Maldives withdraws Indian army : भारतीय सैन्‍य माघारी घेण्‍याचे मालदीवच्‍या नवनिर्वाचित आणि चीनधार्जिण्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांचा आदेश !

नवी देहली – मालदीवचे नवनिर्वाचित राष्‍ट्राध्‍यक्ष महंमद मुइझ्‍झू यांनी राष्‍ट्राध्‍यक्षपदाची शपथ घेतल्‍यानंतर दुसर्‍याच दिवशी म्‍हणजे १८ नोव्‍हेंबरला भारतीय सैन्‍याचे मालदीवमध्‍ये असलेले सैनिक परत बोलवण्‍याचे औपचारिक निर्देश दिले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मालदीवची राजधानी माले येथे मुइझ्‍झू यांची भेट घेतल्‍यानंतर त्‍यांच्‍या कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली.

१. मुइझ्‍झू यांनी सप्‍टेंबरमध्‍ये झालेल्‍या राष्‍ट्राध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीत भारताशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले विद्यमान अध्‍यक्ष इब्राहिम महंमद सोलिह यांचा पराभव केला होता. ‘भारतीय सैनिकांना परत पाठवण्‍याच्‍या आश्‍वासनावर मतदारांनी मला कौल दिला’, असा दावा मुइझ्‍झू यांनी त्‍या वेळी केला होता.

२. १७ नोव्‍हेंबर या दिवशी त्‍यांच्‍या झालेल्‍या शपथविधीला किरेन रिजीजू उपस्‍थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या ‘सागरमाला’ आणि ‘नेबरहूड फर्स्‍ट पॉलिसी’ (शेजारी देशांना प्रथम प्राधान्‍य धोरण) या संकल्‍पनेमध्‍ये मालदीवला विशेष स्‍थान देण्‍यात आले आहे.

३. मालदीवमध्‍ये कार्यरत भारतीय सैनिक वैद्यकीय साहाय्‍य, तसेच अमली पदार्थ तस्‍करी रोखण्‍याच्‍या कामात वैमानिक म्‍हणून दायित्‍व पार पाडत होते.

संपादकीय भूमिका

राष्‍ट्राध्‍यक्ष महंमद मुइझ्‍झू चीनधार्जिणे असल्‍याने आणि त्‍यांनी जनतेला निवडणुकीत याविषयी आश्‍वासन दिल्‍यानेच ही घटना घडत आहे. भारताने महंमद मुइझ्‍झू यांना ‘भारताच्‍या विरोधात गेल्‍यावर काय होऊ शकते ?’ याचा धडा शिकवला पाहिजे’, असेच जनतेला वाटते !