच्यावरील खर्चातून प्रत्यक्षात गोपालकांना कुठलाही परतावा मिळण्याची शक्यता नसते. तरी कृतज्ञतेची भावना म्हणून त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत जपले जाते.

१ इ. एका गायीकडून दिवसाला सरासरी ५ ते ७ लिटर दूध मिळते. दुधाचे भरमसाठ उत्पन्न घेण्याच्या नादात ‘ऑक्सिटोसीन’सारखे ‘हॉर्मोन्स’ टोचण्याचे अमानवी प्रकार इथे होत नाहीत. त्यातच भारतीय तत्त्वांवर चालणार्‍या गोशाळांत बछड्यांना दूध देऊन त्यानंतर मग उर्वरित दुधाचे वितरण वा तुपामध्ये रूपांतर केले जाते.

१ ई. ‘डेअरी इंडस्ट्री’मध्ये सिद्ध होणारे तूप हे मुळात जो फॅटचा अंश कायदेशीररित्या दूध विकत असता त्यामध्ये ठेवणे योग्य नसते; त्याला घुसळून बाजूला काढून निर्माण झालेल्या क्रीमला ‘हिट जॅकेट’मध्ये घालून अथवा ‘सेंट्रीफ्यूज’ करून वितळवून सिद्ध केलेले असते. याला तूप नव्हे, तर ‘बटर ऑईल’ अशी संज्ञा आहे. केवळ ‘कोलेस्ट्रॉल’ असलेल्या अशा या ‘बटर ऑईल’च्या किमतीची तुलना विरजण लावून, ताक घुसळून, लोणी कढवून पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या देशी गायीच्या तुपासह केल्यास आपण पितळेला सोन्यासह तोलत आहोत.

१ उ. हे संपूर्ण अर्थकारण लक्षात घेतल्यास दुधाला सरासरी ८० ते ९० रुपये प्रति लिटर, तर तुपाला सरासरी २ सहस्र ५०० रुपये प्रति लिटर असा बाजारभाव का लावला जातो ? याचे कारण आपणास सहज उमगेल.

२. गोपालन आणि शेती हे परस्परपूरक व्यवसाय !

त्यातही हे सारे अर्थकारण नीट लक्षात घेतल्यावर प्रत्यक्षात हा दर लावूनही हा लाभदायी व्यवसाय होणार नाही. तो लाभदायी करण्यास त्याला सेंद्रिय शेतीची जोड द्यावी लागते. गोपालन आणि शेती परस्परपूरक व्यवसाय असून ते काळासाठी आवश्यक आहेत. नकारात्मकता पसरवणार्‍या व्यक्तींच्या नादी लागून देशी गायींचे पालन करणार्‍यांवर आक्षेप घेत बसण्यापेक्षा आपणही या कार्यात कसे सहभागी होऊ शकाल, याचा विचार करून पहा. त्यातच आपण, आपले कुटुंब, समाज आणि पर्यायाने देशाचे भले आहे.’

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली, ठाणे.

(संदर्भ : दैनिक ‘तरुण भारत’)