(म्हणे) ‘औरंगजेबाने बांधलेल्या महालाचे सुशोभिकरण करा !’

औरंगजेबप्रेमी राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी !

संभाजीनगर – औरंगजेबाने बांधलेल्या ‘किले-ए-अर्क’ या महालाची आज दुरवस्था झाली आहे. या वास्तूची दुरुस्ती करून तिचे सुशोभिकरण करावे, अशी मागणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य उपाध्यक्ष इलियास किरमाणी यांनी नुकतीच जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. ‘जी-२०’ अंतर्गत शहराच्या सुशोभिकरणामध्ये आणि ‘स्मार्ट सिटी’च्या (विकासित शहरांच्या) अंदाजपत्रकात औरंगजेबाच्या या ‘किले-ए-अर्क’चा समावेश करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

इलियास किरमाणी यांनी लिहिलेले पत्र – 

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

इलियास किरमाणी यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, शहरातील किले-ए-अर्क हा मोगल शासक ‘सम्राट’ औरंगजेबने वर्ष १६५० मध्ये महाल बांधला होता. आज तो जीर्ण अवस्थेत आहे. सध्या या महालाची हानी होऊन शासनाच्या निष्काळजीपणामुळे त्याचे गतवैभव लोप पावले आहे. या परिसरात शाही मशीद, आदिल दरवाजा, झेबुन्निसा महाल, पाल्मार कोठी, जनाना महाल, जनाना मशीद आणि मर्दाना महाल यांचा समावेश आहे. किले-ए-अर्कमध्ये आजही आलिशान महाल, सुंदर मोगल गार्डनचे अवशेष, राज सिंहासनची जागा, दिवान ए-आम, दिवानची खास जागा, मंत्र्यांचे दालन, शयनकक्ष आणि हमाम खानेचे अवशेष उपलब्ध आहे. देखभालीच्या अभावामुळे या महालाची स्थिती दयनीय झाली आहे. एकेकाळी हे अतिशय सुंदर स्मारक होते. त्याचे संवर्धन होऊन त्याची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्याची आवश्यकता आहे. असे केल्यास ते पर्यटनस्थळ बनू शकते.

औरंगजेबाच्या क्रूरतेचा इतिहास तरुणांना शिकवायचा का ? – विनोद पाटील, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चाचा आक्षेप !

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक तथा मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले, ‘‘अशा मागणीचा आम्ही निषेध करतो. औरंगजेब हा प्रचंड क्रूर होता. ज्याने स्वतःच्या वडिलांना बंदी बनवले, आणि भावांची हत्या केली, तोच इतिहास आता आपल्या तरुणांना शिकवायचा आहे का ? राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त विधान आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची अशी मागणी पहाता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे.’’

संपादकीय भूमिका

  • छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न करणार्‍या, धर्मवीर संभाजी महाराजांना हालहाल करून मारणार्‍या, हिंदूंची सहस्रो मंदिरे पाडणार्‍या आणि लाखो हिंदूंवर अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा औरंगजेबाच्या महालाचे सुशोभिकरण करण्याची मागणी करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुरवस्था झालेल्या गड-दुर्गांचे जतन आणि संवर्धन करण्याची मागणी करत नाही, हे लक्षात घ्या !
  • अशी मागणी करणे, हा हिंदूंना डिवचण्याचाच प्रकार आहे ! त्यामुळे सरकारने अशांवर कारवाई केली पाहिजे !
  • अशा नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही कारवाई करणार नाही, उलट अशांना विरोध करणार्‍यांना ‘मुसलमानविरोधी’ ठरवेल, हे लक्षात घ्या आणि अशा पक्षाला निवडणुकीत त्याची जागा दाखवून द्या !