बंडखोरीमुळे लोकशाही जिवंत रहाणार कि नाही ?, असा प्रश्‍न उभा राहिला ! – भास्कर जाधव

श्री. भास्कर जाधव खेड सभेत आक्रमक

खेड (रत्नागिरी) – गेल्या ९ महिन्यांमध्ये राजकीय उलथापालथी झाल्यामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला. ही बंडखोरी केवळ शिवसेनमध्ये झाली असली, तरी ती शिवसेनेशी संबंधित राहिली नाही, तर सार्‍या देशातील लोकशाहीसंबंधित आहे. बंडखोरीमुळे लोकशाही जिवंत रहाणार कि नाही ? असा प्रश्‍न पूर्ण देशाला पडला होता. संविधानालाच संपवण्याचे काम या देशात केले जात आहे. त्यामुळे अशांना कोकणातून संपवण्याची शपथ घेऊया, असे आवाहन उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. ५ मार्च या दिवशी झालेल्या येथील उद्धव ठाकरे यांच्या सभेत ते बोलत होते.

(सौजन्य : Lokshahi Marathi) 

आमदार भास्कर जाधव पुढे म्हणाले,

१. आताचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत सगळीकडे ही कामे शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात झाली आहेत, असे खोटेच सांगत आहेत.

२. रत्नागिरी आणि कोकणात राबवली गेलेली मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, सिंधु-रत्न योजना, महिला आरोग्य केंद्र या सगळ्या योजना या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये संमत झाल्या आहेत.

३. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनांसाठी एकही पैसा दिलेला नाही.

४. रामदास कदम यांना मंत्रिपद दिल्यावर त्यांनी मतदार संघात किती कामे केली आहेत ? हे त्यांनी घोषित करावे.

५. रामदास कदम यांनी मुलाला निवडून आणण्यासाठी दापोली विभागात कामे केली; मात्र स्वत:चा मतदार संघ विकासापासून वंचित ठेवला.