तुष्‍टीकरणाच्‍या राजकारणामुळे मागील ७५ वर्षे तेलंगाणा मुक्‍ती दिन साजरा केला नाही ! – अमित शहा, गृहमंत्री

भाग्‍यनगर – केंद्रीय गृहमंंत्री अमित शहा हे सिकंदराबाद येथे तेलंगाणा मुक्‍ती दिनाच्‍या निमित्ताने आयोजित केलेल्‍या कार्यक्रमामध्‍ये सहभागी झाले. या वेळी ते म्‍हणाले, ‘‘स्‍वातंत्र्याच्‍या ७५ वर्षांमध्‍ये केंद्रात सत्तेत असलेल्‍या एकाही सरकारने देशातील तरुणांना या महान दिवसाची माहिती दिली नाही. या दिवसाची माहिती लोकांना कळावी, यासाठी कोणत्‍याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला गेला नाही. तुष्‍टीकरणाच्‍या राजकारणामुळे सत्ताधार्‍यांच्‍या मनात भीती होती. त्‍यामुळे त्‍यांनी हा दिवस साजरा केला नाही. देशाला स्‍वातंत्र्य मिळाल्‍यानंतर निजामाने ३९९ दिवस राज्‍य केले. या काळात तेथील लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्‍याचार झाले. सरदार पटेल यांनी ४०० व्‍या दिवशी या राज्‍याला स्‍वातंत्र्य मिळवून दिले.’’ १७ सप्‍टेंबर या दिवशी तेलंगाणा निजामच्‍या कह्यातून मुक्‍त झाला. तो दिवस तेलंगाणा मुक्‍ती दिन म्‍हणून साजरा केला जातो.