संपादकीय : ममतांचा दंगा !

बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये रामनवमीची मिरवणूक जात असतांना एक मोठे आणि त्या व्यतिरिक्त अन्य ४ ठिकाणी मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले. गेली काही वर्षे हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमणे होणे नित्याचे झाले आहे; परंतु राममंदिराच्या उभारणीनंतर संपूर्ण देशातील वातावरण काही प्रमाणात पालटले आहे. या पार्श्वभूमीवर रामनवमीच्या मिरवणुकीला तेलंगाणा आणि राजस्थान येथे झालेला विरोध वगळता देशात अन्य ठिकाणी मिरवणुकीवरील आक्रमणाचे वृत्त आले नाही; परंतु बंगालने हिंदूंवर आक्रमण करण्याची त्याची कुप्रथा चालू ठेवली आहे. प्रत्यक्ष मुख्यमंत्री ममताबाईंनी गेले ४ दिवस त्यांच्या भाषणातून सतत ‘रामनवमीला दंगल होऊ शकते’, अशा प्रकारची विधाने करून जणू इस्लामी आक्रमणकर्त्यांना एक प्रकारची फूस लावून हिंदूंवर आक्रमण करण्यास उद्युक्त केले. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्रीच जेव्हा हिंदूंच्या जिवावर उठलेला असतो, तेव्हा त्यांना कुठला नेता वाचवणार ? बंगालमध्ये आजही ७० टक्के हिंदु आहेत आणि २९ टक्के मुसलमान आहेत. असे असूनही ममताबाई मुसलमानांना खुश ठेवण्यासाठी आणि स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी मुसलमानांना सरळ सरळ हिंदूंवर आक्रमण करण्याची एक प्रकारे चेतावणी देतात, हे लक्षात घेतले पाहिजे.

बंगालच्या हिंदूंनी ही गोष्ट गांभीर्याने समजून घेतली पाहिजे. त्यांच्यावर राज्य करणारे हे त्यांच्या हिताचे नव्हे, तर अक्षरशः द्वेषाचे राजकारण करत आहेत आणि त्यांच्या जिवावर उठले आहेत. बंगालमध्ये हिंदूंवर, हिंदु महिलांवर, त्यांच्या मंदिरांवर, त्यांच्या भूमीवर सातत्याने आक्रमणे होत असतांना हिंदू सातत्याने तृणमूल काँग्रेसला मत देत आहेत, हे अत्यंत आश्चर्यजनक आहे. संदेशखालीसारख्या भयंकर अत्याचारित गावामध्येही वाहिन्यांचे पत्रकार मुलाखत घ्यायला गेले, तेव्हा गावातील महिलांनी ममता यांना मते देणार असल्याचे सांगितले. याचा अर्थ एकतर तेथील हिंदूंना ममता यांचे कारनामे कळलेले नाहीत किंवा ममता यांनी त्यांच्यावर अशी काही जादू केली आहे की, त्यांचे स्थान अबाधित झाले आहे. यावरून बंगालमधील हिंदूंना जागृत करणे किती आवश्यक आहे ? आणि किती कठीण आहे ?, हेही लक्षात येईल. त्या ठिकाणी भाजप, काँग्रेस यांसारखे राष्ट्रीय पक्ष वाढत का नाहीत ? हेही यावरून लक्षात येईल. १ जानेवारी २०२४ या दिवशी ममता त्यांच्या पक्ष स्थापनादिनाच्या कार्यक्रमातील भाषणात म्हणाल्या, ‘‘आपल्याला वाईट शक्तींना हरवायचे आहे !’’ त्यामुळे आता असे म्हणावेसे वाटते की, ममता यांची त्यांच्या दृष्टीने असलेल्या वाईट शक्तींना घालवण्यासाठी त्यांनी वापरलेली ‘काळी जादू’ संपल्याविना हिंदूंना चांगले दिवस येणार नाहीत.

कुचकामी आणि मिंधे पोलीस प्रशासन !

