मनसेच्या चेतावणीनंतर भुसावळ नगरपालिकेने तापी नदीतील अनधिकृत मजार हटवली !

मनसेचे भुसावळ शहराध्यक्ष राहुल सोनटक्के यांचा पुढकार

(मजार म्हणजे मुसलमान फकिराचे थडगे)

तापी नदी पात्राच्या मध्यभागी धर्मांधांनी अशी मजार उभी केली होती

भुसावळ (जिल्हा जळगाव), ८ एप्रिल (वार्ता.) – येथील तापी नदीपात्रामध्ये असलेल्या महादेव मंदिराच्या उत्तरेकडील बाजूस धर्मांधांनी अनधिकृतपणे मजार बांधली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष श्री. राहुल सोनटक्के यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ‘येत्या ८ दिवसांत ही अनधिकृत मजार न हटवल्यास मनसेच्या भुसावळ शहर शाखेच्या वतीने ती हटवून त्या जागी मंदिर उभे केले जाईल’, अशी चेतावणी प्रशासनाला ५ एप्रिल या दिवशी एका निवेदनाद्वारे दिली. हे निवेदन जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि भुसावळ शहराचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. या अनधिकृत बांधकामाविषयी प्रांत कार्यालय, महसूल विभाग, नगरपालिका आणि पोलीस विभाग अनभिज्ञ असल्याचा आरोप श्री. सोनटक्के यांनी निवेदनात केला होता.

मनसेचे भुसावळ शहराध्यक्ष राहुल सोनटक्के

या निवेदनाची तात्काळ नोंद घेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार आणि पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांनी अनधिकृत मजारीच्या बांधकामाची पहाणी केली. अवैध मजार उभारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने ही मजार हटवण्याचे निर्देश ६ एप्रिल या दिवशी दिले. त्यानंतर ७ एप्रिल या दिवशी पहाटे पोलीस येण्यापूर्वी हे बांधकाम हटवण्यात आले.

(सौजन्य : IBN NEWS महाराष्ट्र LIVE)

श्री. राहुल सोनटक्के यांच्या कृतीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


यापुढे प्रशासनाने अशा प्रकारचे अवैध बांधकाम हटवावे, अन्यथा आम्ही ते हटवून तेथे हनुमानाचे मंदिर बांधू ! – श्री. राहुल सोनटक्के

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना श्री. राहुल सोनटक्के म्हणाले, ‘‘यापुढे तापी नदीच्या परिसरात अशा प्रकारचे अवैध बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून ते बांधकाम हटवावे, अन्यथा मनसेच्या वतीने असे अवैध बांधकाम हटवून तेथे हनुमानाचे मंदिर बांधले जाईल.’’

संपादकीय भूमिका

  • सरकारने सर्वत्रच्या अवैध मजारींचे बांधकाम करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
  • अनधिकृत मजार निर्माण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशांवर आणि ही अनधिकृत मजार निर्माण करणार्‍यांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !