बुद्धीला आवरण्याच्या युक्तीचे सर्वोत्कृष्ट साधन म्हणजे आज्ञापालन !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

सत्पुरुषाजवळ राहून मनुष्य जर आज्ञापालन शिकला नाही, तर तो काहीच शिकला नाही. जो आज्ञापालन करील त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरे; परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल. प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे. भोग येण्याचा समय आला, म्हणजे तो बुद्धीवर परिणाम करतो. तिथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो, तर प्रारब्धाचा जोर मंदावल्यावाचून रहाणार नाही. प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले, तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे, हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे.

– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

(‘पू. (प्रा.) के.वि. बेलसरे यांचे आध्यात्मिक साहित्य’ या फेसबुकवरून साभार)