मंदिरात चोरी करणार्‍या चोराने ९ वर्षांनंतर मुद्देमाल केला परत !

चोरी केल्यानंतर चोराला आल्या अनेक अडचणी !

भुवनेश्‍वर (ओडिशा) – येथील गोपीनाथपूर गावातील गोपीनाथ मंदिरात वर्ष २०१४ मध्ये चोरी झाली होती. देवाची चांदीची बासरी, छत्री, मुकुट, चांदीचे डोळे, ताट, घंटा चोरट्याने चोरून नेल्या होत्या. त्या वेळी ग्रामस्थांनी लिंगराज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी अन्वेषण चालू केले; मात्र गेल्या ९ वर्षांत याचा शोध लागला नाही. आता ९ वर्षांनंतर या चोरट्यानेच मंदिरातून चोरलेल्या सर्व वस्तू परत केल्या आहेत. स्वत:लाच त्याने शिक्षाही केली. त्याने १०१ रुपयांचा दंडही भरला, तर २०१ रुपयांची दक्षिणाही दिली आहे. त्याने एक चिठ्ठीही लिहिली आहे. त्यात त्याने देवाचे दागिने चोरल्यानंतर त्याला आलेल्या अडचणींची माहिती लिहिली आहे. यामुळेच देवाचे दागिने परत करण्याता निर्णय घेतल्याचे त्याने लिहिले आहे. या चोरट्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

संपादकीय भूमिका

याविषयी अंनिसवाले आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांना काय म्हणायचे आहे ?