…अशा हिंदूंना अज्ञानी, विकले गेलेले कि ‘अपघाताने हिंदु जन्मलेले’ काय म्हणावे ?

हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी – भाग १३

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/728521.html

१. भगव्या आतंकवादाचा शोध लावणारे जन्महिंदू !

‘केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात सातत्याने बाँबस्फोट आणि आत्मघातकी आक्रमणे करून गैरमुसलमानांना क्रूरपणे ठार मारणारे सर्व आतंकवादी हे कट्टर आणि धर्मांध मुसलमानच असल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. अनेक इस्लामी राष्ट्रेसुद्धा या धर्मांध आणि कट्टर मुसलमानांमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. ‘सर्व मुसलमान आतंकवादी नाहीत; पण सर्व आतंकवादी हे मुसलमानच आहेत’, हे समीकरणही सिद्ध झाले आहे; पण काही अपघाताने हिंदु म्हणून जन्मलेल्यांना हे वास्तव पचवणे अवघड झाले होते; म्हणून त्यांनी ‘भगव्या आतंकवादाचा’ शोध लावला. एरव्ही ‘आतंकवाद्यांचा कोणता धर्म नसतो, त्याला कोणता रंग नसतो’; म्हणून आतंकवाद्यांची बाजू घेणार्‍यांना हिंदूंच्या मुळातच अस्तित्वात नसणार्‍या आतंकवादाला भगवा रंग देतांना मात्र ‘ना जनाची लाज वाटली, ना मनाची !’ मालेगाव आणि समझौता एक्सप्रेसमधील झालेल्या बाँबस्फोटात हिंदूंना कसे जाणीवपूर्वक गोवले गेले होते, हे वास्तव क्रमाक्रमाने उघड होते आहे.

श्री. शंकर गो. पांडे

२. हिंदूंनीच ‘२६/११’चे (वर्ष २००८) आक्रमण केले म्हणणारे जन्महिंदू !

एक फार चांगले झाले किंबहुना, मी तर म्हणेन की, हिंदूंच्या साहाय्याला प्रत्यक्ष परमेश्वरच धावून आलेला आणि ‘२६/११’च्या मुंबईवरील आतंकवाद्यांच्या आक्रमणातील अजमल कसाब या आतंकवाद्याला तुकाराम ओंबळे या शूर पोलिसाने जिवावर उदार होऊन जिवंत पकडले. हिंदूंनी तुकाराम ओंबळे यांचे कायम ऋणी राहिले पाहिजे; कारण अजमल जिवंत पकडला गेला नसता, तर या षड्यंत्राच्या माध्यमातून ‘संपुआ’ (संयुक्त पुरोगामी आघाडी) सरकारमधील काही जन्महिंदु नेत्यांचे, ‘पाकिस्तानसमवेत संगनमत करून’, हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे भयंकर विषारी षड्यंत्र सफल झाले असते ! ‘पाकिस्तानमधील आतंकवाद्यांना हिंदु नावे देऊन, त्यांना हिंदु बांधतात तशी रक्षासूत्रे (राखी) बांधून ‘२६/११ चे आक्रमण हे हिंदूंनीच केले’, हे भारतातील ‘संपुआ’मधील काही हिंदु नेत्यांनीच रचलेले षड्यंत्र होते’, असा खुलासा नुकताच माजी केंद्रीय गृहसचिव आर्.व्ही.एस्. मणी यांनी केला आहे. काही मुसलमान आणि ख्रिस्ती नेत्यांसमवेत जेव्हा काही जन्महिंदु नेतेही आपल्याच धर्मबांधवांना आतंकवादी ठरवण्याचे षड्यंत्र रचतात, तेव्हा अशा हिंदूंना ‘जयचंदाची औलाद’ म्हटल्यास चूक ठरील काय ?

३. हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवणारे जन्महिंदु !

