ASI Survey : मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचे ३२ पुरावे सापडले !  

ज्ञानवापीचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केलेले सर्वेक्षण

ज्ञानवापी

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापी मशिदीचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने सर्वेक्षण केले होते. त्याचा अहवाल हिंदु आणि मुसलमान पक्ष यांना देण्यात आला. हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी २५ जानेवारीला रात्री पत्रकार परिषद घेऊन या अहवालातील महत्त्याची सूत्रे सार्वजनिक केली. या सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मोठे मंदिर अस्तित्वात होते. हे मंदिर पाडून त्याच्या अवशेषांचा वापर करून तेथे मशीद बांधण्यात आली, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ८३९ पानांच्या या अहवालामध्ये या ठिकाणी मंदिर असल्याचे ३२ पुरावे सापडल्याची माहिती देण्यात आली आहे.

कधी झाले होते सर्वेक्षण ?

मे २०२२ मध्ये ज्ञानवापी येथे न्यायालय आयुक्तांकडून सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. ८४ दिवसांच्या सर्वेक्षणामध्ये ज्ञानवापी येथे जी.पी.आर्. (ग्राऊंड पेनेट्रेटिंग रडार – भूमी भेदक रडार), छायाचित्रे, चित्रीकरण आदींच्या माध्यमांचा वापर करण्यात आला. ३६ दिवसांमध्ये याचा अहवाल बनवण्यात आला. जी.पी.आर्. अहवाल बनण्यासाठी ३० दिवस लागले. हा अहवाल अमेरिकेच्या जी.पी.आर्. सर्वेक्षण तज्ञांनी बनवला.

मंदिर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलेले पुरावे

१. भगवान शिवाची जनार्दन, रुद्र आणि ओमेश्‍वर अशी ३ नावे सापडली.

२. मंदिर पाडून त्याचे खांब मशीद बांधण्यासाठी वापरण्यात आले.

३. मशिदीच्या पश्‍चिमेकडील भिंतीवरून ती मंदिराची भिंत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. ही भिंत ५ सहस्र वर्षांपूर्वी नागर शैलीत बांधण्यात आली होती.

४. भिंतीखाली १ सहस्र वर्षे जुने अवशेषही सापडले.

५. मशिदीचा घुमट केवळ ३५० वर्षे जुना आहे.

६. श्री हनुमान आणि श्री गणेश यांच्या भग्न मूर्तीही सापडल्या आहेत.

७. भिंतीवर त्रिशूलाचा आकार आहे.

८. मशिदीत औरंगजेब काळातील एक दगडी स्लॅबही सापडला.

९. तळघर ‘एस-२’मध्ये हिंदूंच्या देवतांच्या मूर्तीही सापडल्या.

१०. पुरातत्व विभागाने २ सप्टेंबर १६६९ या दिवशी मंदिर पाडल्याच्या इतिहासतज्ञ जदुनाथ सरकार यांच्या निष्कर्षावर विश्‍वास व्यक्त केला आहे.

११. सापडलेल्या खांबांवर ‘संवत १६६९’ लिहिलेले आणि ‘औरंगजेबाने मशीद १६७६-७७ मध्ये बांधली’, असे लिहिले आहे.

१२. भिंतींवर कन्नड, तेलगू, देवनागरी भाषेतील लिखाण सापडले.

१३. ज्ञानवापी मशिदीच्या खोल्यांमध्ये फुलांचे नक्षीकाम आहे.

१४. एका खांबावर अनेक घंटा, चारही बाजूंनी दीप कोरण्यात आले आहेत. त्यावर संवत १६६९ (म्हणजे १ जानेवारी १६१३) लिहिलेले आहे.

१५. एका खोलीत अरबी-फारशी भाषेत लिहिलेली एक शिळा सापडली. त्यावर मशिदीचे बांधकाम मोगल शासक औरंगजेबाच्या शासनकाळात (१६७६-७७) मध्ये केल्याचा उल्लेख आढळतो.

१६. याच शिळेवर वर्ष १७९२-९३ मध्ये मशिदीची देखभाल-दुरुस्ती करण्यात आल्याचे नमूद केलेले आहे. या शिळेचे छायाचित्र पुरातत्व विभागाकडेही उपलब्ध आहे. ताज्या पहाणीत ही शिळा मशिदीच्या एका खोलीत दिसून आली; परंतु मशिदीचे बांधकाम आणि विस्तार यासंबंधीच्या दगडावरील ओळी घासण्यात आल्या होत्या.

