ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तानवाद्यांकडून राष्ट्रध्वज हातात घेतलेल्या भारतियांवर आक्रमण

६ भारतीय घायाळ, २ खलिस्तान्यांना अटक

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – येथे भारताचा राष्ट्रध्वज हातात घेऊन ‘भारत माता की जय’, ‘खलिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा देणार्‍या भारतीय वंशाच्या नागरिकांवर खलिस्तानवाद्यांनी आक्रमण केल्याची घटना २९ जानेवारीला सायंकाळी घडली. या आक्रमणात ६ भारतीय वंशाचे नागरिक घायाळ झाले, तर आक्रमणाच्या प्रकरणी २ खलिस्तानवाद्यांना अटक करण्यात आली आहे. भारतातील भाजपचे नेते मनजिंदरसिंह सिरसा यांनी या आक्रमणाचा निषेध केला आहे. कॅनडा नंतर ऑस्ट्रेलियातही गेल्या ५ वर्षांत खलिस्तान्यांचे वर्चस्व वाढले आहे. मागील मासाभरामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये हिंदूंच्या ३ मंदिरांवर खलिस्तावाद्यांकडून आक्रमणे करण्यात आली आहेत.

१. भारतात बंदी असलेली संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने (‘एस्.एफ्.जे.’ने) मेलबर्न येथील फेडरेशन चौकात कथित जनमत चाचणीचे आयोजन केले होते. येथे मोठ्या संख्येने खलिस्तानवादी त्यांचा झेंडे घेऊन घोषणाबाजी करत होते.

२. या वेळी २५ ते ३० तरुणांचा एक गट भारताचा राष्ट्रध्वज हातात घेऊन  ‘भारतमाता की जय’ आणि ‘खलिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा देत फेडरेशन चौकाकडे येत होता. हे पाहून खलिस्तानवाद्यांनी त्यांच्यावर लाठ्या-काठ्यांनी आक्रमण केले. ते भारतविरोधी घोषणाही देत होते.

संपादकीय भूमिका 

खलिस्तानवाद्यांची देश आणि विदेश  येथील वाढत चाललेली वळवळ ठेचून काढण्यासाठी भारत सरकारने आताच कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. मागील इतिहासापासून बोध घेऊन मोठी हानी होण्यापूर्वी जलद कृती करण्याची आवश्यकता आहे !