Anti-Hindu Sham Manav : (म्हणे) ‘धीरेंद्रकृष्ण शास्त्री ब्राह्मण असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही का ?’ – शाम मानव, संस्थापक, अंनिस

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांनी तोडले अकलेचे तारे !

डावीकडून पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज आणि शाम मानव

मुंबई – कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यानुसार सर्वांवर कारवाई होणे अपेक्षित आहे; पण दुर्दैवाने तसे घडत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार उच्चभ्रू अन् ब्राह्मण जातीच्या बाबांवर कारवाई करत नाही. बागेश्‍वर धाम येथील पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज जन्माने ब्राह्मण असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही का ?, अशा शब्दांत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.

शाम मानव पुढे म्हणाले की,

१. वर्ष २००५ मध्ये जादूटोणाविरोधी कायदा बनत असतांना तत्कालीन सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी चिडून मला या कायद्याच्या प्रारूपाचे दुष्परिणाम समजावून सांगितले होते.

२. वर्ष २००५ मध्ये हा कायदा संमत झाला. त्या वेळी ते मला असे म्हणाले होते की, या कायद्यांतर्गत तुम्ही आमच्या आदिवासी बाबांवर कारवाई कराल. गरीब आणि दलित यांच्यावरही कारवाई कराल; पण उच्चभ्रू आणि ब्राह्मण बाबांवर कारवाई करू शकणार नाही. पोलीस काय किंवा सरकार काय ? कुणीही कारवाई करू शकणार नाही.

३. त्यावर मी त्यांना कायदा सर्वांसाठी समान असल्याची गोष्ट निदर्शनास आणून दिली. ‘उच्चभ्रू असो कि वरच्या जातीत जन्मलेले असो सर्वांवर कारवाई होणार’, असे मी त्यांना ठासून सांगितले होते. (ब्राह्मणद्वेषाची कावीळ झालेले आणखी दुसरे काय बोलणार ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • हिंदु राष्ट्र, ब्राह्मण यांच्याविषयी पोटशूळ उठणारे प्रा. शाम मानव जिहादी आतंकवाद्यांच्या ‘गझवा-ए-हिंद’च्या (भारताचे इस्लामीकरण करण्याच्या) कटाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांनी दिलेले आव्हान न स्वीकारता पळून जाणारे शाम मानव यांना जनता ओळखून आहे !