देशरक्षणासाठी हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबांचा २६ जुलैला वाशीत होणार गौरव !

नवी मुंबई – देशरक्षणासाठी प्राणांची आहुती देणार्‍या अमर हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांचे वीर परिवार, तसेच माता-पिता यांचा गौरव करण्यासाठी ‘वीर जवान फाऊंडेशन’च्या वतीने २६ जुलै या दिवशी विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता हा सोहळा होईल.

मागील ९ वर्षांपासून चालू असलेल्या या उपक्रमाचे यंदा १० वे वर्ष आहे. यावर्षी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आमंत्रित करण्यात आलेल्या वीर नारी आणि हुतात्मा सैनिकांच्या पालकांना ‘शौर्य वारसा शिष्यवृत्ती’ अंतर्गत प्रत्येकी ५० सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पद्मश्री शंकर महादेवन् आणि त्यांचे सहकारी कलाकार सुरांच्या माध्यमातून हुतात्म्यांच्या राष्ट्रभक्तीपर गीतांची भावपूर्ण संगीतमय श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. या सोहळ्यास ‘वीर जवान फाऊंडेशन’चे संस्थापक विजय नाहटा (आय.ए.एस्. निवृत्त) भारतीय सेनेचे वरिष्ठ अधिकारी, आजी-माजी सैनिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

प्राणांचे बलीदान देणार्‍या सैनिकांच्या कुटुंबांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. नवी मुंबईकर आणि आसपासच्या परिसरातील नागरिक यांनी आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून वीर जवानांच्या कुटुंबियांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन निवृत्त सैनिक आणि ‘वीर जवान फाऊंडेशन’चे अध्यक्ष सुरेश काकडे यांनी केले आहे.