मुंबईवरील आक्रमणातील एक आतंकवादी कसाब याला जिवंत पकडल्यानंतर आणि त्याच्याकडून हे आक्रमण कुणी केले, हे ठाऊक झाल्यानंतरही अजीज बर्नी नावाच्या एका हिंदुद्वेष्ट्या पत्रकाराने ‘२६/११’चे आक्रमण ‘आर्.एस्.एस्.चे षड्यंत्र’ (रा.स्व. संघाचे षड्यंत्र) या नावाचे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाद्वारे धडधडीत खोटे पुरावे देऊन हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा घृणित प्रयत्न त्याने केला होता, अर्थात् अजीज  बर्नी या धर्मांध पत्रकाराने असे हिंदूंची अपकीर्ती करणे एक वेळ क्षम्य म्हणता येईल; पण या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला दिग्विजयसिंह यांनीही उपस्थित राहून अजीज बर्नीच्या सुरात त्यांचाही सूर मिसळावा, याला काय म्हणावे ? प्रखर हिंदुद्वेष्ट्या जिहादी वृत्तीच्या आणि मुसलमान तरुणांची माथी भडकावणार्‍या पळपुट्या डॉ. झाकीर नाईकला ‘शांतीदूत’ म्हणणारे, क्रूरकर्मा ओसामा बिन लादेनसाठी ‘ओसामाजी’, असे आदरार्थी संबोधन वापरणारे दिग्विजयसिंह यांना ‘अपघाताने झालेले हिंदू’ नाही, तर अन्य काय म्हणावे ?

४. हिंदु आतंकवादी असते, तर इस्लामी राष्ट्रातील मुसलमानांपेक्षाही ते अधिक सुरक्षित राहिले असते का ?

मुळात हिंदु पूर्वीही कधी आतंकवादी नव्हता आणि आजही नाही. तो आतंकवादी असता, तर त्याने मुसलमान आणि ख्रिस्ती यांना आपल्या देशात आश्रय दिला असता का ? त्यांना धर्मांतराची, आपली लोकसंख्या वाढवण्याची, सहस्रो मशिदी आणि चर्च बांधण्याची मुभा दिली असती का ? त्यांना हिंदूंपेक्षाही अधिक धार्मिक स्वातंत्र्य आणि अधिकार दिले असते काय ? हिंदु आतंकवादी असता, तर काश्मीरमधील हिंदू आपल्याच मातृभूमीत विस्थापित झाले असते का ? हिंदु आतंकवादी असते, तर येथील मुसलमान इस्लामी राष्ट्रातील मुसलमानांपेक्षाही अधिक सुखी आणि सुरक्षित राहिले असते का ?; पण अपघाताने जन्मलेले हिंदू एवढा विचार करायलाही सिद्ध नाहीत !

५. काँग्रेसवाले आणि औरंगजेब यांच्याविषयी अवाक्षरही न काढणारे हिंदू म्हणजे ‘कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ’!

गांधी यांच्या हत्येचे भांडवल करून एका ब्राह्मणापायी सर्व ब्राह्मण समाजालाच गांधीजींचे हत्यारे ठरवून सहस्रो ब्राह्मणांची घरे जाळणारे, त्यांना बेघर करणारे, शेकडो ब्राह्मणांची हत्या करणारे, २ शिखांनी इंदिरा गांधी यांची हत्या केली; म्हणून संपूर्ण शीख समाजालाच दोषी ठरवून ३ सहस्र शिखांची क्रूरपणे हत्या करणारे; पण छत्रपती संभाजी महाराज, शीख धर्मगुरु अर्जुनदेव तेगबहादूर; गुरु गोविंदसिंह यांचे २ अल्पवयीन पुत्र जोरावर सिंग  आणि बाबा फतेह सिंग यांना नृशंसपणे ठार करणार्‍या धर्मवेड्या औरंगजेबाविषयी मात्र तोंडातून एक अवाक्षरही न काढणारे हिंदू, हे केवळ ‘अपघातानेच जन्मलेले हिंदू’ असू शकतात !

