नागपूर जिल्‍ह्यातील विशेष पर्यटक बससेवा ९ मासांपासून बंद !

प्रवाशांची गैरसोय थांबवण्‍यासाठी एस्.टी. महामंडळाने तातडीने उपाययोजना काढाव्‍यात !

नागपूर – जिल्‍ह्यात येणार्‍या पर्यटकांच्‍या सुविधेसाठी पर्यटन बस सेवा चालू करण्‍यात आली होती; पण कोरोनाच्‍या काळापासून बंद असणारी ही सेवा अद्याप चालू झालेली नाही. कोरोनानंतर पर्यटकांच्‍या संख्‍येत वाढ झाल्‍याने एस्.टी. महामंडळाने गणेशपेठ आगार येथून ‘विशेष पर्यटक बससेवा’ चालू केली होती. राज्‍य परिवहन महामंडळाने २२ मे २०२२ या दिवशी ‘विठाई’ नावाची विशेष पर्यटन बससेवा चालू केली होती; पण पुन्‍हा ती बंद करण्‍यात आली. ९ मास होऊनही ती अद्याप बंदच आहे.

प्रत्‍येक रविवार आणि सार्वजनिक सुटीच्‍या दिवशी ही बस सेवा असायची. प्रवासभाडे २९५ रुपये होते. ज्‍येष्‍ठ नागरिक आणि ५ ते १२ वर्षांपर्यंतची मुले यांना ५० टक्‍के सवलत होती. लांब पल्‍ल्‍यासाठी अल्‍प दरांत असणारी सेवा या बसमुळे उपलब्‍ध होत होती. काही काळाने ही बससेवा बंद करण्‍यात आली. ती पुन्‍हा चालू करण्‍याची मागणी प्रवाशांनी केली आहे. ‘सध्‍या ही सेवा बंद असली, तरी येणार्‍या काळात ती पुन्‍हा चालू होईल’, असे आश्‍वासन महामंडळाच्‍या एका उत्तरदायी अधिकार्‍यांनी दिले.