संवाद साधण्याचा प्रयत्न; परंतु राजकारण केल्यास राजकीय उत्तर देऊ ! – मुख्यमंत्री

पावसाळी अधिवेशनाविषयी पत्रकार परिषदेत महायुतीने मांडली भूमिका !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३ आठवड्यांचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत, या दृष्टीने अधिवेशनामध्ये आम्ही सकारात्मक चर्चा आणि योग्य उपाययोजना यांवर भर देणार आहोत. विरोधकांनी राजकारण केले, तर त्यांना राजकीय उत्तर देऊ, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येवर महायुतीच्या पत्रकार परिषदेत मांडली. २१ जून या दिवशी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दादासाहेब पाटील उपस्थित होते.

‘विरोधक चहापाण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असते, तर चर्चा करता आली असती. त्यांनी ६ पानांचे पत्र दिले; मात्र या पत्राला स्वाक्षर्‍यांचे पत्र वेगळे जोडण्यात आले आहे. हे पत्रही ‘चॅट जीपीटी’ (कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित प्रणाली) वर सिद्ध करण्यात आल्याचे दिसून येते. विरोधक तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहेत, हे चांगले आहे; परंतु त्यांची कल्पकता नष्ट झाली आहे. या पत्रामध्ये वर्ष २०२३ पासून एक परिच्छेद प्रतिवर्षी दिसतो’, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.

मुख्यमंत्री म्हणाले,

१. निवडणूक नसतांना आम्ही कर्जमाफी केली. आमच्यासाठी ‘कर्जमाफी’ हा राजकीय विषय नाही. आतापर्यंत शेतकर्‍यांना सर्वाधिक लाभ करून देणारी ही कर्जमाफी आहे. कर्ज भरण्याची कार्यपद्धत कोलमडू नये, यासाठीही उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. शेतकर्‍यांवर अन्याय होत असेल, तर आम्ही योग्य निर्णय घेऊ.

२. ‘अल्निनो’मुळे पाऊस लांबला आहे. आतापर्यंत सरासरीपेक्षा ८० टक्के पाऊस न्यून पडला, ही चिंतेची गोष्ट आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार २३ जूनपासून कोकणात पाऊस जोर धरेल. विदर्भ आणि मराठवाडा येथे अल्प आणि मध्यम पाऊस आहे. जुलैपर्यंत पेरणीसाठीच्या पावसाची चिन्हे नाहीत. शेतकर्‍यांनी शासनाच्या सल्ल्यानुसार पेरण्या कराव्यात. राज्यात या कालावधीत मागील वर्षी ३३ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो २४ टक्के आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आले, तर मात्र मोठे संकट येईल.

३. अधिवेशनामध्ये एकूण १० विधेयके आणली जाणार आहेत.

४. बांगलादेशी घुसखोरांकडे सापडणारी खोटी कागदपत्रे बंगालमध्ये सिद्ध करण्यात येत होती. तेथे भाजपची सत्ता आहे. अशी कागदपत्रे देणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे यापुढे बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करणे सोपे होणार आहे.

या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ‘सरकारच्या शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकर्‍यांचाच आहे. शेतकर्‍यांना कधीही वार्‍यावर सोडणार नाही.’

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘हे अधिवेशन राज्याच्या विकासाला गती देणारे ठरेल. महिला शेतकर्‍यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.’