प्रकल्पावरून माघार न घेतल्यास सरकार कोसळेल ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा बारसू दौरा !

उद्धव ठाकरे यांचा बारसू दौरा

रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ६ मे या दिवशी बारसू येथे आले होते. त्यांनी प्रारंभी प्रकल्पाला विरोध करणार्‍या ग्रामस्थांशी संवाद साधून नंतर पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजप यांच्यावर टीका करत ‘या प्रकल्पावरून माघार घेतली नाही, तरी लवकरच हे सरकार कोसळेल, असे वक्तव्य केले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की,

१.  या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार असेल, तर हा प्रकल्प इथे नको आहे. जनता याला विरोध करत असेल, तर माझाही त्याला विरोध असेल.

२. आता जे गद्दार सुपारी घेऊन फिरत आहेत, त्यांनी मी मुख्यमंत्री असतांना मला सांगितले होते की, बारसू येथे हा प्रकल्प झाला, तर त्याला विरोध होणार नाही.

३. येथील बरीचशी भूमी निर्मनुष्य आहे. तसेच पर्यावरणाचीही फारशी हानी होणार नाही. त्यानंतर मी या जागेविषयी केंद्रात म्हणजे नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले; मात्र या प्रकल्पाविषयी माझा असा विचार होता की, मुख्यमंत्री असतांनाच बारसूत येऊन या प्रकल्पासंदर्भात येथील स्थानिक जनतेला योग्य ते सादरीकरण करायचे.

४. आता दुर्दैवाने फक्त मी लिहिलेल्या पत्राचे भांडवल केले जात आहे; मात्र जी पारदर्शकता हवी, ती ठेवली जात नाही.

५. माझ्या काळातील वेदांता प्रकल्प महाराष्ट्राल द्या आणि हा विनाशकारी प्रकल्प गुजरातला न्या. चांगले प्रकल्प राज्याबाहेर गेले आणि वाईट प्रकल्प राज्यात आले.

६. हा प्रकल्प बारसूत आणण्यासाठी मोठ काळेबेरे केले जात आहे. महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी मिळणार आहे.

७. येथील कातळशिल्प या प्रकल्पात जाऊ देणार नाही. त्यांच्या संवर्धनासाठी मी युनेस्कोला पत्र लिहिले होते.