‘योगा’ चळवळ म्हणून राबवणे आवश्यक ! – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी – समाजातील प्रत्येकाला योगाची आवश्यकता आहे. योगा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी, ‘योगा’ चळवळ म्हणून राबवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री  उदय सामंत यांनी केले. कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत रत्नागिरी उपकेंद्रामध्ये ‘योगा फॉर होलीस्टीक हेल्थ’ या विषयावर आयोजित अध्यापक विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रा. हरेराम त्रिपाठी, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या केंद्र समन्वयक सुजाता वरदराजन, रत्नागिरी उपकेंद्राचे डॉ. दिनकर मराठे आदींसह अध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, ‘‘आजच्या धावपळ आणि तणावाच्या जीवनशैलीमध्ये योगाची सर्वांनी आवश्यकता आहे. योगा संदर्भात कार्यशाळेपुरते मर्यादित न रहाता याची मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे. भावी पिढीचे शरीर स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी, ते आजारमुक्त असणे यासाठी योगाशिवाय पर्याय नाही.

उपकेंद्राला आवश्यक ५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल. अखिल भारतीय नाट्य परिषदने या विद्यापिठाबरोबर सामंजस्य करार करून कला अकादमी चालू करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.’’