विजयदुर्ग गडाजवळील आरमार गोदी अधिग्रहित करून शासनाने विकास करावा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

विजयदुर्ग गड

मुंबई, १ मार्च (वार्ता.) – विजयदुर्ग गडाच्या परिसरातील आरमार गोदीची जागा अधिग्रहित करून शासनाने या ऐतिहासिक ठेव्याचा विकास करावा, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडे केली आहे.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

या पत्रामध्ये अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी म्हटले आहे की, शासनाने महसूल विभाग, जिल्हाधिकारी आणि सिंधुदुर्ग ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क साधून गोदीची भूमी अधिग्रहित करावी. याचा विकास लवकर चालू करता येईल. विजयदुर्ग गड प्राचीन असून समुद्राकडील भागातील गडाचे रक्षण होण्यासाठी पाण्याखाली भिंती आहेत. गडापासून काही अंतरावर वाघोटण खाडीच्या आतील भागात शिवकालीन अथवा मराठाकालीन आरमारी गोदी आहे. जी मराठ्यांच्या आरमाराच्या नावांच्या दुरुस्तीसाठी अथवा तत्सम कामासाठी वापरली जात होती, ती आजही आहे. या गोदीच्या दोन बाजूंनी झाडे उगवली आहेत. पाण्याकडील बाजूला पाणी रोखणार्‍या भिंतीची डागडुजी नाही. या जागेचा इतिहासच सांगितला जात नाही. विजयदुर्गमध्ये गोदीची, तसेच विजयदुर्गाची माहिती सांगणारे फलक नाहीत. मराठा साम्राज्याचे हे महत्त्वाचे स्थळ दुर्लक्षित आहे. याकडे तातडीने लक्ष न दिल्यास हा ऐतिहासिक वारसा आपण गमावून बसू, अशी परिस्थिती आहे. शासनाने आदेश देऊन आरमारी गोदीची माहिती देणारे फलक विजयदुर्ग गडावर ठिकठिकाणी लावावेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर याविषयीची माहिती द्यावी.’’