संत मुक्ताबाईंचा ‘स्वरूपाकार’ दिन

संत मुक्ताबाई

१. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांसह अन्य भावंडांनी समाधी घेणे, तर संत मुक्ताबाई ‘स्वरूपाकार’ होणे

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानदेव आणि संत निवृत्तीनाथ या तीनही भावांनी समाधी घेतली. या तिघांच्या समाधीचे वैशिष्ट्य असे की, या सर्वांच्या समाधीचे मास भिन्न असले, तरी या तिन्ही भावांची समाधी तिथी ‘कृष्ण त्रयोदशी’ आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीला ‘संजीवन समाधी’ घेतली तो दिवस होता कार्तिक कृष्ण त्रयोदशी, शके १२१८ म्हणजे २५ नोव्हेंबर १२९६. त्यानंतर संत सोपानदेव यांनी सासवड येथे मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी, शके १२१८, म्हणजे २३ डिसेंबर १२९६ या दिवशी समाधी घेतली.

संत निवृत्तीनाथ यांनी त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी एक पुष्करिणी (तळे) आहे. त्याच्या पश्चिम दिशेला अत्यंत प्राचीन असे एक गुप्त गुहा आहे. ती गुहाच संत निवृत्तीनाथांच्या समाधीचे स्थान आहे. त्यांनी ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी, शके १२१९, म्हणजे १७ जून १२९७ या दिवशी समाधी घेतली. संत मुक्ताबाई वैशाख कृष्ण दशमी, शके १२१९, म्हणजे १९ मे १२९७ या दिवशी स्वरूपाकार झाल्या. संत मुक्ताबाईंसाठी संत निवृत्तीनाथ यांनी समाधी घेतली नव्हती. संत मुक्ताबाई स्वरूपाकार झाल्यानंतर अनुमाने एका मासातच त्यांनी समाधी घेऊन आपल्या अवतार कार्याला पूर्णविराम दिला.

२. स्वरूपाकार होण्याच्या आधी संत मुक्ताबाईंचे संत निवृत्तीनाथांशी झालेले बोलणे

संत मुक्ताबाई स्वरूपाकार होण्याच्या आधी संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ आणि अन्य संत हे एक मास आधी तापी नदीच्या तीरावर गेले. तेथील वास्तव्यात एके दिवशी संत मुक्ताबाई संत निवृत्तीनाथांना म्हणाल्या, ‘‘मला हे सर्व चराचर भगवंत रूप असल्याचे दिसते आहे. सारेच ज्ञानरूप आहे. मी जन्मापासून सर्वत्र वावरत असतांना सुद्धा मला कुठेही अज्ञानाचे आवरण दिसले नाही. मी माझे स्वरूप सोडून कधीही या भूतलावर वावरले नाही. ब्रह्मरूपातच या भूतलावर माझा वावर झाला. आपल्या आयुष्यात आपण ज्ञानाचा नंदादीप उजळवला आहे.’’

३. संत निवृत्तीनाथांनी संत मुक्ताबाईंच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना चिरंजीव करणे

संत मुक्ताबाईंच्या या बोलण्याचा अर्थ ‘त्या आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत’, असाच होता. संत मुक्ताबाईंनी समाधी घ्यायची कि अर्धोदक करायचे ? कि कुंभक करून प्राणोत्क्रमण करायचे ? कि योगाग्नीने देह दग्ध करायचा ? कि शंकराचार्यांप्रमाणे गुहाप्रवेश करायचा ? कि गार्गीप्रमाणे ब्रह्मकुमारी राहून परमार्थात आयुष्य व्यतित करायचे ? यावर सर्व संतांची चर्चा झाली. अशी चर्चा होण्यामागचे कारण असे की, याआधी कुण्या स्त्रीने समाधी घेतल्याचे उदाहरण आढळत नाही. अशी सर्व चर्चा चालली असतांना संत निवृत्तीनाथांनी संत मुक्ताबाईंच्या डोक्यावर स्वतःचा हात ठेवून त्यांना चिरंजीव केले.

