ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे

नवी मुंबई – मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस झाल्यानंतर आता ऐरोली बसस्थानकात खड्डे पडले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचे वाशी बसस्थानक हे सर्वाधिक गर्दीचे ठिकाण आहे. पावसाळ्यापूर्वी काही बसस्थानकांमधील रस्ते खड्डेमुक्त करण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सीबीडी, नेरूळ, वाशी, तुर्भे येथील काही रस्ते, तसेच ऐरोली बसस्थानक येथे खड्डे पडले आहेत.

या बसस्थानकात बस वळवण्याच्या ठिकाणी, तसेच बाहेर पडण्याच्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे पादचार्‍यांना त्रास होत आहे. बस खड्ड्यांत आदळली की प्रवाशांच्या मणक्याला मार बसत आहे. बस जवळून जाणार्‍या पादचार्‍यांच्या अंगावर घाण पाणी उडते. खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेकडून अद्याप कोणतीही कार्यवाही चालू नाही. खडी आणि रेती यांनी तात्पुरते खड्डे भरून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

संपादकीय भूमिका

बसस्थानकाच्या आतील भागाचे काम करतांना ते योग्य रितीने झाले कि नाही ? याकडेही प्रशासनाने पहाणे आवश्यक आहे !