दुर्लक्षिलेले ‘अजमेर सेक्स स्कँडल’ !

द केरल स्टोरी’ चित्रपटामुळे धर्मांध कशा प्रकारे हिंदु मुलींना खोट्या प्रेमजालात अडकवतात, त्यांचा उपभोग घेतात, धर्मांतर करतात आणि त्यांना ‘इस्लामिक स्टेट’साठी आतंकवादी म्हणून लढण्यासाठी पाठवतात, याचे वास्तव जगासमोर उघड झाले. काहींनी ‘यातून इस्लामची अपकीर्ती करण्याची मोहीम उघडली आहे’, असे सांगितले, काहींनी ‘असे काही नाहीच आहे, हे खोटे आहे’, असेही सांगितले. यानंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये धर्मांधांच्या कारवायांना बळी पडलेल्या २६ मुलींनाच सर्वांसमोर उपस्थित केले. या वेळी तरुणींनी त्यांच्यावरील आपबिती रडत सांगितली. या चित्रपटामुळे या विषयाकडे जगाचे लक्ष गेले. हिंदु तरुणींना धर्मांधांनी फसवणे, त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांचे अपहरण करणे असले प्रकार इस्लामच्या भारतातील आगमनापासूनच चालू आहेत. असे जरी असले, तरी इस्लामशी संबंधित एका प्रसिद्ध धार्मिक स्थळाच्या सेवेकर्‍यांनीच शेकडो हिंदु तरुणींची पद्धतशीरपणे साखळी पद्धतीने अब्रू लुटली, त्यांना जीवन जगणे नकोसे केले, याचे एक मोठे प्रकरण स्वतंत्र भारतात घडले. या प्रकरणाची पुष्कळ अल्प जणांना माहिती आहे. ते म्हणजे ९० च्या दशकातील  ‘अजमेर सेक्स स्कँडल’ (अजमेर बलात्कारकांड) ! महत्त्वाचे म्हणजे यातील अनेक आरोपी अद्यापही पसारच आहेत.

बलात्कारांची साखळी

वर्ष १९९२ मध्ये हे प्रकरण झाले. यामध्ये प्रारंभी एका उद्योगपतीच्या मुलाला लक्ष्य करून त्याची आणि त्याच्या प्रेयसीची अश्लील छायाचित्रे काढण्यात आली. ही छायाचित्रे सार्वजनिक करण्याची धमकी देऊन प्रेयसीवर बलात्कार करून तिच्या मैत्रिणीला घेऊन येण्यास सांगण्यात आले. त्यानंतर तिच्या मैत्रिणीवर बलात्कार करून आणि तिची अश्लील छायाचित्रे काढून पुन्हा तिच्याशी संबंधित मुलींना बोलावण्यात आले आणि अशी मालिका चालूच राहिली. यांत १०० हून अधिक हिंदु मुली बळी पडल्या. यामध्ये शाळकरी आणि महाविद्यालयीन मुली होत्या. मुख्य म्हणजे त्या सर्व अजमेरमधील प्रतिष्ठित हिंदु कुटुंबे, उच्चपदस्थ सरकारी अधिकारी यांच्या मुली होत्या. ‘स्वत:चे नाव अपकीर्त होईल’ म्हणून या कुटुंबांनी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला.

