‘उन्हाळ्याचा त्रास होऊ नये’, यासाठी पुढील काळजी घ्या !

‘सध्या उन्हाळा चालू झाला आहे. या काळात ‘शरिराचे तापमान वाढणे, घाम येणे, शक्ती न्यून होणे, थकवा येणे’ इत्यादी त्रास होतात. तापमान वाढल्याने व्यक्ती बेशुद्ध पडून (उष्माघात होऊन) दगावल्याचीही काही उदाहरणे आहेत. उन्हाळ्यात होणार्‍या विविध विकारांपासून दूर रहाण्यासाठी सर्वांनी पुढील काळजी घेणे आवश्यक आहे.

१. दिवसभरात आवश्यक तेवढे पाणी अथवा तत्सम पेय प्यावे. गडद रंगाची लघवी होत असल्यास ‘अधिक पाणी प्यायला हवे’, हे लक्षात घ्यावे. पाणी पिण्यासाठी तहान लागण्याची वाट पाहू नये. शीतकपाटातील पाणी पिणे टाळावे. सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी एक पेला पाणी प्यावे. बाहेर जातांना समवेत स्वतःची पाण्याची बाटली ठेवावी.

२. पाणी एका वेळी गटागट भरपूर न पिता सावकाश घोट-घोट प्यावे. उन्हातून आल्यावर लगेच पाणी न पिता ५ ते १० मिनिटे शांत बसून मग पाणी प्यावे.

वैद्या (कु.) शर्वरी बाकरे

३. साखर असलेले पेय पिऊ शकतो; पण अधिक साखर असलेले पेय पचायला जड असल्याने शक्यतो ते पिऊ नये. शक्य असल्यास प्रतिदिनच्या आहारात ताक किंवा पन्हे यांचा समावेश असावा. माठातील थंड पाण्यात बनवलेली सरबते किंवा वाळा, गुलाब, पारिजात इत्यादी सुगंधी द्रव्ये घातलेले माठातील थंड पाणी प्यावे.

४. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. तुरट, तिखट, कडू आणि अतिआंबट चवीच्या पदार्थांचे अतिसेवन करू नये.

५. सैलसर, फिकट रंगाची आणि वजनाला हलकी असणारी (शक्य असल्यास सुती) वस्त्रे वापरावीत.

६. ऊन असतांना घरात किंवा सावली असलेल्या ठिकाणी थांबावे.

७. शक्यतो सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत घरातून बाहेर पडू नये. ‘उन्हाची झळ लागू नये’, यासाठी बाहेर जातांना डोळ्यांना ‘गॉगल’ लावावा. छत्री अथवा ‘डोक्यावर सर्व बाजूंनी सावली येईल’, अशा प्रकारची टोपी (‘हॅट’) वापरावी. टोपी उपलब्ध नसल्यास डोके आणि कान यांना मोठा पांढरा रुमाल बांधावा.

८. काहींना अध्यात्मप्रसाराची सेवा किंवा अन्य कारणे यांमुळे बाहेर जावे लागते किंवा प्रवास करावा लागतो. ‘उष्णतेचा त्रास होऊ नये’, यासाठी पुरुषांनी खिशात आणि स्त्रियांनी त्यांच्या पर्समध्ये कांदा ठेवावा. कांदा शरिरातील उष्णता खेचून घेत असल्याने ३ – ४ दिवसांनी तो कोरडा पडतो. कोरडा पडलेला कांदा टाकून देऊन नवीन कांदा समवेत ठेवावा.

९. वातावरणात थंडावा रहाण्यासाठी कूलरची (वायूशीतलीकरण यंत्राची) सुविधा असेल, तर दिवसातील काही घंटे त्याचा वापर करावा.

१०. जागरण केल्याने शरिरात पित्त आणि वात हे दोष वाढतात. त्यामुळे अती जागरण टाळावे. (ही काळजी सर्व ऋतूंत घेणे आवश्यक आहे.)

११. या दिवसांत जास्त घाम येत असल्याने थकवाही लवकर येतो. त्यामुळे व्यायामाचे प्रमाण अल्प ठेवावे.

१२. १ वर्षापेक्षा लहान मुले, तसेच ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती यांची वरील सूत्रांच्या आधारे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.’

– वैद्या (कु.) शर्वरी बाकरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.३.२०२४)