सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर अनाहतचक्रावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होऊन औषधाने बरा न होणारा दम्याचा त्रास उणावणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. दम्याचा तीव्र त्रास चालू होऊन थकव्यामुळे झोपून रहाणे

‘१.२.२०२१ या दिवशी मी मुंबईला माझ्या एका महत्त्वाच्या कामासाठी गेलो होतो. काम पूर्ण झाले आणि त्याच दिवशी मला ताप अन् खोकला झाला. नंतर मला दम्याचा (अस्थमाचा) त्रास चालू होऊन श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. दम्यामुळे मला सतत खोकला येत होता. छातीतील कफ बाहेर पडत नव्हता. सतत खोकल्यामुळे ‘माझे लक्ष सतत कधी श्वास घेऊ शकेन’, याकडे असायचे. त्या वेळी माझ्याकडून दैनंदिन कामही होत नव्हते. फार थकवा येऊन मी झोपूनच होतो.

श्री. अतुल दिघे

२. आधुनिक वैद्यांनी दिलेली औषधे घेऊनही त्रास अल्प न होणे

आधुनिक वैद्यांनी मला दम्यावर औषधे दिली; पण त्रास अल्प झाला नाही. आधुनिक वैद्यांना परत दाखवल्यावर त्यांनी औषध पालटून दिले, तरी दम्याचा त्रास अल्प झाला नाही. तेव्हा मी दम्यावरचे आणीबाणीचे ‘पफर’ हे औषध घेतले; पण त्रास न्यून होत नव्हता.

३. सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर अनाहतचक्रावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होऊन दम्याचा त्रास उणावणे

नंतर सौ. अवंतिकाने (पत्नीने) मला सद्गुरु गाडगीळकाकांनी दम्यासाठी दिलेला नामजप करण्यास सांगितला. ते उपाय मी चालू केल्यावर ‘मला हळूहळू दम्याचे आणीबाणीचे औषध ‘पफर’ याचा परिणाम होतोय’, असे जाणवायला लागले. छातीतील कफ बाहेर पडायला लागला आणि श्वसननलिकेची सूज उणावायला लागली आणि छातीत श्वासाची क्रिया जाणवायला लागली आहे. दीड महिन्यानंतर मला ९० टक्के बरे वाटायला लागले आहे. अशा रीतीने सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय चालू केल्यावर लगेच परिणाम व्हायला लागला. तेव्हा लक्षात आले की, अनाहतचक्रावर एवढे आवरण होते की, औषधांचा काहीच परिणाम होत नव्हता.

मी सद्गुरु गाडगीळकाकांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो की, ‘त्यांच्या नामजपादी उपायांमुळे मला बरे वाटू लागले.’ तसेच मी प.पू. डॉक्टरांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कृतज्ञता व्यक्त करतो की, ‘त्यांनी संतांच्या माध्यमातून माझ्यावर कृपा केली.’

– श्री. अतुल दिघे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.३.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक