सनातन धर्मात मानवतेपुढील सर्व प्रश्‍नांचे निराकरण करण्याची क्षमता ! – रमेश बैस, राज्यपाल

सनातन धर्माचे अमेरिकेतील अभ्यासक आनंद मॅथ्यूज यांच्या ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’ या पुस्तकाचा मुंबई येथे प्रकाशन सोहळा !

पुस्तक प्रकाशन करतांना आध्यात्मिक गुरु मोहनजी, मेजर जनरल जी.डी. बक्षी, राज्यपाल रमेश बैस, आनंद मॅथ्यूज, निवृत्त कर्नल अशोक किणी आणि डॉ. निशिथ भांडारकर

मुंबई – व्यक्तीगत, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आज अशांती आहे; परंतु मानवतेपुढील सर्व समस्यांचे निराकरण सनातन धर्माच्या ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ या व्यापक शिकवणीत आहे. सनातन धर्मातील या शिकवणीचे शास्त्रशुद्ध विवेचन करून ते युवापिढीला सांगण्याचे अमेरिकन लेखक आनंद मॅथ्यूज करत असलेले कार्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. अमेरिकन सिनेमॅटोग्राफर आणि सनातन धर्माचे अभ्यासक आनंद मॅथ्यूज यांनी लिहिलेल्या ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु (In Quest of Guru)’ (‘गुरूंच्या शोधात !’) या पुस्तकाचे प्रकाशन १६ डिसेंबर या दिवशी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

सौजन्य राजभवन महाराष्ट्र 

‘भारतीय तत्त्वज्ञानात गुरूंना पुष्कळ महत्त्व आहे. गुरूंना ईश्‍वरापेक्षाही अधिक महत्त्व दिले आहे; कारण गुरुच ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग दाखवतात. गुरूंचा शोध हा वास्तविक स्वतःचा शोध असतो. आनंद मॅथ्यू यांनी गुरूंचा शोध घेतांना सनातन धर्माचे अनुभवसिद्ध तत्त्वज्ञान सोप्या भाषेत युवकांना विशद करून सांगितले आहे’, असे सांगून राज्यपालांनी लेखकाचे अभिनंदन केले. विश्‍व संवाद केंद्राच्या वतीने आयोजित या प्रकाशन सोहळ्याला सेवानिवृत्त सैन्याधिकारी मेजर जनरल जी.डी. बक्षी, निवृत्त कर्नल अशोक किणी, ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’ या पुस्तकाचे लेखक आनंद मॅथ्यूज, आध्यात्मिक गुरु मोहनजी, विश्‍व संवाद केंद्राचे मुख्य संवाद अधिकारी डॉ. निशिथ भांडारकर आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल रमेश बैस पुढे म्हणाले, ‘‘आज विद्यार्थ्यांना शाळेत भौतिक ज्ञान-विज्ञान शिकवले जाते. मुलांचा बुद्ध्यांक वाढत आहे; परंतु जीवन जगण्याची कला त्यांना शिकवली जात नाही. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लोक वैयक्तिक, सामाजिक, तसेच राष्ट्र स्तरावर अशांत आणि अस्वस्थ आहेत; मात्र सनातन धर्माच्या माध्यमातून वैयक्तिक, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील समस्यांचे निराकरण केले जाऊ शकते.’’

युद्ध क्षेत्रात असतांना अध्यात्माकडे वळलो ! – जी.डी. बक्षी, निवृत्त मेजर जनरल

जी.डी. बक्षी

भारतीय सेनादलात ४१ वर्षे कार्यरत असतांना वर्ष १९७१ चे युद्ध, कारगिलचे युद्ध, तसेच काश्मीरातील चकमकी घडत असतांना मी तेथे सहभागी होतो. त्या वेळी माझ्या आजूबाजूला सैनिकांचा मृत्यू होतांना मी पाहिले. अनेकांना मरतांना मी पाणी पाजले. हे सगळे पाहिल्यावर आपोआप माझ्या जीवनात अध्यात्म आले. पाश्‍चिमात्य ज्ञान हे केवळ तात्त्विकतेवर (थेअरीवर) आधारित आहे; पण भारतीय तत्त्वज्ञान हे अनुभव आणि अनुभूती यांवर आधारित आहे. आनंद मॅथ्यूज यांनी लिहिलेले पुस्तक असेच अनुभव, अनुभूतींवर आधारित आहे.

गुरुकृपेविना मोक्ष शक्य नाही ! – निवृत्त कर्नल अशोक किणी

अशोक किणी

जेव्हा कारगिलचे युद्ध चालू होते, तेव्हा आपल्याकडे वीरगती मिळालेल्या सैनिकांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबांकडे सोपवण्याचे दायित्व माझ्याकडे होते. ते पार पाडतांनाच मी अंतर्मुख झालो आणि अध्यात्माच्या दिशेने माझा प्रवास चालू झाला. जीवनात गुरुकृपेविना मोक्ष शक्य नाही; पण त्यासाठी आपल्यात भाव हवा. जेव्हा आनंद मॅथ्यू माझ्याकडे आले होते, तेव्हा त्यांच्यात भरपूर नकारात्मकता होती. ते लहान असतांना त्यांच्यावर अनेक संकटे आली. जेव्हा मी त्यांना दिशा दिली, तेव्हा त्यांनीही तितक्याच तळमळीने प्रयत्न केले. त्यामुळेच आज त्यांचा आत्मा जागृत झाला आहे.

सनातन धर्म जीवनात आनंदी कसे रहायचे, ते शिकवतो ! – आनंद मॅथ्यूज 

आनंद मॅथ्यूज

लहानपणी माझे आयुष्य आव्हाने आणि संकटे यांनी भरलेले होते. नंतर मी सिनेमॅटोग्राफर म्हणून जगभर भ्रमंती चालू केली. जेव्हा मी भारतात आलो, तेव्हा मला अध्यात्म, तसेच जीवनाचा उद्देश समजला. भारतातील तरुण मात्र यापासून दूर असल्याचे मला आढळून आले. सनातन धर्म ‘जीवनात आनंदी कसे रहायचे’, ते शिकवत असतो. स्वतःचा शोध घेत असतांना मला गुरु म्हणून श्री. अशोक किणी भेटले. त्यांनी मला दिशा दिली. हे पुस्तक केवळ माझा अध्यात्माचा मार्ग सांगत नाही, तर प्रत्येकाचा अध्यात्मातील प्रवास मांडत आहे.