भारत आणि चीन यांच्या संबंधांमध्ये ‘नाटो’ तणाव वाढवत आहे !

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांचा आरोप !

(‘नाटो’ म्हणजे ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना)

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव

मॉस्को (रशिया) – भारत आणि चीन यांच्यातील संबंधामधील तणाव वाढवण्यामागे ‘नाटो’ आहे, असा आरोप रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी केला आहे. डिसेंबर २०२२ मध्येही लावरोव यांनी असाच आरोप केला होता.

लावरोव यांनी म्हटले की, नाटो केवळ युरोपीय देशांपुरता सीमित नाही. जून २०२२ च्या माद्रिद येथील संमेलनात सैन्यबंदी संदर्भात घोषणा करण्यात आली होती. ही घोषणा विशेषकरून आशिया-प्रशांत क्षेत्राविषयी होती. यातून हे स्पष्ट होते की, भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. तसे पहायला गेले, तर नाटोचा या क्षेत्राशी काहीच संबंध नाही. त्याचा संबंध केवळ युरोप आणि अमेरिका या क्षेत्राशी आहे.