‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता पोलीस आणि आंतरधर्मीय विवाह समिती यांच्याकडे तक्रारी कराव्यात ! – भाजपचे आमदार नितेश राणे यांचे आवाहन

मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – राज्यातील ‘लव्ह जिहाद’च्या घटनांना पायबंद घालण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार कटीबद्ध असून राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणला जाईल, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी २१ मार्च या दिवशी येथील भाजप प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. ‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता पोलिसांकडे, तसेच आंतरधर्मीय विवाह समितीकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी आमदार सौ. माधुरीताई मिसाळ, आमदार राम सातपुते, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदि उपस्थित होते.

नितेश राणे म्हणाले की, समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वातच नाही, धर्मांतर होतच नाही, असा दावा केला आहे; मात्र ‘अशा अनेक घटनांचे पुरावे आमच्याकडे आहेत’, असे सांगत आमदार राणे यांनी पुराव्यानिशी आणि ध्वनीचित्रफीती चकती दाखवून राज्यातील ‘लव्ह जिहाद’विषयीचे कटु वास्तव सर्वांसमोर मांडले.

आमदार नितेश राणे म्हणाले की, ‘लव्ह जिहाद’ नसतोच, असे म्हणणार्‍यांची बोलती दौंड येथील कमाल कुरेशी आणि पीडित हिंदु तरुणाची, तसेच खुद्द कुरेशी याच्या पत्नीची ध्वनीचित्र चकती पाहिल्यावर बंद होईल. असे असंख्य पुरावे आमच्याकडे आहेत. हिंदु समाजाच्या लोकांना फसवणार्‍या जिहादी प्रवृत्तीला आम्ही आळा घातल्याशिवाय रहाणार नाही. या पार्श्वभूमीवर अबू आझमी आणि जितेंद्र आव्हाड हे आमदार ‘लव्ह जिहाद’ नाहीच’, ‘धर्मांतर होतच नाही’ असे ठामपणे सांगतात. याचा अर्थ या आमदारांचे ‘लव्ह जिहाद’ला समर्थन आहे का ? बळजोरीने हिंदु तरुण आणि तरुणी यांचे धर्मांतर आम्ही कदापि खपवून घेणार नाही.

भाजपचे मंत्री, आमदार आणि सर्व कार्यकर्ते पीडितांना संरक्षण अन् न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. संपूर्ण हिंदु समाज आणि सरकार पीडितांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही आमदार राणे यांनी हिंदु पीडितांना दिला.