(म्हणे) ‘केंद्र सरकारची मंत्रालये रा.स्व.संघाकडून चालवली जातात !’ – राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे हास्यास्पद विधान

काँग्रेसचे नेते राहुल गांधी

लेह (लडाख) – आज प्रत्येक संस्थेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक ठेवले जात आहेत. त्यांचेच लोक सर्व काही चालवत आहेत. तुम्ही केंद्र सरकारच्या कोणत्याही मंत्र्याला विचारले, तरी ते तुम्हाला सांगतील की, ‘आम्ही आमची मंत्रालये चालवत नाही, तर संघाद्वारे नियुक्त अधिकार्‍यांकडून ती चालवली जातात. तेच सर्व काही करत आहेत’, असे हास्यास्पद आरोप काँग्रेसी नेते राहुल गांधी यांनी केले. केंद्रशासित प्रदेश लडाखच्या दौर्‍यावर असतांना ते बोलत होते.

राहुल गांधी हे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त लेह येथील पँगोंग तलावावर त्यांना आदरांजली वहाणार आहेत. २० ऑगस्ट १९४४ या दिवशी राजीव गांधी यांचा जन्म झाला होता.

गांधी यांनी नेहमीचा राग आळवत म्हटले की, काही राजकीय लोक देशात द्वेषाचे वातावरण निर्माण करत आहेत. देशातील प्रमुख प्रश्‍न, बेरोजगारी, महागाई, शिक्षण यांवर फारसे बोलले जात नाही. देशात द्वेषाचीच चर्चा होते. देशाच्या मुख्य प्रश्‍नांवर चर्चा होत नाही.

संपादकीय भूमिका

जर असे असते, तर आतापर्यंत रा.स्व. संघ पुरस्कार करते, त्या हिंदु राष्ट्राची स्थापना झाली असती, देशव्यापी गोहत्याबंदी, धर्मांतरबंदी कायदे झाले असते. तसेच बांगलादेशी घुसखोरांना बांगलादेशात धाडण्यात आले असते आणि जिहादी आतंकवादाचे समूळ उच्चाटन होऊन काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सुरक्षित पुनर्वसन झाले असते !