१७. परिसरातील सर्व शाळा आणि मंदिरे पाडण्याचा आदेश दिल्याचा औरंगजेबाचे चरित्र ‘मासिर-ए-आलमगिरी’मध्ये उल्लेख आहे. त्यानंतर काशीतील विश्‍वनाथ मंदिर पाडण्यात आले होते.

१८. दरवाजावर पशु-पक्ष्यांची चित्रे कोरली आहेत. या भागात विहीरदेखील दिसून आली.

१९. ‘महामुक्ती मंडप’ असा शब्द लिहिलेला एक शिलालेख आवारात सापडला.

(म्हणे) ‘पुरातत्व विभागाचे सर्वेक्षण व्यावसायिक पुरातत्व शास्त्रज्ञांसमोर टिकणार नाही !’ – असदुद्दीन ओवैसी

  • कोल्ह्याला द्राक्षे आंबट ! हा अहवाल मुसलमानांच्या बाजूने आला असता, तर ओवैसी यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली नसती, हेही तितकेच खरे !
असदुद्दीन ओवैसी

भाग्यनगर (तेलंगाणा) – व्यावसायिक पुरातत्व शास्त्रज्ञ किंवा इतिहासकार यांच्या कोणत्याही गटाच्या शैक्षणिक तपासणीला हे सर्वेक्षण टिकणार नाही. हा अहवाल अनुमानांवर आधारित आहे आणि वैज्ञानिक अभ्यासाची खिल्ली उडवतो.

एका महान विद्वानाने एकदा म्हटल्याप्रमाणे ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग म्हणजे हिंदुत्वाच्या हातातील बाहुले आहे’, अशी प्रतिक्रिया एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भातील पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षण अहवालावर ‘एक्स’वर पोस्ट करून व्यक्त केली आहे.

मुसलमानांनी स्वतःहून ज्ञानवापी हिंदूंना सोपवावी ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

नवी दिल्ली – हिंदु पक्ष यापुढे मुसलमान पक्षाशी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. मुसलमान पक्षानेच ज्ञानवापी हिंदूंना सोपवावी, असे आवाहन ज्ञानवापीच्या खटल्यातील हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. ‘मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधण्यात आल्याचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. वजूखान्याचे (नमाजापूर्वी हात-पाय धुण्याची जागा) भारतीय पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात येणार आहे. आम्ही आमचे मंदिर न्यायालयाच्या माध्यमातून मिळवू. लवकरच ज्ञानवापी परिसर आमचा होईल’, असा विश्‍वासही अधिवक्ता जैन यांनी या वेळी व्यक्त केला.

(सौजन्य : Aaj Tak)

जैन पुढे म्हणाले की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अहवालात असे सूचित केले आहे की, येथे मशीद आधीपासून अस्तित्वात असलेल्या जुन्या मंदिराच्या अवशेषांचा वापर करून बांधली गेली होती. ज्या मंदिरावर मशीद बांधली गेली होती त्या मंदिराच्या अस्तित्वाचे पुरेसे पुरावे सापडल्याचे सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे. (मुसलमानांनी आतापर्यंतची मानसिकता पहाता, हे शक्य नाही, असेच लक्षात येते. त्यामुळे हिंदूंना कायदेशीर लढाईनेच ज्ञानवापी आणि मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी मिळवावी लागणार आहे, हे स्पष्ट आहे ! – संपादक)

देशात जितक्या मंदिरांना तोडून मशिदी बांधल्या, त्या सर्व आम्ही परत घेणार !

जोपर्यंत आम्ही देशांतील सर्व मंदिरांना परत घेत नाही, तोपर्यंत आमची लढाई चालूच रहाणार आहे. देशात जितक्या मंदिरांना तोडून मशिदी बांधण्यात आल्या आहेत, त्या सर्व आम्ही परत घेणार आहोत. काशी, मथुरा, टिलेवाली मस्जिद, ताजमहाल, कुतूबमिनार आम्ही परत घेणार आहेत, अशी स्पष्टोक्ती अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केली.

संपादकीय भूमिका

  • श्रीरामजन्मभूमीच्या सर्वेक्षणातही तेथे पूर्वी मंदिर असल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने ती भूमी हिंदूंना दिली होती. आता न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पहाता मुसलमानांनी स्वतःहून ज्ञानवापी मशीद हिंदूंना सोपवावी आणि धर्मनिरपेक्षता, निधर्मीवाद, सर्वधर्मसमभाव दाखवून द्यावा ! यासाठी अशा विचारसरणीच्या काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आदींनी पुढाकार घ्यावा, असेच हिंदूंना वाटते !