बंगाल असो, केरळ असो, हिंदु असणारेच शासनकर्ते जेव्हा आपली विचारसरणी न मानणार्‍या हिंदूंचे सरसकट खून करणार्‍या, हिंदु  देवतांच्या मूर्तींची विटंबना करणार्‍या, गायीच्या वासरांची भरचौकात हत्या करून त्याचे मांस शिजवून खाणार्‍या धर्मांधांना पाठीशी घालतात, ते अशा जन्महिंदूंना ‘कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ’, असे म्हणणे भाग पडते.

६. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणणारे आणि रा.स्व. संघावर बंदी घालणारे ‘अपघाताने झालेले हिंदू’च ! 

गांधी यांच्या हत्येत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि रा.स्व. संघ यांचा दुरान्वयेही सहभाग नव्हता. असे असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक करण्यात आली, तर रा.स्व. संघावर बंदी घालण्यात आली होती. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकर यांच्या ‘सागरा प्राण तळमळला…’ या एका कवितेला चाल लावून ती कविता ‘ऑल इंडिया रेडिओ’वरून प्रसारित केली होती. परिणाम काय झाला ? तर ८ दिवसांच्या आत त्यांना नोकरीवरून काढण्यात आले. हिंदूंच्या हिताचे कार्य करणारे, राष्ट्रासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर असोत कि रा.स्व. संघ असो, त्यांचा एवढा द्वेष करणारे केवळ ‘अपघातानेच झालेले हिंदू’ असू शकतात. सावरकर यांच्यासाररख्या प्रखर राष्ट्रभक्तांना ‘माफीवीर’ म्हणणारे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गायीसंबंधीच्या केवळ सोयीस्कर मताचा आधार घेऊन ‘गाय आपली माता नाही आणि गोमांस खाण्यात गैर नाही’, असे बेशरमपणे मुसलमानांच्या गोहत्येचे समर्थन करणारे हिंदू असूच शकत नाहीत. ज्याच्या नावातच सीता आणि राम या हिंदु देवतांची नावे आहेत, अशी व्यक्ती जेव्हा हिंदूंनाही हिंसाचारी ठरवण्यासाठी महाभारताचे उदाहरण देते, तेव्हा अशा जन्महिंदूला ‘हिंदु’ म्हणावे कि नाही ? असा प्रश्न पडतो.

७. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ‘आत्मनिर्भर’ करण्यासाठी केलेले आमूलाग्र पालट

नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होण्यापूर्वी या देशात प्रतिदिन कुठे ना कुठे बाँबस्फोट होऊन शेकडो निष्पाप लोकांचे मृत्यू होत होते. कोट्यवधी रुपयांची वित्तहानी व्हायची; पण वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तेव्हापासून भारतात कुठेही बाँबस्फोट झाला नाही. हिंदूंच्या योगशास्त्राला संपूर्ण जगाने मान्यता देऊन सहर्ष स्वीकृत केले. भारताच्या भेटीवर येणार्‍या प्रत्येक देशाच्या राष्ट्रप्रमुखांना भारताची ओळख म्हणून ताजमहालासारख्या एका थडग्याची प्रतिकृती देण्याची जी अमंगल प्रथा होती, ती प्रथा मोदींनी बंद केली आणि त्याऐवजी विश्ववंद्य असणारा हिंदूंचा ‘गीता’ धर्मग्रंथ देण्याची प्रथा चालू केली. काश्मीरला भारतापासून विभक्त करणारी कलम ‘३७०’ (जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम) आणि ‘३५ अ’ ही कलमे रहित केली.

यामुळे काश्मीरला भारतातील इतर घटक राज्यांसारखा दर्जा मिळाला. गेल्या ५०० वर्षांपासून हिंदूंना एखाद्या शूलासारखी टोचून वेदना देणारी श्रीरामजन्मभूमीची जटील समस्या सोडवून श्रीराम मंदिर उभारण्याचा मार्ग प्रशस्त केला. काशीसारख्या हिंदूंच्या एका प्राचीन आणि प्रमुख अशा धर्मस्थळाचा देखणा जीर्णाेद्धार केला. भारताला अनेक क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ करून देशाची संरक्षणव्यवस्था एवढी सिद्ध केली की, चीनसारखे बलाढ्य राष्ट्रही आता भारताला वचकून आहे.

८. मोदी यांनी अनेक आमूलाग्र पालट घडवूनही जन्महिंदूंनी त्यांना गलिच्छ शिव्यांची लाखोली वहाणे !

मुसलमान समाजातील लाखो स्त्रिया त्यांच्या धर्मातील ‘तलाक’च्या (घटस्फोट) पद्धतीने पीडित आणि भयग्रस्त होत्या. मोदींनी भारतीय दंड विधानात ‘तलाक’चा कायदा करून त्या स्त्रियांना भयमुक्त करून न्याय दिला. नागरिकत्व सुधारणा कायद्यात योग्य ती दुरुस्ती संमत करून पाकिस्तान आणि बांगलादेश येथून जाचापायी विस्थापित होऊन, भारताच्या आश्रयाला आलेले लाखो हिंदु धर्मीय, तसेच बौद्ध, जैन, शीख या पंथांच्या आणि ख्रिस्ती धर्माच्या लोकांना भारताचे नागरिकत्व दिले. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी एकीकडे भ्रष्टाचाराची अनेक बिळे बुजवली, तर दुसरीकडे या भ्रष्टाचारावरील निर्बंधामुळे प्राप्त झालेल्या पैशातून शेकडो जनकल्याणकारी योजना कार्यवाहीत आणल्या; पण एक दिवसही सुटी न घेणार्‍या आणि देशासाठी १८-१८ घंटे शारीरिक, तसेच मानसिक कष्ट घेणार्‍या मोदींना ‘अपघाताने हिंदु म्हणून जन्मलेल्या’ हिंदूंनी काय दिले ? तर ‘मौत का सौदागर’, ‘नीच किसमका आदमी’, अशा गलिच्छ शिव्यांची लाखोली ! गेल्या वर्षी पंजाबमध्ये मोदींच्या दौर्‍याच्या वेळी घातपाताचा प्रयत्न झाला; पण विरोधी पक्षातील एकाही जन्महिंदु नेत्याने याचा पंजाब सरकारला जाब विचारला नाही, ना कुणा जन्महिंदु नेत्याने या नीच कारस्थानाचा निषेध केला. सोनिया गांधींच्या काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तर स्पष्टपणे म्हणाले, ‘‘मी मोदींना शिव्याही देऊ शकतो, मनात आणले तर मारूही शकतो.’’ अशा कृतघ्नांना कोणत्या तोंडाने हिंदु म्हणावे ?

९. मुसलमानांचा मोदीद्वेष अन् राहुल गांधींची हिंसक भाषा !

नरेंद्र मोदींनी कधीही या देशातील मुसलमानांना संपवण्याची अथवा हाकलून देण्याची भाषा केली नाही. आतापर्यंत मोदी यांच्या सरकारने जनतेसाठी विकासाच्या जेवढ्या योजना राबवल्या, सोयीसवलती दिल्या, त्याचा लाभ हिंदूंच्या इतकाच मुसलमानांनाही झाला. सोयीसवलती देतांना हिंदु-मुसलमान असा भेदभाव कधीच केला नाही. बहुतांश मुसलमान समाज मोदींचा द्वेष करतो, त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना मते देत नाही; कारण मुसलमान मतदार त्यांचे धर्मांध नेते आणि मुल्ला-मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) यांचे अधिक ऐकतो. याउलट हिंदु समाजाची स्थिती आहे. राहुल गांधी स्वतःला ‘हिंदु’ म्हणवून घेत हिंदुत्वनिष्ठांना संपवण्याची, हिंदूंना भ्रमित करणारी भाषा उघडपणे बोलतात, तरीही त्यांच्या सभेला उपस्थित असणारे सहस्रो हिंदू टाळ्या वाजवतात. काय म्हणावे अशा हिंदूंना ? अज्ञानी हिंदू, विकले गेलेले हिंदू कि अपघाताने जन्मलेले हिंदू ?’

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

संपादकीय भूमिका

हिंदु धर्म आणि हिंदू यांना कलंकित करण्यासाठी खोटी कथानके रचणाऱ्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !