जलसंपदा विभागाकडून शेतकर्‍यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार ! – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री

विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलतांना जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

कोल्हापूर – ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या अनुषंगाने शेतकर्‍यांचा संबंध येतो, अशा जलसंपदा विभागाकडून शेतकर्‍यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया येत्या महिन्याभरात ‘ऑनलाईन’ करणार असल्याचे विधान राज्याचे जलसंपदामंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात ‘महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे’ अंतर्गत मुख्य अभियंता कृष्णा खोरे जलसंपदा विभाग कोल्हापूर येथील विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपिठावर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूर महापालिकेच्या महापौर सौ. रूपाराणी निकम, भाजप राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांसह अन्य उपस्थित होते.

जलसंपदामंत्री पुढे म्हणाले, ‘‘कृष्णा आणि गोदावरी खोरे महामंडळाची अनुमाने ५६ सहस्र एकर भूमी जलसंपदा विभागाने स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. यासाठी कार्यरत असणार्‍या सर्व अधिकार्‍यांचे अभिनंदन करून भविष्यात राज्यामधील दुष्काळी भागातील पाणी विषमता दूर करण्याला जलसंपदा विभाग प्राधान्य देणार आहे. कोल्हापूर जिल्हा खर्‍या अर्थाने सहकाराची भूमी आहे.’’ आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर म्हणाले, ‘‘या विभागाने काळम्मावाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला मान्यता देऊन या धरणाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या अनुषंगाने  येथील कामकाजाला त्वरित प्रारंभ करण्यात यावा.’’

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘‘कोल्हापुरात जरी मुबलक पाणीसाठा असला, तरी जिल्ह्यात अनेक सूक्ष्म प्रकल्पांची आवश्यकता आहे. त्याची उभारणी करण्यात यावी. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची कोणत्याही परिस्थितीत वाढता कामा नये, यांसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहेत.’’