४. भगवंताने संत मुक्ताबाईंची वर्णिलेली स्थिती !

हे सर्व पाहून काही आकलन न झाल्यामुळे उद्धवाने भगवंताच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि या सर्वांचे रहस्य उलगडून सांगण्याची विनंती केली, ‘‘भगवंता, तू तर सर्वांना समाधीचा मार्ग दाखवलास; मात्र संत मुक्ताबाईंची स्थिती जरा भिन्न आहे. या मागचे कारण केवळ तुलाच ठाऊक आहे, म्हणून सरळ सरळ तुलाच विचारतो की, संत मुक्ताबाईंची नेमकी स्थिती काय आहे ?’’

संत निवृत्तीनाथांनी स्वतःचा अभय कर संत मुक्ताबाईंच्या शिरावर ठेवला. त्यांना ‘चिरंजीवित्व’ बहाल केले. आता महाकल्पापर्यंत त्यांचे अस्तित्व टिकून रहाणार आहे. संत मुक्ताबाईंनी जरी देह धारण केलेला असला, तरीही त्या वृत्तीने निर्गुण, निराकार आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही गुहेत जाऊन समाधी घेण्याची आवश्यकता नाही. तशाच त्या आकाश मार्गाने कुठेही निघून जाणार नाही. समाधी न घेता सुद्धा त्या निर्गुण निराकारात या भूतलावर वावरू शकतात; कारण त्या जन्मापासून कधीही कोणत्याही बंधनात अडकून राहिल्या नव्हत्या. देह धारण केला असला, तरी त्यांना देहाचे बंधन नव्हते, म्हणजेच त्या ‘स्वरूपाकार’ होत्या, हे संत निवृत्तीनाथांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून ‘महाकल्पापर्यंत त्यांना चिरंजीवित्व’ बहाल केले. अशा प्रकारे संत मुक्ताबाई स्थूल देहाने गुप्त राहून चिरंजीवित्वाचे वरदान अनुभवत आहेत.

५. ‘संत मुक्ताबाई स्वरूपाकार होणार’, याची कल्पना कुणालाही नसणे

वैशाख कृष्ण दशमी, शके १२१९ या दिवशी त्या स्थूल देहाने गुप्त झाल्या. गुप्त होण्याआधी त्यांनी स्नान केले होते. संत मुक्ताबाई म्हणजे आदिमाया, आदिशक्ती होय. मुक्त होण्यापूर्वी संत मुक्ताबाईंनी योग मायेने आभाळ सिद्ध केले. याची पूर्वकल्पना संत मुक्ताबाईंनी संत निवृत्तीनाथांना दिली होती. इतर कुणालाही संत मुक्ताबाई स्वरूपाकार होणार, याची कल्पना नव्हती.

म्हणून संत नामदेव महाराज म्हणाले, ‘‘हे असे काय झाले ? संत मुक्ताबाईंनी आम्हाला काहीही सांगितले नाही. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव यांचा समाधी सोहळा आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला. चांगदेवांचाही समाधी सोहळा आम्ही डोळ्यांनी पाहिला; पण मुक्ताबाईंचे हे निजाधामाला जाणे पहाण्याचे भाग्य आम्हाला लाभले नाही.’’

६. संत एकनाथ महाराज यांनी संत मुक्ताबाई यांच्या चिरंजीवित्वाचे वर्णिलेले वैशिष्ट्य !

