‘डी.एड्.’ कायमचे बंद होऊन ‘बी.एड्.’ करणे बंधनकारक !

शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय !

मुंबई – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी ‘बी.एड्.’ करणे बंधनकारक असणार आहे. ‘डी.एड्.’ कायमचे बंद होणार आहे. त्यामुळे इयत्ता बारावीनंतर ४ वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात ‘शिक्षणशास्त्र’ विषय घेऊन विद्यार्थ्यांना ‘बी.एड्.’ करावे लागेल. ‘बी.एड्.’मध्ये आता विशेषीकरण (स्पेशलायझेशन) असणार आहे. केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय धोरण राबवण्यास राज्याकडून मान्यता मिळाली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व अकृषिक विद्यापिठांमध्ये जून २०२३-२४ पासून या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कार्यवाही होणार आहे.

विद्यार्थ्यांना ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शेवटच्या ‘सेमिस्टर’ला ज्या क्षेत्रात आवड आहे, त्यासंबंधी ६ मास ‘ॲप्रेटायशेन’, ‘इंटर्नशिप’ करावी लागेल. त्यानंतर विद्यार्थी नोकरी करण्यासाठी पूर्णपणे सिद्ध होतील. बारावीनंतर नव्याने पदवीला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांनाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा निकष लागू असेल. सध्या शिकत असलेल्यांना हा निकष लागू होणार नाही.