हिंदु देवतांचे विडंबन केल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी !

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या ‘युवारंग महोत्सवा’तील प्रकरण

जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचा ‘युवारंग महोत्सव’ नुकताच जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालयात पार पडला. या महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी जामनेर येथील धारिवाल महाविद्यालयाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘मच्छर भाई’ या नाटकात हिंदूंचे दैवत असलेल्या नारदमुनी यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. तेथे उपस्थित असणार्‍या अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्या नाटकाला विरोध केला होता. ‘हिंदु देवतांचे विडंबन करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या पाळधी विभागाकडून करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीकडून कुलगुरूंना देण्यात आले. हे निवेदन कुलगुरूंच्या वतीने विशेष कार्य अधिकारी श्री. धनंजय गुजराथी यांनी स्वीकारले. निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. रमेश बैस आणि राज्याचे शिक्षणमंत्री श्री. दीपक केसरकर यांनाही पाठवण्यात आले. निवेदन देतांना समितीच्या वतीने सर्वश्री जितेंद्र चौधरी, प्रदीप कुंवर आणि अन्य धर्मप्रेमी बांधव उपस्थित होते.

निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्या !

१. सर्व प्रकरणाची कसून चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.

२. ज्यांनी हे नाटकातील संवाद लिहिले, त्यांनी हिंदूंच्या भावनांचा विचार केलेला नाही. त्यामुळे ते संवाद लिहिणार्‍यांवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या; म्हणून कारवाई करण्यात यावी.

३. युवारंग महोत्सवात कार्यक्रमांची निवड करणारी समिती गठीत केली जाते. त्यांनीही याकडे डोळेझाक केली असेल, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी.

४. देवता, श्रद्धास्थाने, राष्ट्रपुरुष यांचे विडंबन अथवा अवमान होणार नाही, अशी नियमावली राज्यातील सर्वच विद्यापीठे आणि त्या अंतर्गत येणारी महाविद्यालये यांना देण्यात यावी.

संपादकीय भूमिका

धर्मरक्षणासाठी सतर्क आणि तत्पर असणार्‍या हिंदु जनजागृती समितीचे अभिनंदन ! संबंधितांवर कठोर कारवाई होईपर्यंत पोलीस प्रशासनाचा पाठपुरावा घ्यावा !