या मुलींवर अत्याचार करणार्‍यांमध्ये अजमेर दर्ग्याचे खादिम (सेवक) असलेले आणि तेथील सर्व व्यवस्था पहाणारे चिश्ती कुटुंबांतील अनेक जण सहभागी होते, तसेच काँग्रेसचे पदाधिकारीही यात सहभागी होते. फारूक चिश्तीने मुलींवर बलात्कार करण्यास प्रारंभ केला. चिश्ती या मुलींची नग्न छायाचित्रे ज्या फोटो स्टुडिओमध्ये ‘पॉझिटिव्ह’ करण्यासाठी घेऊन जायचा, त्याच्या मालकाच्या हाती ती छायाचित्रे लागल्याने त्याने आणि त्याच्या माध्यमातून अनेकांनी या मुलींना त्यांची अश्लील छायाचित्रे सार्वजनिक करण्याची धमकी देत त्यांची अब्रू लुटली. मुलींवर बलात्कार करणार्‍यांची एक टोळीच सिद्ध झाली होती. स्थानिक दैनिक ‘नवज्योती’चे संपादक दिनबंधू चौधरी यांना या सर्व प्रकरणाचा सुगावा लागला आणि त्यांनी दैनिकातून भांडाफोड केल्यावर राजस्थान काही प्रमाणात हादरले. अनेक मास हे अत्याचार असह्य झालेल्या या मुलींपैकी अनेकींनी ‘आणखी अपकीर्ती होईल’, या भीतीने एका मागोमाग एक रस्त्यावर येऊन आत्महत्या केल्या. तेव्हा काही दिवस अजमेर येथील वातावरण तणावग्रस्त झाले. लोकांनी मोर्चे काढले, रस्ताबंद केला. १८ जणांना अटक झाली. न्यायालयात अपकीर्तीच्या भीतीने आणि भावी आयुष्यावर परिणाम होईल म्हणून अनेक मुली साक्ष देण्यास पुढे आल्या नाहीत. काहींनी साक्ष पालटली. त्यामुळे काही आरोपी सुटले, काहींना जामीन मिळाल्यावर ते पसार झाले, तर काही जण शिक्षा भोगत आहेत.

देशभर शांतता

त्या काळी हिंदु मुलींची एवढ्या मोठ्या प्रमाणात विटंबना झाल्यावर देशभर फारसा गदारोळ झाला नाही. मुख्य म्हणजे हे प्रकार होत असतांना अनेकांना कुणकुण होती; मात्र बलात्कार करणारे चिश्ती कुटुंबातील आणि काँग्रेसचे पदाधिकारी असल्यामुळे कुणाचे पुढे येण्याचे धैर्य झाले नाही. गुन्हेगार प्रतिष्ठित असल्याने पोलीस, साक्षीदार, न्यायालये येथपर्यंत त्यांचा प्रभाव राहिला. याचा लाभ गुन्हेगारांना झाला. भारतात अजमेरच्या सेवकांकडून प्रतिष्ठित घराण्यातील हिंदु मुलींच्या अब्रूचा खेळ झालेला असतांना सर्व दोषींना शिक्षा होण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न का झाले नाहीत ? या प्रकरणातील प्रत्येक दोषीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत शोधमोहीम चालू ठेवणे, हे पोलिसांचे आणि अन्य अन्वेषण यंत्रणांचे दायित्व होते. राज्यात काँग्रेस सत्तेवर होती; म्हणून हे प्रकरण दाबण्यात आले असेल, तर संबंधित प्रभाव टाकणार्‍यांचीही चौकशी होऊन त्यांना शिक्षा व्हायला हवी. ‘या मुलींनी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात हे जे काही भोगले आहे, ते किती भयंकर असेल ?’, याची कल्पनाही करता येत नाही.

याच मुलींच्या जागी अल्पसंख्यांक समाजातील मुली, महिला असत्या, तर दोषींच्या संदर्भात बोटचेपे धोरण अवलंबले असते का ? देशभर आगडोंब उसळला असता आणि हे प्रकरण सर्वसामान्यांच्या लक्षात राहिले असते. स्त्रियांवरील अत्याचारांविषयी प्रत्येक चर्चासत्राच्या वेळी या प्रकरणाचा उल्लेख झाला असता; मात्र हिंदु मुलींवरील विषय असल्याने ते इतिहासाच्या पानांमध्ये हरवून टाकण्याचा प्रयत्न झाला. हिंदु मुलींवर संघटनात्मक पद्धतीने धर्मांधांकडून अनेक दिवस सामूहिक बलात्कार होण्याचे हे भारतातील मोठे प्रकरण आहे. हे प्रकरण चर्चेत राहिले असते, तर हिंदु तरुणी धर्मांधांविषयी सतर्क झाल्या असत्या आणि लव्ह जिहादला बळी पडण्यापासून वाचल्या असत्या. या प्रकरणातील सर्वच दोषींना पुन्हा कह्यात घेऊन त्यांना कठोर शिक्षा दिल्यासच आत्महत्या केलेल्या आणि सध्या जिवंत असलेल्या पीडित महिलांना न्याय मिळेल आणि समाजात चांगला संदेशही जाईल.

हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे अजमेर दर्ग्याचे तत्कालीन खादिम आणि काँग्रेसी यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !