इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी गेले; प्रश्न उरले !

चीनचा आखातामध्ये वाढत असलेला विस्तारवाद रोखण्यासाठी भारताने कुटनीतीचा वापर करून आखातामध्ये पाय रोवायला हवेत !

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात झालेला दुर्दैवी मृत्यू जगाला धक्का देणारा ठरला. इराणची आखातातील राजकारणातील भूमिका वाढवण्यामध्ये इब्राहिम रईसी यांचे योगदान पुष्कळ मोठे होते. चीन आणि इराण यांच्या आर्थिक, संरक्षण आणि व्यापारी संबंधांची पायाभरणी करण्याचे श्रेय रईसी यांना जाते. त्यांच्याच काळात इराण इस्लामिक जगताचे नेतृत्व करण्यासाठी पुढे येऊ लागला होता. त्यातच अलीकडील काळात इराण आणि इस्रायल प्रत्यक्ष रूपाने एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे रईसींचा मृत्यू हा अपघात आहे कि घातपात ? या स्वरूपाच्या चर्चांना उधाण आले आहे. महत्त्वाच्या व्यक्तींच्या अपघाती निधनानंतर अशा प्रकारच्या ‘कॉन्स्परसी थिअरीज’ (षड्यंत्राचे सिद्धांत) निर्माण होणे, हे अगदीच स्वाभाविक असते. त्याच्या उत्तरामध्ये आखातातील राजकारणाचे भवितव्य अवलंबून असेल.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

१. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अन् त्यात इराणचा सहभाग

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

गेल्या ६ मासांपासून आखातामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध मोठ्या प्रमाणावर चालू आहे. या संघर्षाला गेल्या महिन्याभरापासून एक वेगळे वळण मिळाले; कारण इस्रायल आणि इराण ही दोन्हीही राष्ट्रे प्रत्यक्ष समोरासमोर उभी ठाकली. या दोन्ही राष्ट्रांमधील हाडवैर जुने आहे; परंतु इस्रायलने इराणविरुद्ध किंवा इराणने इस्रायलविरुद्ध कधीही प्रत्यक्ष आक्रमण केलेले नव्हते. इस्रायलला अडचणीत आणण्याचे प्रयत्न नेहमीच इराणपुरस्कृत संघटनांकडून केले गेले. यामध्ये लेबनॉनमधील हिजबुल्ला, येमेनमधील हुती या आतंकवादी संघटनांचा समावेश आहे. हमासलाही अप्रत्यक्षरित्या सर्व प्रकारची रसद इराणकडूनच पुरवली जात होती. तथापि महिनाभरापूर्वी इस्रायलने सीरियामध्ये एका इमारतीवर आक्रमण केले आणि त्यामध्ये इराणचा सर्वोच्च लष्करी कमांडर मारला गेला. या कारवाईमुळे इस्रायल आणि इराण हे दोघेही परस्परांसमोर उभे ठाकले. इराणने ३०० हून अधिक क्षेपणास्रे इस्रायलवर डागली. वास्तविक ‘या आक्रमणाला इस्रायल कडाडून प्रत्युत्तर देईल आणि आखातात युद्धाचा भडका उडेल’, अशी शक्यता वर्तवली गेली; परंतु इस्रायलकडून तशा प्रकारची कोणतीच कारवाई गेल्या महिन्याभरात केली गेली नाही. त्यामुळे इस्रायल कशा प्रकारचे प्रत्युत्तर देणार ? आणि त्यानंतर हा संघर्ष कोणत्या वळणावर येऊन ठेपणार ? याविषयीच्या चर्चांना उधाण आले होते.