प्रतिकात्मक छायाचित्र

या घटनांनंतर भाजपचे एक नेता म्हणाले की, या प्रकरणी ‘एस्.आय.टी.’ची (विशेष पोलीस पथकाची) स्थापना करा. अद्याप मागील वर्षीच्या दंगलींतील आरोपींवर ‘एस्.आय.टी.’ने कारवाई केलेली नाही. असे असतांना ‘आता परत ‘एस्.आय.टी.’ लावून वेगळे काय होणार ?’, असे सामान्य हिंदूंना वाटणार नाही का ? हिंदूंवरील अत्याचारांच्या अनेक घटनांमध्ये एकतर पोलीस निष्क्रीय असतात किंवा ते बहुतांश वेळा धर्मांधांना मिळालेले असतात आणि कहर म्हणजे कधी कधी धर्मांधांसमवेत मिळून ते हिंदूंवर अत्याचार करतात. येथील पोलीस प्रशासन हे बहुतांशी धर्मांध गुंडांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या अधीन आहेत आणि मुख्यमंत्री पूर्णतः मुसलमान समाजाच्या अधीन आहे. रामनवमीला येथील माणिक्यहार येथेही घरे आणि दुकाने यांच्यावर धर्मांधांनी दगड फेकले. दगड फेकले जातात, याचा अर्थ हे सर्व पूर्वनियोजित असते, हे सर्वांना ठाऊक आहे. अशा ठिकाणीही पोलीस गुन्हेगारांना तत्परतेने पकडून त्यांच्यावर ठोस कारवाई करत नाहीत. जिथे ‘ईडी’सारख्या यंत्रणेच्या अधिकार्‍यांना मार खाऊन परत फिरावे लागते, तिथे सामान्य आणि त्याही धर्मांध गुंडांच्या हातातील बाहुले झालेल्या पोलीस यंत्रणेचे काय ? मुर्शिदाबाद येथील दंगलीनंतर भाजपच्या ५ कार्यकर्त्यांना पकडल्याने भाजपच्या स्थानिक नेत्या अग्निमित्र पॉल कार्यकर्त्यांसह पोलिसांना आक्रमकपणे भिडल्या आणि ‘तक्रार घेतली नाही, तर आंदोलन करावे लागेल’, असे म्हणाल्या. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या चित्रफितीत हे पोलीस अधिकारी त्यांच्याशी केवळ वाद घालत असल्याचे दिसून आले; यावरून त्यांना प्रसंगाचे काही गांभीर्य आहे, असे वाटत नव्हते आणि हे सर्व पाहून ते धर्मांधांवर काही ठोस कारवाई करतील, असेही वाटत नव्हते.

येथील नेता जोपर्यंत हिंदुहिताचे कार्य करणारा होत नाही, तोपर्यंत येथील हिंदूंना त्यांच्यावरील अन्याय सहन करावे लागणार आहेत. प्रजा जशी असते, तसा तिला राजा मिळतो. बहुसंख्य हिंदु प्रजा जर जागरूक झाली, तर तिला तिच्या हिताचा राजा बंगालमध्ये मिळू शकतो. आता केवळ एवढा पालट झाला आहे की, तेथील हिंदू ५ ते १० टक्के जागृत झाल्याने ते बोलू लागले आहेत. सामाजिक माध्यमांमुळे तेथील हिंदूंवरील अत्याचार राज्याबाहेर थोड्याफार प्रमाणात आल्याने वृत्तवाहिन्याही आता ते दाखवू लागल्या आहेत; परंतु तेथे मात्र अद्याप हिंदुजागृती होण्यास भरपूर संधी आहे. त्यामुळेच बंगाल हे भाजप, तसेच शासन यांच्यासाठी एक आव्हान होऊन बसले आहे.

हिंदुत्वाचे जागरण हवे !

वरील दंगलींत घायाळ हिंदूंना पहाण्यासाठी काँग्रेसचे एक नेते रुग्णालयात जाण्याचे नाटक करू लागल्यावर हिंदूंनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. ‘मी दंगल होऊ देणार नाही’, असे फुकाचे आश्वासन त्यांनी प्रसारमाध्यमांना दिले. भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांना ममता धर्मांधांना गेले ४ दिवस फूस लावून दंगलीचे आवाहन करत आहेत, हे ठाऊक होते, तर त्यांनी त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे संरक्षककवच प्रत्येक मिरवणुकीसाठी का दिले नाही ? असे दिले असते, तर हिंदूंनाही त्यांच्याविषयी जवळीक वाटली असती आणि निवडणुकांमध्ये त्यांना त्यांचा लाभ झाला असता अन् धर्मांधांनाही ‘हिंदूंच्या रक्षणार्थ कुणीतरी आहे’, असे वाटून धाक वाटला असता अन् येथील ५ ठिकाणच्या आक्रमणांत हिंदूंचे रक्षण झाले असते. यावरून हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे की, त्यांच्या रक्षणासाठी आता त्यांना स्वतःच सर्वतोपरी सिद्धता करून सिद्ध राहिले पाहिजे. प्रत्येक मिरवणुकीच्या वेळी हिंदूंनी संरक्षककवच देणारी यंत्रणा सिद्ध केली पाहिजे. देशभर हिंदुत्वाची पताका फडकू लागली असतांना अद्याप बंगालमध्ये त्याचा केवळ चंचूप्रवेश झाला आहे. हिंदुत्वाचा झंझावात बंगालमध्ये निर्माण झाल्याविना ना तेथील हिंदूंवरील धर्मांधांचे अत्याचार संपतील, ना ममतांचे ! ममताबाईंचा दंगा संपवणे आता बहुंसख्य हिंदूंच्याच हातात आहे, हे हिंदूंनी लक्षात घेऊन निवडणुकीच्या माध्यमांतून त्यांचा वचक दाखवावा !

बंगालमधील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून हिंदूंनी बंगालमध्ये हिंदुत्वाची लाट आणावी !