संत एकनाथ महाराज म्हणतात, नाथांचे आश्रमी समाधीरहित। मुक्तता मुक्त नाम तुम्हा ।।१।।

महाकल्पावरी चिरंजीव शरीर । कीर्ती चराचर त्रिभुवनी ।।२।।

आनंदे समाधी सदा ती उघडी । नामस्मरण घडोघडी मुखोद्गत ।।३।।

एका जनार्दनी नाम तुमचे गोड । त्रिलोकी उघड नाम कीर्ती ।।४।।

भावाथ : संत निवृत्तीनाथांच्या आश्रमात संत मुक्ताबाईंनी ‘समाधीरहित मुक्ती’ संपादन केली. त्यांना महाकल्पापयंत चिरंजीवित्व प्राप्त झाले. त्यामुळे त्यांची कीती चराचर त्रिभुवनात पसरली. इतरांनी समाधी घेतांना गुहेत प्रवेश केला आहे, म्हणजेच मोकळ्या जागेवर कुणीही समाधी घेतली नाही; पण संत मुक्ताबाईंचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी मोकळ्या वातावरणात समाधी घेतली. प्रत्येक क्षणाला त्यांच्या मुखात केवळ भगवंताचे नाम होते. समाधी न घेताच देहरहित अवस्थेत मुक्ताबाई सवत्र वावरत आहेत, हेच संत मुक्ताबाईंच्या चिरंजीवित्वाचे वैशिष्ट्य आहे. त्या आजही दशन देतात.

७. संत नामदेव महाराज यांनी संत मुक्ताबाई यांच्या स्वरूपाकाराचे केलेले वणन !

संत नामदेव महाराज म्हणतात,
ऋषी म्हणती हरि पातलेसे विघ्न ।
आता कैसे प्राण वाचतील ।।१।।

कोणाचिया शुद्धी नाहीचिया कोणा ।
म्हणती नारायण मृत्यू आला ।।२।।

कडाडली वीज निरंजनी जेव्हा ।
मुक्ताई जेव्हा गुप्त झाली ।।३।।

वैकुंठी लक्ष घंटा वाजती एकघाई ।
झाली मुक्ताबाई स्वरूपाकार ।।४।।

एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी ।
जेव्हा निरंजनी गुप्त झाली ।।५।।

गेले निवारूनी आभाळ आभूट ।
नामा म्हणे कोठे मुक्ताबाई ।।६।।

भावाथ : संत मुक्ताबाई जेव्हा स्वरूपाकार होण्यास सिद्ध झाल्या, तेव्हा प्रचंड वेगाने वारा वाहू लागला. सगळीकडे धूळ उडाली. त्यामुळे कुणालाच डोळे उघडता आले नाहीत. हे वादळ एवढे भयंकर होते की, सवांना मोठे संकट आल्यासारखे वाटले आणि त्यातून आता कुणीही वाचणार नाही, असेच वाटू लागले. कुणाचीच कुणाला शुद्ध राहिली नाही. सर्वांनाच मृत्यूसमीप आल्यासारखे वाटले. तेवढ्यात कडकडाट होऊन वीज चमकल्यासारखे झाले आणि त्याच क्षणी संत मुक्ताबाई अदृश्य झाल्या, हे कुणालाच कळले नाही. त्या अदृश्य झाल्यावर अनुमाने एक प्रहर लख्ख प्रकाश पडला आणि वैकुंठात १ लाख घंटा वाजू लागल्या.

८. संत मुक्ताबाई यांचा ‘पुण्यतिथी दिन’ नसून तो ‘स्वरूपाकार दिन’ !

अशा प्रकारे संत मुक्ताबाई स्वरूपाकार झाल्यामुळे आपण त्यांच्या या ‘स्वरूपाकार’ होण्याला ‘पुण्यतिथी’ म्हणून संबोधणे योग्य वाटत नाही. वैशाख कृष्ण दशमी हा दिवस संत मुक्ताबाई यांचा ‘पुण्यतिथी दिन’ नसून तो ‘स्वरूपाकार दिन’ आहे, असे म्हणणे अधिक उचित होईल. संत नामदेव महाराजांच्या अभंगातही ‘स्वरूपाकार’ असाच शब्दप्रयोग त्यांनी योजला आहे.’

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१५.५.२०२३)