२. इब्राहिम रईसी यांच्या अपघातीमृत्यूमुळे तर्कविर्तकांना उधाण

याविषयी एक प्रकारची तणावाची स्थिती आखातात होती. त्यातच इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. अझहरबैजानमधून हेलिकॉप्टरमधून जात असतांना ते दुर्घटनाग्रस्त झाले आणि त्यामध्ये रईसी यांच्यासमवेत इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसह काही अधिकार्‍यांचा दुर्दैवी अंत झाला. ही हेलिकॉप्टर दुर्घटना अपघात असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले असले, तरी आखातातील तणावाच्या  पार्श्वभूमीभूमीमुळे याविषयी अनेक शक्यतांचे मोहोळ उठले आहे. हा अपघात आहे कि घातपात आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेषतः इस्रायलच्या प्रत्युत्तराचा हा भाग आहे का ? जगभरात लपलेल्या स्वतःच्या हितशत्रूंना वेचून टिपणार्‍या ‘मोसाद’ या इस्रायलच्या विख्यात गुप्तचर संघटनेचा या अपघाताशी संबंध आहे का ? कि इराणमधील अंतर्गत विरोधातून रईसींना लक्ष्य करण्यात आले ? अशा अनेक तर्क वितर्कना उधाण आले.

३. इस्लामिक देशांचे नेतृत्व करण्यामध्ये इराणला पुढे आणण्यात इब्राहिम रईसी यांचे महत्त्वपूर्ण  योगदान

अलीकडच्या काळात इराणची भूमिका ही एकूणच इस्लामिक जगताला नेतृत्व प्रदान करण्याची आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (युएई), कुवेत यांसारखे सुन्नीबहुल देश इस्लामच्या पुढे जाऊन विकासाचा ‘अजेंडा’ ( कार्य सूची) राबवण्याच्या मनःस्थितीत आहेत. धर्माच्या आधारावर जागतिक राजकारण करणे आणि इस्लामिक देशांचे नेतृत्व म्हणून स्वतःला पुढे करणे या गोष्टींपेक्षा विकासाच्या आधारावर बिगर इस्लामिक देशांबरोबरचे संबंध घनिष्ट करण्याचे प्रयत्न ही राष्ट्रे करू लागली आहेत. विशेषतः भारत आणि संयुक्त अरब अमिराती किंवा सौदी अरेबिया आणि भारत यांच्यातील संबंध पाहिल्यास याची सहज प्रचीती येते. यापुढे जाऊन भारत, अमेरिका, इस्रायल आणि ‘युएई’ हे ४ देश अमेरिकापुरस्कृत ‘ ईस्टर्न  क्वाड’ ( पूर्व  भागातील संरक्षणात्मकदृष्ट्या धोरणात्मक संबंध सुदृढ करण्यासाठी बनवलेला गट) किंवा इब्राहिम ‘क्वाड’चे सदस्य आहेत. दुसरीकडे ‘जी-२०’ची (‘जी २०’, म्हणजे १९ देश आणि युरोपियन युनियन (यात २७ देश आहेत) यांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांची संघटना) वार्षिक शिखर परिषद गतवर्षी भारतात पार पडली, तेव्हा त्यामध्ये ‘आयमेक’, म्हणजेच भारत, मध्य आशिया, युरोप यांच्यामध्ये ‘आर्थिक महामार्ग’ (इकॉनॉमिक कॉरिडॉर) विकसित करण्याच्या प्रस्तावाला सहमती देण्यात आली. यामध्ये इस्रायल आणि ‘युएई’ यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे हे दोन्ही देश एकत्र येण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत किंवा अमेरिका त्यांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. अशा वेळी इस्लामिक जगताला नेतृत्व देण्यासाठी, जे आजवर कुठे तरी सौदी अरेबिया, ‘युएई’कडे होते, ती जागा इराण घेऊ पहात होता. केवळ शिया जगताचा नव्हे, तर एकूणच इस्लामिक जगताचा आवाज बनून पुढे येण्यासाठी इराण प्रयत्नशील आहे. इराणची आखातातील राजकारणातील भूमिका वाढवण्यामध्ये इब्राहिम रईसी यांचे योगदान पुष्कळ मोठे हाते. अयातुल्ला खामेनी हे इराणमधील सर्वोच्च धार्मिक नेते असले, तरी त्यांच्या निर्णयांची कार्यवाही करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण काम इब्राहिम रईसी यांच्याकडे होते. अमेरिकेने टाकलेल्या कठोर आर्थिक निर्बंधांनंतर इराणची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम रईसी यांनी केले.

४. रईसी यांनी इराणची आर्थिक, संरक्षण आणि व्यापारी संबंधांमध्ये केलेली पायाभरणी

वर्ष २०१५ मध्ये इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये एक करार झाला. अमेरिकेचा असा आरोप होता की, इराणकडून अण्वस्त्रांचा विकास होत आहे; परंतु इराणने सांगितले की, आमच्या अणूकार्यक्रमावर निर्बंध आणण्याच्या सिद्धतेत आहेत आणि भविष्यात आम्ही अण्वस्त्रे सिद्ध करणार नाही. या बदल्यात इराणला जागतिक बाजारात तेल निर्यात करण्याची अनुमती दिली जावी. इराणच्या या हमीनंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात हा करार पूर्ण झाला. तथापि डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी हा करार धुडकावून लावला आणि अमेरिका या करारातून बाहेर पडली. हे करत असतांना इराणवर अमेरिकेने आर्थिक निर्बंध टाकले. इतकेच नव्हे, तर आपल्या सर्व मित्र देशांना इराणसमवेतचा व्यापार खंडित करण्याविषयी अमेरिकेने दबाव आणला. या आर्थिक निर्बंधांची तीव्रता इतकी होती की, भारतालाही इराणकडून तेल आयात करणे थांबवावे लागले. यामुळे इराणचे अर्थकारण पूर्णतः कोलमडून गेले. ही आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यामध्ये रईसी यांनी दिलेले योगदान इराण कधीही विसरू शकणार नाही.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रशिया, चीन आणि इराण या तिघांमधील संबंध त्यांच्या काळात अत्यंत घनिष्ट बनले. रशिया, चीन, सीरिया आणि इराण ही एक नवी युती पश्चिम आशियामध्ये आकाराला आली. विशेषतः चीन आणि इराण यांच्या आर्थिक, संरक्षण अन् व्यापारी संबंधांची पायाभरणी करण्याचे श्रेय इब्राहिम रईसी यांना जाते; कारण भारताने इराणकडून तेल खरेदी थांबवल्यानंतर इराणने चीनसमवेतचे स्वतःचे संबंध अत्यंत घनिष्ट करण्याचा प्रयत्न केला. चीन हा इराणकडून तेल आयात करणारा सर्वांत मोठा देश ठरला. इराण आणि चीन यांचे व्यापारी संबंध इतके वाढले की, कोरोना महामारीच्या काळात चीननंतर कोरोनाचा पहिला सर्वांत मोठा प्रभाव इराणमध्ये जाणवला. याचे कारण मोठ्या प्रमाणावर चिनी अधिकारी इराणला पोचले होते. या सर्व गोष्टी पाहिल्यास इब्राहिम रईसींच्या काळामध्ये एक वेगळी सामरिक समीकरणे आखातामध्ये आकाराला येऊ लागली होती. एकीकडे त्यांनी इस्लामिक जगताचे नेतृत्व घेणे, दुसरीकडे त्यांनी चीन आणि रशियाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणे आणि त्या माध्यमातून अमेरिकेवर दबाव टाकणे, या सर्व घडामोडी गेल्या ३-४ वर्षांत घडल्या. त्यामुळे हा अपघात घडला, तेव्हा इस्लामिक जगताकडून कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या नाहीत.

५. रईसी यांच्या निधनानंतर ‘षड्यंत्राचे सिद्धांत’ निर्माण होणे हे स्वाभाविक !

