सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांच्‍या संचालनासाठी भक्‍तांचे ‘हिंदु मंडळ’ स्‍थापन करा ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘मशिदींसाठी वक्‍फ बोर्ड, तर मंदिरांसाठी सनातन बोर्ड का नाही ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

मुंबई – मशिदींसाठी ‘वक्‍फ बोर्ड’ आहे, चर्चसाठी सुद्धा ‘स्‍वतंत्र चर्च समिती’ (डायोसेशन बोर्ड) आहे. हिंदूंच्‍या मंदिरांसाठी सुद्धा समिती किंवा मंडळाची स्‍थापना व्‍हायला हवी. हिंदूंच्‍या मंदिरांचे सुव्‍यवस्‍थापन व्‍हावे, यासाठी हिंदूंच्‍या समितीची आवश्‍यकता आहे. जी मंदिरे सरकारच्‍या कह्यात आहेत, ती भक्‍तांकडे सोपवून त्‍याचे संचालन या समितीकडे द्यावे, असे आवाहन नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे आचार्य महामंडलेश्‍वर महंत श्री सुधीरदासजी महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्‍या ‘मशिदींसाठी वक्‍फ बोर्ड, तर मंदिरांसाठी ‘सनातन बोर्ड’ का नाही ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

महंत श्री सुधीरदासजी महाराज यांनी केलेले मार्गदर्शन

महंत श्री सुधीरदासजी महाराज

देवस्‍थानांची आध्‍यात्‍मिकता अबाधित ठेवण्‍याचे दायित्‍व पुजारी आणि व्‍यवस्‍थापन यांचे !

अनेक प्रसिद्ध देवस्‍थानांच्‍या परिसरात मद्य आणि मांसाहारी पदार्थांची दुकाने असतात, ती बंद केली पाहिजेत. काही प्रसिद्ध देवस्‍थानांच्‍या ठिकाणी सरकारने पर्यटनाच्‍या दृष्‍टीने विकास आणि सोयीसुविधा केल्‍या असल्‍या, तरी त्‍या देवस्‍थानांच्‍या परंपरा अन् आध्‍यात्‍मिकता अबाधित ठेवण्‍याचे दायित्‍व तेथील संबंधित पुजारी आणि व्‍यवस्‍थापन यांचे आहे.

सरकारने ‘वक्‍फ बोर्ड’वर अंकुश ठेवायला हवा !

‘वक्‍फ बोर्ड’ने ‘भूमी (लँड) जिहाद’द्वारे आतापर्यंत लाखो एकर भूमी हडप केली आहे. पुढे सुद्धा अनेक भूमी ‘वक्‍फ बोर्ड’ स्‍वतःच्‍या कह्यात घेईल; म्‍हणून या ‘वक्‍फ बोर्ड’वर सरकारने अंकुश ठेवायला हवा.

पहा आणि इतरांनाही पहायला द्या –

मंदिरे आणि धार्मिक संस्‍था यांनी आता एकत्र यायला हवे ! – अनुप जयस्‍वाल, विदर्भ सचिव, देवस्‍थान सेवा समिती

श्री. अनुप जयस्‍वाल

मंदिरे आणि धार्मिक संस्‍था यांनी आता एकत्र यायला हवे. तसेच मंदिरांसाठी ‘सनातन बोर्ड’ स्‍थापन केला पाहिजे. मंदिर क्षेत्रातील लोकांमध्‍ये काही मतभेद असतील, तर ते चर्चा करून दूर केले पाहिजेत. सरकार मंदिरे कह्यात घेऊन मंदिरातील पैशाने काही समाजपयोगी कार्यक्रम राबवते, म्‍हणून ‘सरकार चांगले आहे’, असे म्‍हणता येणार नाही; कारण असे उपक्रम सरकारीकरण न झालेली मंदिरे तथा मंदिरांचे भक्‍तही राबवतात. यातून हिंदूंच्‍या धार्मिक भावनाही जपल्‍या जातात.