दीपावलीच्‍या तेजावरील फटाक्‍यांची काजळी दूर करून तिला पुनर्तेज प्राप्‍त करून देऊया !

मुलांना कुणी सांगितले की, ‘यंदा दिवाळीला कुणीही फटाके फोडायचे नाहीत’, तर मुले त्‍याचे ऐकतील का ? अजिबात नाही. ‘फटाके दिवाळीला फोडायचे नाही, तर केव्‍हा फोडायचे ?’, असा लागलीच त्‍यांचा प्रतिप्रश्‍नही असेल. अर्थात् ही चूक लहानग्‍यांची अजिबात नाही. गेल्‍या काही वर्षांपासून दिवाळीनिमित्त एवढ्या प्रचंड प्रमाणात फटाके फोडले जातात की, फटाके हीच दिवाळीची खरी ओळख आहे कि काय ? असा प्रश्‍न पडतो. संपूर्ण भारतभरात उत्‍साहाने साजरी होणार्‍या दिवाळीतील सामायिक गोष्‍ट, म्‍हणजे या दिवसांत सर्वत्र मोठ्या प्रमाणात दिवे लावले जातात. दीपावली हा दिव्‍यांचा उत्‍सव आहे. कुणी कितीही गरीब असला, तरी त्‍याच्‍या घरी छोट्या प्रमाणात का होईना; पण दिवाळी साजरी होतेच.

खरे तर दिवाळीसारख्‍या धार्मिक सणाचा आणि फटाके फोडण्‍याचा तसे काही संबंध इतिहासात मिळत नाही. पूर्वीचे राजे, महाराजे आनंदाच्‍या क्षणी आतषबाजी करत असल्‍याचे दाखले इतिहासात सापडतात; मात्र दिवाळीत फटाके फोडण्‍याच्‍या प्रथेला तसा कोणताही शास्‍त्रीय आधार नाही. आपल्‍याकडे मात्र शोभेपेक्षा अधिकाधिक आवाजाच्‍या फटाक्‍यांचीच स्‍पर्धा प्रतिवर्षी पहायला मिळते. अलीकडच्‍या काळात, म्‍हणजे वर्ष १९२३ मध्‍ये कोलकातामध्‍ये नाडर बंधूंनी आगपेटीच्‍या कारखान्‍यांमध्‍ये सर्वप्रथम फटाक्‍यांची निर्मिती केली. वर्ष १९४० मध्‍ये तमिळनाडूतील शिवकाशी येथे फटाक्‍यांचा पहिला कारखाना चालू झाला. आज तिथे फटाक्‍यांचे प्रचंड मोठे कारखाने आहेत. येथून संपूर्ण भारतात फटाके पुरवले जातात. ही आतिषबाजी आता फटाक्‍यांच्‍या रूपाने दिवाळीत सर्वत्र होऊ लागली आहे.

फटाक्‍यांच्‍या माध्‍यमातून कोट्यवधी रुपयांची राखरांगोळी करणे कितपत योग्‍य ?

दिवाळीच्‍या तोंडावर प्रतिवर्षी प्रशासनाकडून फटाके फोडण्‍यासंदर्भातील नियमावली घोषित केली जाते, ज्‍यात आवाजाच्‍या मर्यादेपासून फटाके फोडण्‍यासाठीची निषिद्ध क्षेत्रेही नमूद केलेली असतात; मात्र शहरांसारख्‍या ठिकाणी या नियमावलीला सर्रासपणे हरताळ फासला जातो ! ‘सर्वत्रच फटाक्‍यांची आतिषबाजी चालू असल्‍याने कारवाई तरी कुणावर करणार ?’, असा यक्ष प्रश्‍न प्रशासनासमोर असतो. वर्ष २०२१ मध्‍ये देशभरात अनुमाने १ सहस्र ५०० कोटी रुपयांचे फटाके केवळ दिवाळीच्‍या दिवसांत फोडले गेले. यंदा हा आकडा याहून अधिक असेल.

आजमितीला लोकसंख्‍येत अव्‍वल असलेल्‍या भारतातील बराचसा भाग दारिद्य्ररेषेखाली जीवन कंठत आहे. त्‍यांना दोन वेळेचे पोटभर अन्‍न मिळणेही दुरापास्‍त आहे. देशातील कित्‍येक गावे कुपोषित आहेत. दिवसागणिक वाढत जाणार्‍या महागाईने सर्वसामान्‍यांचे जगणे अवघड केले आहे. अशा परिस्‍थितीत केवळ क्षणिक मौजेखातर फटाक्‍यांच्‍या माध्‍यमातून कोट्यवधी रुपयांची राखरांगोळी करणे कितपत योग्‍य आहे ?

फटाक्‍यांमुळे होणारी अपरिमित हानी !

१. शिवकाशी हे ठिकाण अव्‍वल दर्जाचे फटाके बनवण्‍यासाठी देशभर प्रसिद्ध आहे; मात्र याच शिवकाशीमध्‍ये प्रतिवर्षी फटाक्‍यांच्‍या कारखान्‍यांना आगी लागून जीवित आणि वित्त हानी होण्‍याच्‍या अनेक घटना घडत असतात. या कारखान्‍यांतील दारूच्‍या प्रभावामुळे कारखान्‍यांत काम करणारे कितीतरी कामगार आणि लहान मुले यांना असाध्‍य आजार जडतात.