दुसरीकडे अमेरिका आणि पश्चिम युरोपियन देशांकडूनही कोणत्या प्रतिक्रिया आल्या नाहीत. हे सर्व देश शांत आहेत. त्यामुळे इब्राहिम रईसी हे अनेकांच्या निशाण्यावर होते, ते अनेकांच्या डोळ्यांत खुपत होते. त्यांचे कार्य अमेरिकेच्या हितसंबंधांना आखातामध्ये अडथळा निर्माण करणारे होते. चीनचा आखातामधील प्रभाव वाढण्यासही रईसी फार मोठ्या प्रमाणावर उत्तरदायी होते. इस्लामिक जगताचे नेतृत्व करण्याचे रईसींचे प्रयत्न सुन्नी इस्लामिक देशांना खुपत होते आणि अलीकडील काळात निर्माण झालेला इस्रायल-इराण संघर्ष या सर्व पार्श्वभूमीवर विचार केल्यास रईसी यांच्या निधनानंतर ‘कॉन्स्परसी थिअरीज’ निर्माण होणे, हे अगदीच स्वाभाविक आहे. किंबहुना ज्या ज्या वेळी महत्त्वाच्या व्यक्तींचे अपघात झाले आहेत आणि त्यांचे निधन झाले आहे, त्या त्या वेळी अशा प्रकारच्या ‘कॉन्स्परसी थिअरीज’ पुढे आलेल्या आहेत. मध्यंतरी भारताचे पहिले संरक्षणप्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपीन रावत यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतरही अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे रईसींच्या मृत्यूनंतर उठलेले चर्चेचे मोहोळ अनपेक्षित नाही; परंतु जोपर्यंत त्यातून ठोस काहीही समोर येत नाही, तोवर हा अपघाती मृत्यू आहे, हे वास्तव जगाला मान्यच करावे लागणार आहे.

६. भारत आणि इराण संबंध भविष्यात घनिष्ट करण्यासाठी…

आता प्रश्न उरतो तो त्यांच्या निधनाचे परिणाम काय होणार?  अयातुल्ला खामेनी यांनी रईसी यांच्या निधनानंतर तात्काळ इराणचे उपराष्ट्रपती महंमद मोखबर यांच्याकडे राष्ट्रपतीपदाचा पदभार सुपुर्द केला आहे. आता पुढील ५० दिवसांमध्ये तेथे सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातील. मोखबर हे अत्यंत ‘लो प्रोफाईल’ (अधिक प्रसिद्ध नसलेले) व्यक्तीमत्त्व आहे. त्यामुळे रईसींनी ज्याप्रमाणे इराणच्या अर्थकारणाचा गाडा पूर्वपदावर येण्यासाठी योगदान दिले, तशा प्रकारचे सामर्थ्य मोखबर दाखवतील का ? असा प्रश्न पुढे येत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इराणमधील अस्थिरतेचा लाभ इस्रायलकडून घेतला जाऊ शकतो का ? हेही पहाणे महत्त्वाचे ठरेल. भारताच्या दृष्टीकोनातून विचार करता रईसींचे निधन हा भारतासाठी एक मोठा धक्का आहे; कारण रईसींच्या काळातच इराणमधील चाबहार बंदराच्या विकासाचे आणि व्यवस्थापनाचे कंत्राट भारताला मिळाले होते. भारत आणि इराण संबंध हे प्राचीन काळापासूनचे आहेत. इराणनंतर सर्वाधिक शिया मुसलमानांची संख्या भारतात आहे. अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला इराणचे साहाय्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे भारताने पहिल्यांदा परदेशातील एका बंदराच्या व्यवस्थापनाचे कंत्राट घेतले होते. भारत आणि इराण संबंध भविष्यात घनिष्ट रहावेत, यासाठी नव्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चांची फेरमांडणी करावी लागणार आहे. यामध्ये चीनचे आखातामध्ये गुंतलेले हितसंबंध महत्त्वाचे ठरणार आहेत. (२७.५.२०२४)