२. याखेरीज दिवाळीच्‍या काळात फटाक्‍यांच्‍या गोदामांना वा दुकानांना आगी लागल्‍याची अनेक वृत्ते प्रतिवर्षी वाचनात येतात.

३. फटाके फोडतांना कित्‍येक जण भाजतात. काही मुलांचे डोळे जातात. जळके फटाके इतरत्र उडाल्‍यामुळे आगी लागण्‍याच्‍या घटना घडतात; ज्‍यामध्‍ये प्रतिवर्षी अनेक दगावतात, तर शकडो जण घायाळ होतात.

४. या काळात अग्‍नीशमन दलावर प्रचंड ताण असतो.

५. केवळ फटाक्‍यांच्‍या कारणावरून अनेक ठिकाणी भांडणे, मारामार्‍या होतात.

६. वर उल्लेख केल्‍याप्रमाणे आपल्‍याकडे प्रतिवर्षी अधिकाधिक आवाजाच्‍या फटाक्‍यांची स्‍पर्धा लागलेली पहायला मिळते. कानठळ्‍या बसवणार्‍या आवाजाच्‍या फटाक्‍यांमुळे इमारतींना तडे जातात, खिडक्‍यांच्‍या काचा फुटतात, तसेच छताचे प्‍लास्‍टर सैल होण्‍याचाही धोका असतो. विजेचे काचेचे बल्‍बही फटाक्‍यांच्‍या आवाजामुळे फुटतात.

७. दिवाळीत फोडल्‍या जाणार्‍या फटाक्‍यांमुळे लोकांच्‍या आरोग्‍यावर सर्वाधिक परिणाम होतो. कानठळ्‍या बसवणार्‍या फटाक्‍यांमुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. अतीआवाजामुळे कान बधीर होतात. श्रवणयंत्रणेतील पेशी एकदा मृत झाल्‍या की, त्‍या पुन्‍हा नव्‍याने निर्माण होत नाहीत. गर्भवती महिला, दीर्घ आजाराने ग्रस्‍त असलेले रुग्‍ण आणि नवजात बालके यांच्‍यावर फटाक्‍यांच्‍या आवाजाचा भयंकर परिणाम होतो.

८. मायग्रेन, रक्‍तदाब आणि हृदयविकाराचा त्रास असणार्‍या रुग्‍णांच्‍या त्रासामध्‍ये  फटाक्‍यांच्‍या अतीआवाजामुळे अधिक वाढ होण्‍याची शक्‍यता असते.

९. फटाके फोडल्‍यावर निर्माण होणार्‍या विषारी धुरामुळे प्रचंड वायूप्रदूषण होते, ज्‍याचा त्रास लहान मुलांसह दमा आणि फुप्‍फुसाचे आजार असलेल्‍यांना अधिक होत असतो.

भारतातही फटाके फोडण्‍यावर बंधने हवीत !

अमेरिकेसारख्‍या विकसित देशात मानवी आरोग्‍यावर परिणाम करणार्‍या फटाक्‍यांवर बंदी घालण्‍यात आली आहे. न्‍यूझीलंड, इटली, फ्रान्‍स, बेल्‍जियम या देशांत केवळ प्रौढ व्‍यक्‍तींनाच फटाके विकत घेण्‍यास आणि फोडण्‍यास अनुमती आहे. आपल्‍याकडे मात्र असे कोणतेही धोरण प्रशासनाने आखलेले नाही. उलट इथे घरातील प्रौढच फटाके आणून ते लहानांना फोडण्‍यासाठी उपलब्‍ध करून देतात.

दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्‍या दिवशी घराघरांत श्री महालक्ष्मी आणि श्री कुबेर यांचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही धनाची देवता, तर कुबेर हा धनसंचयाचा देव आहे. एकीकडे योग्‍य मार्गाने धनप्राप्‍तीसाठी देवीलक्ष्मीची आणि आलेले धन टिकून रहाण्‍यासाठी कुबेराची पूजा करायची अन् दुसरीकडे लक्ष्मीच्‍या कृपेने मिळालेले धन फटाक्‍यांच्‍या माध्‍यमातून विनाकारण व्‍यय करायचे हा विरोधाभास नव्‍हे का ?

प्राचीन युगात राक्षस नागरिकांना त्रास देऊन आसुरी आनंद मिळवायचे. आताच्‍या काळी फटाके फोडून इतरांना त्रास देऊन साजरा केल्‍या जाणार्‍या आनंदाला आसुरी आनंदच म्‍हणावे लागेल, नाही का ?

घरापासूनच आरंभ करा !

आपल्‍याला एखादा आजार झाला की, त्‍यावर वेळीच उपचार घेऊन आपण त्‍याचे निराकरण करतो. फटाक्‍यांच्‍या अतिरेकाच्‍या रूपाने आपल्‍या हिंदु संस्‍कृतीतील दीपावलीसारख्‍या सर्वांत महत्त्वाच्‍या आणि मोठ्या, मंगलमय अन् सात्त्विक सणाला एकप्रकारचा आजारच जडला आहे. तो दूर करण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.

फटाक्‍यांच्‍या हानीच्‍या रूपाने दीपावलीच्‍या तेजाला लागलेली फटाक्‍यांची काजळी दूर करून तिला पुनर्तेज प्राप्‍त करून द्यायचे असेल, तर आरंभ आपल्‍या घरापासूनच करावा लागेल ? करणार ना ?

– जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई. (५.११.२०२२)